छत्रपती संभाजीनगर : मी संस्थाचालक, मीच साखर कारखानदारवरून धाराशिवचे पालकमंत्रिपद आणि राज्याचा आरोग्यमंत्री, त्यामुळे मीच सरकार. जो कोणी आपला शब्द मोडेल, विरोधात जाईल त्याचे जाहीर वाभाडे काढायचे, ही डॉ. तानाजी सावंत यांच्या कामाची पद्धत. त्यामुळे जमाखर्चाचे सारे हिशेबच निराळे. ‘जो अधिकारी आपले ऐकत नाही, त्याची बदली करा, जो नेता कुरघोडी करू पाहतो, त्याची राजकीय कोंडी करा, हे जणू आदेशच. सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील कारभाराच्या जमा पानावर ‘आशा’ ताईचे वाढलेले मानधन ही एकमेव नोंद वगळता बाकी सारे काम खर्चाच्या रकान्यात मेळघाटातील कुपोषित बालकासारखे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

करोनानंतर सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील मंडळींना लागणारी औषधे पुरविणारी यंत्रणा सुधारण्याची शक्यताच तशी कमी. जिथे औषधे नाहीत, डॉक्टर नियमित वेळेवर बसत नाहीत तिथे उपचारासाठी जा, असे कोण म्हणेल? करोनामध्ये उत्तम काम करणारी ही यंत्रणा पुन्हा एकदा आपल्या मूळ आळसावलेल्या रुपात आली आहे. आरोग्यमंत्री म्हणून आपत्तीच्या काळात विषय समजून घेऊन त्यावर तोडगा काढणारे राजेश टोपे यांच्याशी तानाजी सावंतांची तुलना करणेही अवघड व्हावे असा सध्याचा काळ. न भरल्या जाणाऱ्या रिक्त जागा, त्यातून निर्माण होणारे अनेक प्रश्न एका बाजूला आणि अन्न व औषधे, वैद्यकीय शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य विभागातील असमन्वय यातून राज्याचे आरोग्यक्षेत्र कधी बाहेर आलेच नाही. साप चावला तरी औषध मिळत नाही आणि कुत्रा चावला तरी. मग मुख्यमंत्री कार्यालयाकडून होणारी मदत उपकाराच्या भावनेने स्वीकारण्यापलिकडे सर्वसामांन्याच्या हातात काही राहत नाही.

हेही वाचा – जमाखर्च : दादा भुसे; ना खात्याचा प्रभाव, मतदारसंघातच व्यस्त

भाजप- शिवसेनेच्या युतीचे सरकार असताना शिवसेनेचे डॉ. दीपक सावंत हे धाराशिवचे पालकमंत्री होते. ते मुंबईहून हवाई मा्र्गाने यायचे, एक बैठक घ्यायचे आणि निघून जायचे. पुढे तानाजी सावंत पालकमंत्री झाले. पण जिल्ह्याचे आरोग्य काही सुधारले नाही. ही बाब केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी जेव्हा ‘उस्मानाबाद’च्या जिल्हा रुग्णालयास भेट दिली तेव्हाच स्पष्ट झाली होती. ही घटना तशी जुनी नाही. आरोग्यमंत्री म्हणून आपली ओळख काहीशी कमी राहिली तरी चालेल पण राजकीय पटलावर आपली ओळख अधिक बलवान नेता अशी असायला हवी, असे प्रयत्न तानाजी सावंत यांनी अगदी खासे केले. ते कोणत्या पक्षात आहेत या पेक्षाही मी आहे म्हणून हे घडते आहे, असे दाखविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना जलयुक्त शिवार योजनेची लोकप्रियता टीपेला होती. त्या काळात भाजपवर कुरघोडी करण्यासाठी तानाजी सावंत यांनी ‘शिवजल क्रांती’ नावाची योजना सुरू केली आणि जणू ही योजना राज्यात उद्धव ठाकरे चालवताहेत असा आभास निर्माण केला. त्यासाठी एका रांगेत १५० हून अधिक जेसीबी त्यांनी उभ्या केल्या. पुढे महाविकास अघाडीचे सरकार आले आणि उद्धव ठाकरे यांनी तानाजी सावंत यांना चार हात दूर ठेवले. यामुळे डॉ. तानाजी सावंत चिडले, या पुढे ‘मातोश्री’ची पायरी चढणार नाही अशी घोषणा त्यांनी केली. पुढे उद्धव ठाकरे यांचे सरकार पडावे म्हणून भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून शिवसेनेतील अनेकांना एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभे करण्यासाठी आपण खूप प्रयत्न केले असे सावंत यांनीच जाहीरपणे सांगितले. त्यामुळे राज्याच्या राजकारणात आपण बलवान नेते आहाेत, हा संदेश ते आवर्जून देत असतात.

हेही वाचा – जमाखर्च: संजय राठोड,अन्न व औषध प्रशासन मंत्री; वाद अधिक, कामे कमी

अनेक संस्थांचा कारभार चालविणाऱ्या सावंत यांच्याकडील दातृत्वभाव पाहून त्यांचे हे ‘बलवानपण’ अधिक अधोरेखित होते. अलिकडेच त्यांनी तुळजापूर मतदारसंघातील एका शेतकऱ्याला गारपिटीनंतर वैयक्तिक खात्यातून दहा लाख रुपये दिले. तर शिवसेनेचे प्रामाणिक काम करणाऱ्या दिलीप जावळे या कार्यकर्त्याच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांना केलेली मदत हे त्यांच्या ताकदीचेच एक रूप. राज्याच्या राजकारणातील महत्त्व धाराशिवचे पालकमंत्री म्हणून मिळायला हवे यासाठी सावंत यांनी फक्त परंडा या आपल्या एकट्याच्या मतदारसंघास सारा निधी देऊ केला. त्याची तक्रार भाजपचे नेते राणा जगजीतसिंह पाटील यांनी लेखी स्वरुपात केली. तेव्हापासून धाराशिवच्या राजकारणाचा तोंडवळा पुन्हा राणा जगजीतसिंह पाटील विरुद्ध सारे असा करण्यातही तानाजी सावंत यांची भूमिका महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

परंडा मतदारसंघातील पवनउर्जा कंपन्याच्या कारभारावरून दाखल होणारे गुन्हे, त्यात असणारी तानाजी सावंत यांची भूमिका यावरून राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल मोटे यांनीही अलिकडेच गंभीर आरोप केले आहेत. एकुणात आरोग्यमंत्री म्हणून कामाचा ठसा उमटविण्यापेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचा नेता अशी ओळख निर्माण व्हावी असे मंत्री सावंत यांचे प्रयत्न अधिक आहेत. त्यातून बोलण्यामुळे निर्माण होणारे वाद हा दैनंदिन भाग मानवा लागतो. ‘हाफकिन’बाबतचे वक्तव्य, समाजमाध्यमातून त्यांच्या इंग्रजीची केली जाणारी थट्टा या बाबी तशा गौण असल्या तरी करोनानंतर आरोग्याच्या क्षेत्रातील संस्थात्मक सुधारणांचा दर्जा आणि गतीची तुलना कासवाशी करणे अपरिहार्य होऊन बसते.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tanaji sawant one arena of controversy another of strength print politics news ssb