अलिबाग – लोकसभा निवडणूक जशी जवळ येऊ लागली आहे. तसा सत्ताधारी महायुतीतील घटक पक्षांतील विसंवाद समोर येऊ लागले आहेत. लोकसभेच्या जागा वाटपावरून तिन्ही पक्षांत असलेले मतभेद समोर येण्यास सुरुवात झाली आहे. याचा प्रत्यय रायगड जिल्ह्यात येतो आहे. रायगड लोकसभा मतदारसंघावर तिन्ही घटक पक्षांनी दावा केला आहे. त्यामुळे मतदारसंघ कोणाच्या वाट्याला जाणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अजित पवार गटाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वैचारीक मंथन मेळावा नुकताच रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे पार पडला. यावेळी चार लोकसभा मतदारसंघांवर राष्ट्रवादी काँग्रेसने दावा सांगितला. ज्यात रायगड लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे हे या मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत. सहाजिकच या मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस हा प्रमुख दावेदार असणार आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेना या घटक पक्षांशी चर्चा न करताच अजित पवार यांनी रायगडची निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर करून टाकले आहे.

हेही वाचा – अमरावतीत भाजपपुढे आव्‍हान

दुसरीकडे शिवसेनेचा शिंदेगटही या मतदारसंघासाठी आग्रही आहे. अलिबाग येथे ग्रामपंचायत निवडणुकांनंतर झालेल्या पक्षपदाधिकाऱ्यांच्या बैठकीत शिवसेनेनी रायगडची लोकसभा निवडणूक लढवावी अशी मागणी जिल्हाप्रमुख राजा केणी यांनी केली. त्याला उपस्थितांनी दुजोरा दिला. शिवसेनेचे अनंत गीते या मतदारसंघातून निवडणूक लढवत आले आहेत. मतदारसंघात शिवसेनेचे सर्वाधिक विधानसभेचे आमदार आहेत. ही बाब लक्षात घेऊन शिवसेनेनी या मतदारसंघाची निवडणूक लढवावी अशी रास्त भूमिका पक्षाने मांडली आहे.

कोकणात फारसे संघटन नसले तरी रायगड लोकसभा मतदारसंघावर भाजपचा डोळा आहे. गेल्या पाच वर्षांत विविध पक्षांतील असंतुष्टांना पक्षात घेऊन आपली ताकद वाढवण्याचे काम पक्षाने सुरू केले आहे. पेण विधानसभा मतदारसंघ जिंकल्यामुळे पक्षाच्या महत्त्वाकांक्षाना अधिकच बळ मिळाले आहे. शेकापच्या धैर्यशील पाटील आणि दिलीप भोईर यांना पक्षात घेऊन भाजपने मतदारसंघ बांधणीला सुरुवात केली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महासंकल्प २०२४ यात्रे अंतर्गत नुकताच रायगडचा दौरा केला. यावेळी अलिबाग येथे रॅली काढून त्यांनी सभा घेतली. यावेळी अलिबागच्या विधानसभा मतदारसंघासह रायगड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी जाहीर करून टाकले होते. धैर्यशील पाटील यांना खासदार करायचे आहे की नाही असा सवाल त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केला. त्यामुळे महायुतीतील तिन्ही घटक पक्ष हे रायगड लोकसभा मतदारसंघासाठी आग्रही असल्याचे स्पष्ट झाले आहे. जागा वाटपाबाबत महायुतीतील घटक पक्षांतील विसंवाद या निमित्ताने चव्हाट्यावर आले आहेत. त्यामुळे रायगड लोकसभेची जागा कोणाच्या पारड्यात पडणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

हेही वाचा – राजस्थानच्या पराभवावर सचिन पायलट यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले; “आम्ही प्रामाणिकपणे…”

मतदारसंघाची रचना… आणि पक्षीय बलाबल…

रायगड लोकसभा मतदारसंघाची २००८ मध्ये पुनर्रचना करण्यात आली. यात रायगड जिल्ह्यातील ४ तर रत्नागिरी जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश करण्यात आला. यात रायगडमधील अलिबाग, पेण, श्रीवर्धन, महाड, तर रत्नागिरीतील गुहागर दापोली या सहा मतदारसंघांचा समावेश आहे. सहापैकी अलिबाग महाड आणि दापोली हे तीन विधानसभा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाच्या ताब्यात आहेत. श्रीवर्धन मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे आहे. तर पेण मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे. गुहागरमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे वर्चस्व आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The claim of the three parties in mahayuti on the raigad lok sabha constituency print politics news ssb
Show comments