जयेश सामंत

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे : भाजपचे डोंबिवली पुर्व विभागाचे अध्यक्ष नंदू जोशी यांच्यावर दाखल झालेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यानंतर कल्याण लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिवसेना पक्ष आणि भाजपमधील धुसफूस कमालिची वाढली असली तरी ही खदखद काही डोंबिवलीपुरती मर्यादित राहीलेली नाही. शिंदे यांचा बालेकिल्ला असलेले ठाणे शहर, भाजपचा वरचष्मा असलेल्या नवी मुंबईसह जिल्ह्यातील जवळपास सर्वच शहरांमध्ये या दोन पक्षात टोकाचा विसंवाद दिसू लागला आहे.

ठाण्यात समूह विकासच्या भूमीपुजना दरम्यान भाजपच्या स्थानिक लोकप्रतिनिधींचा योग्य ‘सन्मान’ राखण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आला खरा, मात्र दुसऱ्याच दिवशी दिव्यात भाजप पदाधिकाऱ्यांनी बेकायदा बांधकामांवरुन त्यांचे खासदार पुत्र श्रीकांत यांना लक्ष्य केल्याने भाजपची ही वाढती खदखद येत्या काळात पक्षश्रेष्ठींसाठी डोकेदुखी ठरण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा… पंचवीशीत पदार्पण करताना राष्ट्रवादी राज्याच्या सर्व भागांमध्ये विस्तारला नाही

ठाणे महापालिकेवर गेली अनेक वर्ष एकनाथ शिंदे यांचा दबदबा राहीला आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना या महापालिकेतील अनागोंदीविरोधात ठाण्यातील भाजपचे नेते उघडपणे भूमीका घेताना दिसायचे. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर मात्र यापैकी अनेकांची अडचण झाली. ठाण्यातील अनागोंदीविषयी जाहीर भूमीका घेणाऱ्या काही नेत्यांना वरुन दट्टया मिळू लागला. महापालिकेतील स्मार्ट सिटी प्रकल्पातील कोट्यवधी रुपयांच्या कामामधील घोटाळा, वाढती बेकायदा बांधकामे, रस्त्यांची निकृष्ट कामे, पाणी टंचाई याविषयी आंदोलनाच्या भूमीकेत राहीलेले भाजप नेते सत्ताबदलानंतर मात्र गोंधळून गेले. मुख्यमंत्र्यांसाठी ठाणे शहर श्रेष्ठींनी ‘ॲाप्शन’ला टाकल्याची जाहीर चर्चाही गेल्या काही महिन्यांपासून भाजपमध्ये आहे. असे असताना संजय केळकर यांच्यासारखे पक्षाचे आमदार मात्र अजूनही ठाण्यात विरोधकाच्या भूमीकेत वावरताना दिसत आहेत. ठाणे महापालिकेतील वेगवगळ्या नागरी कामांमधील सावळागोंधळ, नालेसफाईच्या कामातील गडबडी तसेच वाढत्या बेकायदा बांधकामांवरुन सतत भूमीका घेताना केळकर सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणण्याची एकही संधी सोडत नाहीत. सत्तांतरणानंतर ठाण्यातील शिंदे यांच्या निकट असलेल्या माजी नगरसेवकांच्या प्रभागातील कामांसाठी राज्य सरकारकडून कोट्यवधी रुपयांचा निधी वितरीत केला जात आहे. शिंदे गटाच्या वाटेवर असलेल्या मुंब्य्रातील नगरसेवकांसाठीही मध्यंतरी ५० कोटी रुपयांचा निधी वाटप करण्यात आला. असे असताना भाजपच्या प्रभागात मात्र कामे होत नसल्याची ओरड आता पक्षाच्या माजी नगरसेवकांकडून केली जाऊ लागली आहे. मध्यंतरी ठाण्याच्या दौऱ्यावर असलेले सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यापुढे यापैकी काही लोकप्रतिनिधींनी तक्रारींचा पाढाच वाचला. त्यावर चव्हाण यांनीही ‘आक्रमक व्हा’ असा संदेश उपस्थितांना दिल्याचे बोलले जाते.

