ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाहनावर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी सुपाऱ्या फेकल्या होत्या. ही आपली संस्कृती नाही. क्रियेला प्रतिक्रिया उमटत असते हे या घटनेतून पाहायला मिळाले. या घटनेचे कोणत्याही प्रकारे समर्थन होऊ शकत नाही. ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले त्यांना अशा घटनांचा सामना सहन करावा लागत आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

ठाण्यातील नितीन कंपनी येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ताफ्याच्या दिशेने शनिवारी रात्री मनसेच्या कार्यकर्त्यांनी नारळ फेकले होते. या घटनेत ताफ्यातील एका वाहनाच्या काचा फुटल्या आहेत. तसेच गडकरी रंगायतन परिसरातही उद्धव ठाकरे यांचे वाहन अडविण्याचा प्रयत्न झाला होता. दरम्यान, शनिवारी रात्री मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटाच्या उपनेत्या अनिता बिर्जे यांचा शिंदे गटात पक्ष प्रवेश झाला. या वेळी शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. या घटनेची सुरुवात राज ठाकरे यांच्या दौऱ्यामध्ये झाली. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाहनावर सुपाऱ्या फेकल्या होत्या. ही महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा नाही. शेवटी क्रियेला प्रतिक्रिया उमटत असते. ते या घटनेतून पाहायला मिळाले. परंतु या घटनेचे समर्थन करणार नाही असे एकनाथ शिंदे म्हणाले. ज्या दिवशी आमचे सरकार स्थापन झाले तेव्हापासून हे सरकार घटनाबाह्य आहे. एक महिन्यात सरकार पडेल असे म्हटले जात होते. दोन वर्षे झाली आमचे सरकार अधिक मजबूत झाले आहे. कारण, आम्ही बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे विचार सोडले नाहीत. ज्यांनी विचार सोडले त्यांना अशा घटनांचा सामना करावा लागत आहे अशी टीका त्यांनी केली.

हेही वाचा >>>‘मातोश्री’बाहेर मुस्लिमांची निदर्शने; ‘वक्फ’ सुधारणा कायद्याला विरोध न केल्याने नाराजी

माझ्या दाढीविषयी ते बोलले. आनंद दिघे यांच्या दाढीची महाराष्ट्राला धास्ती होती. मी त्यांचा शिष्य आहे. या दाढीनेच त्यांची गाडी खड्ड्यात घातली आहे. बाळासाहेब असते तर त्यांना जंगलात छायाचित्र काढण्यासाठी पाठविले असते असेही शिंदे म्हणाले.

कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया संतापातून राज ठाकरे

राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांसाठी एक निवेदन समाजमाध्यमावर प्रसिद्ध केले आहे. उद्धव ठाकरे यांच्या वाहन ताफ्यासमोर मनसैनिकांनी जी निदर्शने केली, ती संतापातून आलेली प्रतिक्रिया होती, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. ‘तुम्ही जशास तसे नाही, तर जशास तसे दुप्पट उत्तर देणे म्हणजे काय असते याची चुणूक तुम्ही दाखवलीत. ती पुरेशी आहे. आता तुम्ही सगळे थांबवा’ असा सल्ला राज यांनी कार्यकर्त्यांना दिला. माझ्या नादाला लागू नका, माझे कार्यकर्ते जे करतील ते तुम्हाला कधीच कळणार नाही हे मी आधीच सांगितले होते. त्याची प्रचीती कालच आली, असेही ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे. तुम्ही प्रस्थापित असाल पण माझ्या पाठीशी विस्थापितांची शक्ती आहे, असे राज ठाकरे म्हणाले.

अंधाराचा फायदा घेऊन काही जणांनी उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर शेण, नारळ फेकले. ही दिल्लीच्या अहमद शहा अब्दालीने दिलेली सुपारी होती. राज्यातील तीन नेत्यांना अशा प्रकारे सुपारी देण्यात आली आहे. ठाकरे गटाला संपवण्यासाठी मराठी माणसात मारामाऱ्या घडवल्या जाणार आहेत. त्याची ही सुरुवात असून दिल्लीश्वर फक्त मजा बघत आहेत.- संजय राऊत, खासदार (ठाकरे गट)