तमिळनाडू चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता थलपती विजय राजकारणात सक्रिय होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार विजय थलपती लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नव्या पक्षाची घोषणा करू शकतो. याच पार्श्वभूमीवर थलपती विजयने विद्यार्थ्यांच्या सत्त्कार समारंभात केलेल्या एका भाषणाची चर्चा होत आहे. आंबेडकर, पेरियार यांचे विचार आत्मसात करा, आपले मत विकू नका असे थलपती विजय आपल्या भाषणात म्हणाला आहे. या भाषणानंतर थलपती राजकारणात येण्याच्या चर्चेला बळ मिळाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

थलपतीच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

चेन्नई येथे इयत्ता दहावी आणि बारावीमध्ये उत्तम गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभात थलपती विजयने विद्यार्थी तसेच पालकांना संबोधित केले. आगामी काळात थलपती विजय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना संबोधित करणार आहेत. यावेळी थलपती विजयने शिक्षण, शिक्षणाचे महत्त्व, लोकशाही, भविष्यातील वाटचाल यावर विद्यार्थ्यांना उद्देशून भाषण केले. मात्र स्वत:च्या राजकीय महत्त्वाकांक्षेवर त्याने कोणतेही भाष्य केले नाही.

हेही वाचा >> मध्य प्रदेशमध्ये तीन वर्षांत फक्त २१ जणांना सरकारी नोकरी? प्रियांका गांधींच्या दाव्याने खळबळ!

भीमराव आंबेडकर, पेरियार, के कामराज यांचे विचार जाणून घ्या

यावेळी थलपती विजयने स्वत:चे शिक्षण तसेच त्याच्या वाटचालीवरही भाष्य केले. “मला वाचायला आवडायचे नाही. मात्र जे लोक वाचायचे त्यांना मी आवर्जुन ऐकायचो,” असे विजय म्हणाला. खरे शिक्षण हे फक्त पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित नाही. शक्य होईल त्या सर्व मार्गांनी शिक्षण घेण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थ्यांनी भीमराव रामजी आंबेडकर, पेरियार, के कामराज यांचे विचार जाणून घ्यायला हवेत. त्यांची पुस्तके वाचायला हवीत. विद्यार्थ्यांनी चांगल्या त्या सर्व गोष्टी आत्मसात करायला हव्यात आणि वाईट गोष्टींना वगळायला हवे, असे थलपती विजय आपल्या भाषणात म्हणाला.

‘…तर नेत्यांनी आतापर्यंत किती संपत्ती कमावली असेल’

या कार्यक्रमाला अनेक विद्यार्थी आणि त्यांचे पालक उपस्थित होते. यावेळी बोलताना थलपतीने विद्यार्थ्यांना उद्याचे मतदार म्हटले. “प्रत्येक मतासाठी १ हजार रुपये दिले जातात. म्हणजेच एका मतदासंघात जर १.५ लाख मतदार असतील तर नेता साधारण १५ कोटी रुपये वाटतो. म्हणजे विचार करा नेता १५ कोटी रुपये वाटत असेल तर त्याने आतापर्यंत किती संपत्ती कमावली असेल,” असा सवाल थलपतीने केला.

हेही वाचा >> “सुडाचे दुसरे नाव म्हणजे मोदी!” नेहरूंचे १६ वर्षे वास्तव्य असलेल्या वास्तूचे नाव बदलल्यामुळे काँग्रेस आक्रमक, भाजपावर सडकून टीका

‘… तर परिस्थिती निश्चितच बदलेल’

तसेच विद्यार्थ्यांनी पैसे घेऊन मते देण्याविरोधात बोलायला हवे, असे थलपती म्हणाला. “तमिळनाडूमधील प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या आई, वडिलांना पैसे नघ घेता मतदान करण्यास सांगावे. तुम्ही तसा प्रयत्न करायला हवा. मला विश्वास आहे की, तुम्ही तुमच्या पालकांना तसे सांगितले तर परिस्थिती निश्चितच बदलेल,” असे थलपती म्हणाला.

‘समाजमाध्यमांवरील बहुतांश बातम्या खोट्या’

थलपतीने पुढे समाजमाध्यमं आणि खोट्या बातम्यांवरही भाष्य केले. “आपण म्हणतो की तुमचे जसे मित्र असतील तसेच तुमचे चरित्र असते. आजघडीला तुम्ही सोशल मीडियावर कोणाला फॉलो करता यावरून तुमचे चरित्र समजून येते. समाजमाध्यमांवर काही लोक त्यांचा अजेंडा पेरत असतात. आपले लक्ष वेधण्यासाठी क्लीक बेटचा उपयोग करतात. मात्र यातील बहुतांश बातम्या या खोट्या असतात,” असे थलपती विजय म्हणाला.

हेही वाचा >>‘आदिपुरुष’ चित्रपटावरून राजकारण रंगलं, ‘भाजपाने माफी मागावी’, विरोधकांची मागणी!

थलपती लवकरच नव्या पक्षाची घोषणा करणार?

दरम्यान, मागील अनेक वर्षांपासून थलपती राजकारणात उतरण्याचा विचार करतोय. त्यासाठी तो सर्व बाबी तपासत आहे. २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान तो त्याच्या पक्षाची घोषणा करण्याची शक्यता आहे. तसेच २०२६ साली तमिळनाडूमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. तो ही निवडणूक लढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या निमित्ताने थलपती विजय राजकारणात सक्रिय झाल्यास तमिळनाडूतील राजकीय समीकरणं बदलणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thalapathy vijay may enter in politics soon could announce new political party prd
Show comments