दिगंबर शिंदे

सांगली : लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या झालेल्या पराभवाची कारणे शोधत असताना एकमेकाबद्दल संशयाचे वातावरणच पुढे आले. मातब्बर उमेदवार असताना भाजपबद्दल समाजात निर्माण झालेले नकारात्मक वातावरण, मुस्लिम, दलित मतांचे झालेले एकत्रिकरण हा जसा मुद्दा पुढे आला तसाच उमेदवाराबद्दलची नाराजीही पुढे आल्याचे चर्चेत आले. आता विधानसभा निवडणूक तोंडावर असताना उमेदवारीवरून पक्षांतर्गत संघर्ष शिगेला जाण्याची जशी चिन्हे दिसत आहेत, तसेच एकेका इच्छुकाकडून दोन-दोन मतदार संघावर केला जात असलेला दावाही पक्षासाठी कळीचा मुद्दा ठरू शकतो हे या बैठकीमध्ये अधोरेखित झाले.

हेही वाचा >>> ‘नीट’ परीक्षेतील गोंधळावरुन सरकारप्रति असंतोष; टीडीपी-जेडीयू या विषयावर गप्प का आहेत?

भाजपचे पक्ष निरीक्षक अतुल भोसले आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगली मतदार संघामध्ये लोकसभा निवडणुकीतील पराभवाची कारणे शोधण्याचा प्रयत्न झाला. राज्यात बहुसंख्य ठिकाणी जी कारणे समोर आली तीच कारणे याही मतदार संघातही होतीच, पण याचबरोबर अतिआत्मविश्‍वासही पराभवामागील एक महत्वाचे कारण ठरले. पक्षाने पुर्वीपासून केलेली बूथ रचना डावलून वेगळाच पर्याय अंमलात आणला गेला. विशेषत: जतमध्ये प्रदेश पातळीवर निश्‍चित केलेली बूथरचना डावलून वेगळीच मंडळी अंतिम क्षणी पुढे आली. उमेदवारी अर्ज दाखल करते वेळी पक्ष प्रवेश केलेल्या प्रकाश जमदाडे सारख्या लोकांच्याकडे प्रचार सुत्रे सोपविण्यात आली. प्रचार प्रमुख माजी सभापती तमणगोंडा रविपाटील यांनी योग्य मोर्चेबांधणी केली असतानाही त्यांना निर्णय प्रक्रियेपासून दूर ठेवून वेगळ्याच व्यक्तीच्या हाती सूत्रे देण्यात आली. अशीच काहीसी परिस्थिती अन्य विधानसभा मतदार संघातही पाहण्यास मिळाली. याचा परिणाम जे अगोदरपासून कार्यरत होते ते या प्रक्रियेपासून बाजूलाच राहिले. याचाही फटका बसला असल्याचे निदर्शनास आले.

हेही वाचा >>> राहुल गांधींची नवीन ‘व्हाईट टी-शर्ट’ मोहीम काय आहे? या मोहिमेचा उद्देश काय?

निवडणूक लोकसभेची आणि प्रचार मात्र विधानसभेच्या निवडणुकीचा असा काहीसा प्रकार जतमध्ये पाहण्यास मिळाला. याचा उहापोह या बैठकीत झाला. आमदार गोपीचंद पडळकर यांनी लोकसभा निवडणूक प्रचारावर लक्ष केंद्रित न करता विधानसभेसाठी गट बांधणी करण्याचा प्रयत्न केला. तर जमदाडे यांनीही पक्षापेक्षा आणि उमेदवारापेक्षा आपले महत्व वाढविण्याचे प्रयत्न केले. याचा लेखाजोखा भाजपच्या बैठकीत करण्यात आला. वास्तविकता आमदार पडळकर हे खानापूर-आटपाडी मतदार संघातील, मात्र, जतमध्ये बहुसंख्येने असलेल्या धनगर समाजाच्या मतावर डोळा ठेवून जतमध्ये आपले राजकीय भवितव्य अजमावण्याचा प्रयत्न करत आहेत. याठिकाणी स्थानिक विरूध्द उपरा असा वाद यामुळे निर्माण होण्याची शक्यता दिसत आहे.

लोकसभेच्या निकालावरून विधानसभेचे गणित मांडता येणार नाही हे जरी खरे असले तरी जत वगळता अन्य सर्वच विधानसभा मतदार संघामध्ये भाजपचे मताधियय कमी झाले आहे. यामुळे सांगली व मिरज हे भाजपचे हक्काचे मतदार संघ तर अडचणीत आहेत, पण याचबरोबर माजी खासदार संजयकाका पाटील यांचा गड मानले गेलेल्या तासगाव-कवठेमहांकाळमध्येही भाजपची अवस्था कठीण झाली आहे. खानापूर-आटपाडीमध्ये महायुतीतील मित्र पक्षांकडून अपेक्षित मदत झालेली नाही, तर पलूस-कडेगावमध्ये काँग्रेस वरचढ ठरली आहे. या बाबींचा विधानसभा निवडणुकीतील उमेदवार निश्‍चितीवेळी भाजपला विचार करावा लागणार आहे. वरिष्ठ पातळीवर असलेल्या संंबंधापेक्षा स्थानिक पातळीवरील स्थितीचा विचार केला तरच लाभदायी ठरणार आहे.