हेही वाचा… भाजपमधील फेरबदलांपूर्वी ‘मुख्यमंत्री संमेलना’कडे लक्ष

ठाण्यात ॲट्रोसिटी तर डोंबिवलीत विनयभंग

ठाण्यातील आनंदनगर भागातील भाजपच्या एका प्रभाग अध्यक्षाविरोधात मध्यंतरी ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यापुर्वी कशीश पार्क भागातील एका भाजप कार्यकर्त्यावर झालेल्या हल्ल्यात मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीयांचा सहभाग दिसून आला. मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय नरेश म्हस्के यांच्याविरोधात समाजमाध्यमांमधून आक्षेपार्ह लिखाण केल्याप्रकरणी भाजप प्रभाग अध्यक्षाच्या कार्यालयावर शिंदे गटाचे कार्यकर्ते चालून गेले. त्यावेळी झालेल्या वादातून या प्रभाग अध्यक्षाविरोधात ॲट्रोसिटी तर दाखल झालीच शिवाय त्यांच्या सहकाऱ्याची नोकरीही हिरावून घेण्यात आल्याची चर्चा सध्या ठाणे भाजपमध्ये आहे. यामुळे मुख्यमंत्र्यांच्या ठराविक निकटवर्तीयांविषयी भाजपमध्ये कमालिची रोष आहे. डोंबिवलीत नंदू जोशी यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यातही मुख्यमंत्री निकटवर्तीयांचा सहभाग असल्याचा जाहीर आरोप आता भाजपचे स्थानिक नेते करु लागले आहेत. या रोषातूनच आम्ही सांगू तो उमेदवार अशी भूमीका घेत थेट मुख्यमंत्री पुत्राविरोधात भाजपमधून भूमीका घेण्यात आली. डोंबिवलीतील या भाजपविरोधाला जशास तशे उत्तर देण्याची रणनिती शिंदे गटातही आखली जात असल्याने येत्या काळात नेते एकत्र दिसले तरी कार्यकर्त्यांची मने जुळतील का हा प्रश्न कायम आहे.

हेही वाचा… विदर्भातील ओबीसी मतांवर सर्वपक्षीयांचा डोळा

नवी मुंबईत नाईक विरुद्ध शिंदे गट

नवी मुंबईसारख्या शहरात गणेश नाईक यांच्या माध्यमातून भाजपला अच्छे दिन आले असले तरी येथील मुख्यमंत्री समर्थक मात्र नाईक यांच्याविरोधात भूमीका घेताना दिसत आहेत. आमदार नाईक आणि बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्यात विस्तवही जात नाही. या पार्श्वभूमीवर शिंदे गटातील अनेक नेते दादांविरोधात ताईंच्या गोटात वावरताना दिसतात. नाईक आणि त्यांच्या कुटुंबियांनीही नवी मुंबईत स्वत:चे अस्तित्व राखताना शिंदे गटातील माजी नगरसेवकांना चार हात लांब ठेवल्याचे चित्र आहे. मुरबाड, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी यासारख्या शहरातही या दोन पक्षातील नेत्यांमध्ये फारसे मधुर संबंध नाहीत. जिल्ह्यातील प्रशासकीय वर्तुळावर शिंदे पिता-पुत्रांनी एकहाती वर्चस्व निर्माण केल्याने भाजपमधील काही नेत्यांमध्ये कमालिची अस्वस्थता असून डोंबिवलीत नंदू जोशी यांच्या निमीत्ताने या नाराजीचा स्फोट दिसत असला तरी खदखद मात्र संपूर्ण जिल्ह्यात दिसत आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tension in thane district among bjp and shiv sena dispute started in dombivali print politics news asj