नाशिक : सहजसाध्य असताना सेनापती ठरविण्यातच बहुतांश वेळ घालविल्याने लढाई अवघड वळणावर येऊन ठेपल्यावर हातघाईवर यावे, तशी काहीशी अवस्था नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाची झाली आहे. सलग दोनदा विजयश्री मिळविणारे शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे हे उमेदवारी मिळण्यात कालापव्यय झाल्याने प्रचारात रात्रंदिवस एक करीत असले तरी, मित्रपक्षांकडून हवे तसे सहकार्य मिळत नसल्याची त्यांच्यापुढे अडचण आहे. हीच गोष्ट नेमकी महाविकास आघाडीकडील ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या पथ्यावर पडत असल्याने लढतीला वेगळाच रंग आला आहे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाशिक मतदारसंघ या निवडणुकीत प्रथमपासूनच चर्चेत आहे. महाविकास आघाडीने माजी जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांना सर्वप्रथम उमेदवारीसाठी तयारी राहण्यास सांगून अचानक सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी देणे, त्यामुळे करंजकर यांनी शिंदे गटाची वाट धरणे, खासदार श्रीकांत शिंदे यांनी उमेदवारी जाहीर केल्यावरही शिंदे गटाकडून हेमंत गोडसे यांच्या नावावर घोळ घालणे, भाजपकडून गोडसेंविषयी नाराजीचा सूर आळविणे, अमित शहा यांचा आग्रह असल्याचा दावा करणारे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यासाठी त्यांच्या पक्षातूनही कोणी पुढे न येणे आणि गोल गोल फिरुन अखेर गोडसे यांनाच उमेदवारी जाहीर होणे, अशा आश्चर्यकारक घटना या मतदारसंघात उमेदवार निश्चितीच्या पातळीवर घडल्या.

हेही वाचा >>>भाजपा हरियाणात एका मध्ययुगीन मुस्लीम राजाचा उदो-उदो का करत आहे?

ठाकरे गटाकडून राजाभाऊ वाजे हे प्रथमच लोकसभेसाठी उमेदवारी करीत असल्याने विरोधकांना त्यांच्यावर टीका करण्यासाठी फारसे मुद्दे नसल्याने वाजे यांना लाभ होत आहे. वादरहित आणि संयमी नेतृत्व म्हणून वाजे यांच्याकडे पाहिले जाते. दुसरीकडे, उमेदवारी मिळविण्यासाठी झालेली दमछाक गोडसे यांच्यासाठी अडचणीची ठरत आहे. त्यांच्यासाठी आता रात्र थोडी सोंगे फार, अशी स्थिती आहे. गोडसे यांच्याविषयी मतदारसंघात नकारात्मक वातावरण असल्याचे पाहणीत आढळून आल्याचा दावा करणाऱ्या भाजपचा काहीसा अलिप्तपणा, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे छगन भुजबळ आणि आमदार माणिक कोकाटे यांचे सुरक्षित अंतर राखणे, यामुळे नाशिकची जागा धोक्यात आल्याचे जाणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच दोनवेळा नाशिक गाठून महायुतीच्या पदाधिकाऱ्यांसह शहरातील वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधावा लागला. गोडसे यांनी २००९ मध्ये आपली लोकसभेची पहिली निवडणूक मनसेकडून लढवली होती. मनसेशी असलेले जूने नाते लक्षात घेऊन मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते प्रचारात गुंतले आहेत.

हेही वाचा >>>मायावतींवर भाजपाचे मौन, भाच्याला अचानक पदावरून दूर केल्यानंतर ‘बी टीम’च्या चर्चेला उधाण

शांतिगिरी महाराज यांची अपक्ष उमेदवारी गोडसे आणि वाजे दोघांसाठी त्रासदायक ठरणारी आहे. महाराजांच्या जय बाबाजी परिवारात ग्रामीण भागातील मंडळींचा भरणा मोठ्या प्रमाणावर असल्याने महाराज दोघांच्या मतांमध्ये वाटेकरी ठरतील. वंचित बहुजन आघाडीने मराठा समाजाचे करण गायकर यांना उमेदवारी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पिंपळगाव येथील आणि उध्दव ठाकरे यांच्या नाशिक येथील सभेस झालेली गर्दी तोडीस तोड असल्याने या सभांमध्ये झालेली कोणाची गर्दी मतांमध्ये अधिक रुपांतरित होईल, हा घटकही निकालावर परिणामकारक ठरणारा आहे. मागील दोन पंचवार्षिकांमध्ये झालेली मराठा विरुध्द ओबीसी अशी लढत न होता यावेळी महायुती आणि मविआकडून मराठा समाजाचे उमेदवार मैदानात आहेत. अशावेळी ओबीसी समाज कोणाला साथ देईल, यावर निकाल अवलंबून आहे.

मतदारसंघातील प्रश्न

कांद्यासह द्राक्ष पिकांना मिळणारा कमी भाव, मोठ्या उद्योगांनी नाशिककडे फिरवलेली पाठ, नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाचे भिजत घोंगडे, घोषणा होऊन थांबलेली निओ मेट्रो, वाढती महागाई, नवीन उद्योग नसल्याने वाढलेली बेरोजगारी, हे मतदारसंघातील प्रश्न आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The challenge before the shinde group to maintain the position of nashik print politics news amy