विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या तेलंगणा राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत.सत्ताधारी भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी काँग्रेस आणि भाजपा पूर्ण ताकदीने स्वतंत्रपणे प्रयत्न करत आहेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी या दोन्ही पक्षांकडून जनतेला वेगवेगळी आकर्षक आश्वासनं दिला जात आहे. हे राज्य जिंकण्याचा भाजपाने निश्चय केला असून त्यासाठी केंद्रातील अनेक नेते येथे जाहीर सभा घेत आहेत. असे असतानाच आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मोठी आणि महत्त्वाची घोषणा केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाजपा देणार मागासवर्गीय समाजातील मुख्यमंत्री

आपले राजकीय प्रस्थ वाढवण्यासाठी भाजपाकडून हरतऱ्हेने प्रयत्न केला जातोय. तेलंगणाची निवडणूक जिंकण्यासाठी हा पक्ष पूर्ण जोर लावत असला तरी अन्य राज्यांप्रमाणेच भाजपाने येथे अद्याप मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित केलेला नाही. निवडणुकीत विजय झाल्यानंतर भाजपातर्फे मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार निश्चित केला जाईल. असे असले तरी मागसवर्गीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी अमित शाह यांनी मोठी घोषणा केली आहे.निवडणूक जिंकल्यास आम्ही राज्याला मागासवर्गीय समाजातील मुख्यमंत्री देऊ, असे अमित शाह म्हणाले आहेत.

तेलंगणा, आंध्र प्रदेशमध्ये अद्याप एकही मागासवर्गीय मुख्यमंत्री नाही

सध्या काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी देशात जातीआधारित जनगणना करावी, अशी मागणी केली आहे. २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत ओबीसी समाजाची मते मिळावीत, यासाठी विरोधकांनी ही राजकीय खेळी खेळली आहे. असे असतानाच विरोधकांच्या या राजकीय खेळीला तेलंगणाच्या रुपात शह देण्यासाठी भाजपाने या राज्यात मागसवर्गीय समाजाचा मुख्यमंत्री देण्याची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे तेलंगणाची विधानसभा तसेच लोकसभा निवडणुकीत फायदा होईल, अशी भाजपाला अपेक्षा आहे. आंध्र प्रदेशचे विभाजन झाले नव्हते तेव्हापासून या राज्याला मागसवर्गीय समाजाचा एकही मुख्यमंत्री लाभलेला नाही. २०१४ साली आंध्र प्रदेश राज्याची निर्मिती झाली, तेव्हापासून या राज्याचे नेतृत्व केसीआर हेच करत आहेत. केसीआर हे वेलामा या उच्च जातीतून येतात. म्हणजेच आंध्र प्रदेशप्रमाणेच तेलंगणा या राज्यालाही आतापर्यंत मागसवर्गीय समाजाचा मुख्यमंत्री लाभलेला नाही. त्यामुळे आपल्या या घोषणेमुळे मागासवर्गीयांची मते आम्हाला मिळतील, अशी अपेक्षा भाजपाला आहे.

मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण?

अमित शाह यांनी तेलंगणा राज्यात मागासवर्गीय नेत्याला मुख्यमंत्रिपद देण्याची घोषणा केलेली असली तरी हा नेता कोण असेल, यावर मात्र त्यांनी कोणतेही भाष्य केलेले नाही. सद्यस्थितीला तेलंगणामध्ये भाजपाचे बंडी संजय कुमार आणि ईटेला राजेंदर हे दोन बडे नेते मागासवर्गीय समाजातून येतात.हे दोन्ही नेते बीआरएस पक्षावर सातत्याने टीका करत असतात. बंडी हे मु्न्नेरू कापू समाजातून येतात. या समाजाचे तेलंगणामध्ये मोठे प्राबल्य आहे. तर राजेंदर हे मुदिराज या मागासवर्गीय समाजातून येतात. या समाजालाही तेलंगणाच्या राजकारणात फार महत्त्व आहे. तेलंगणात एकूण १३४ जाती या मागसवर्गात येतात.या सर्व जातींचे प्रमाण तेलंगणातील एकूण लोकसंख्येच्या ५२ टक्के आहे.

राजेंदर यांना गजवेल मतदारसंघातून उमेदवारी

बंडी संजय कुमार हे तेलंगणाचे भाजपा प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांना भाजपाने करिमनगर येथून उमेदवारी दिली आहे. कुमार यांचा २०१८ साली या मतदारसंघातून पराभव झाला होता. मात्र करिमनगर येथून लोकसभा निवडणुकीत त्यांनी विजय प्राप्त केला होता. मुन्नेरू समाजातील ५० लाख लोक तसेच इतर मागास प्रवर्गातील मतदारांवरही कुमार यांचा प्रभाव आहे.दुसरीकडे राजेंदर यांना गजवेल या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. केसीआर हेदेखील याच मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांनी जून २०२१ मध्ये बीआरएस पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. मंत्री असताना जमीन बळकावल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता.

बीआरएस पक्ष दलितविरोधी- अमित शाह

दरम्यान, अमित शाह यांनी आम्ही निवडणूक जिंकल्यास मागासवर्गीय नेत्याला मुख्यमंत्रिपद देऊ, अशी घोषणा केल्यानंतर बीआरएस पक्षावर सडकून टीका केली. बीआरएस हा पक्ष गरिबांच्या विरोधात आहे. हा पक्ष दलितांच्या विरोधात आहे. फक्त भाजपा हा पक्ष तेलंगणाचा विकास करू शकतो, असे शाह म्हणाले. तसेच केसीआर यांनी दलितांना अनेक आश्वासनं दिली होती, त्याचं काय झालं? असा प्रश्नही शाह यांनी विचारला.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Telangana assembly election 2023 bjp will give backward community cm of won election declared amit shah prd