जालना : दहा वर्षं विधानसभा सदस्य आणि त्यानंतर २५ वर्षे लोकसभा सदस्य अशा एकूण ३५ वर्षांच्या काळात दानवे यांच्या कामास गती आली, ती मागील दहा वर्षांतच. मुंडे – महाजनांच्या भाजपतील नेते पदाच्या कारकिर्दीमध्ये काहीसे मागच्या बाकावर असणाऱ्या रावसाहेब दानवे यांच्या कार्यगतीचे श्रेय भाजपला मिळावे म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी वंदे भारतमधून प्रवास केला. तेव्हा जालना लोकसभा मतदारसंघातील सहाजिक प्रतिक्रिया आली ती म्हणजे ‘रावसाहेबांची झुकझुक गाडी विलंबाने का असेना पण आली रुळावर’.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जालना ते मुंबईदरम्यानच्या वंदे भारत रेल्वे गाडीमुळे जिल्ह्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांचे एक स्वप्न पूर्णत्वास गेले. रेल्वे राज्यमंत्रीपदी वर्णी लागल्यावर दानवे यांनी आपल्या खात्याचा लाभ जालना जिल्ह्यात कसा देता येईल याकडे लक्ष दिले. १९८५ मध्ये भोकरदन विधानसभा मतदारसंघात रावसाहेब दानवे यांचा फार कमी फरकाने पराभव झाला होता. परंतु त्यानंतर सलग दोन विधानसभा निवडणुका त्यांनी जिंकल्या. राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार आले तरी त्यांची राज्यमंत्रिमंडळात वर्णी लागली नव्हती. १९९९ मध्ये पहिल्यांदा लोकसभा सदस्यपदी निवडून आल्यावर पुढील १५ वर्षे पक्षाने त्यांना केंद्रात आणि भाजपचे प्रदेशाध्यक्षही केले नव्हते. या काळात त्यांना राज्याच्या पक्षसंघटनेत पदे जरी देण्यात आली असली तरी त्यांच्या निवडून येण्याच्या क्षमतेचा आणि अनुभवाचा विचार करून महत्त्वाची वाटावी अशी ती नव्हती.

हेही वाचा – राम मंदिर आंदोलनात देशभरात चर्चा, आता वृंदावनमध्ये स्थायिक; कोण आहेत साध्वी ऋतंभरा ज्यांची अमित शाहांनी घेतली भेट!

चौथ्यांदा लोकसभा सदस्यपदी निवडून आल्यावर २०१४ मध्ये दानवे यांना केंद्रात उपभोक्ता राज्यमंत्री करण्यात आले. म्हणजे विधिमंडळ आणि सांसदीय कारकिर्दीची एकूण २५ वर्षे तसेच त्या आधीची राजकारणातील दहा वर्षे अशी साडेतीन दशके उलटल्यावर दानवे केंद्रातील राज्यमंत्रीपदापर्यंत पोहोचले होते. तोपर्यंत ३५ वर्षे दानवे यांच्या राजकारणातील प्रवासाची गती जुन्या काळातील कोळशाच्या इंजिनाच्या झुक झुक गाडीसारखीच होती. या काळात दानवे यांनी सहकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जिल्ह्यात अनेकदा यश मिळविले. ग्रामपंचायत सदस्यपदापासून राजकारण सुरू करणारे दानवे सहकारी साखर कारखाना आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षापर्यंत पोहोचले तरी २०१४ पर्यंत मात्र भाजपमध्ये ते एकाअर्थाने राज्यपातळीवर दिसत नव्हते. २०१४ मध्ये ते पहिल्यांदा केंद्रात राज्यमंत्री झाले. त्यानंतर २०१५ मध्ये पक्षाचे प्रदेशाध्यक्ष झाल्यावर खऱ्या अर्थाने महाराष्ट्रास त्यांचे वक्तृत्व तसेच कार्यशैलीचा परिचय झाला. पुढे रेल्वे खात्याच्या राज्यमंत्रीपदी वर्णी लागल्यावर त्यांच्या राजकारणास गती आली.

रेल्वे राज्यमंत्री झाल्यावर आपल्या भोकरदन शहरातून जालना-जळगाव हा नवीन रेल्वेमार्ग प्रस्तावित करण्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले. सात हजार १०५ कोटींचा हा मार्ग असून त्यापैकी तीन हजार ५७२ कोटींचा वाटा उचलण्यास राज्य सरकारने सहमतीपत्र रेल्वे खात्यास दिले आहे. या मार्गाचा ७० टक्के भाग दानवे यांच्या लोकसभा मतदारसंघातून जाणारा आहे. मनमाड-जालनादरम्यान रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण झाल्याने आता जालना ते मुंबईदरम्यान वंदे भारत गाडी सुरू झाली आहे. याआधी जालना-मुंबई जनशताब्दी गाडीही जालना स्थानकातून सुरू झालेली आहे. गाड्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी जालना स्थानकात उभारण्यात येणाऱ्या ‘पीटलाईन’चे काम अंतिम टप्प्यात आहे. जालना स्थानकाचे आधुनिकीकरण करण्याचा निर्णय झाला आहे. मराठवाड्यातील रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण टप्प्याटप्प्याने केले जाणार असून मनमाड ते छत्रपती संभाजीनगरदरम्यानच्या सर्वेक्षणासाठी यापूर्वीच मंजुरी मिळालेली आहे.

हेही वाचा – कोल्हापूरच्या हद्दवाढीचे राजकारण तापले

१९८५ पासून रावसाहेब दानवे यांची जिल्ह्याच्या राजकारणात ओळख झाली त्यावेळी जालना रेल्वेस्थानक मीटर गेजने जोडलेले होते. रेल्वे रुंदीकरण होऊन एकेकाळच्या कोळशाच्या इंजिनची जागा डिझेल इंजिनने घेतली. आता जालना स्थानकातून मुंबईपर्यंत दोन गाड्या विजेवर धावत आहेत. वंदे भारतसारखी अर्धद्रूतगती रेल्वेगाडी सुरू झाली आहे. झुक झुक आगीनगाडीपासून विजेवरील वंदे भारत गाडीप्रमाणेच दानवेंचाही राजकीय प्रवास सुरू आहे.

देशातील ९० टक्के रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण झाले आहे. अपूर्ण प्रकल्प पूर्ण करणे आणि नवीन प्रकल्प वेळेच्या मुदतीत पूर्ण करणे हे रेल्वे खात्याचे उद्दिष्ट आहे. पुढील भागातील विद्युतीकरण झाल्यावर वंदे भारत गाडी नांदेड आणि कदाचित सिकंदराबाद येथून सोडण्यात येईल. सोलापूर-धाराशिव रेल्वेमार्गाची घोषणा झाली असून त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. वर्धा- यवतमाळ- नांदेड आणि पाचोरा-जामनेर नवीन मार्गाचे काम सुरू आहे. मनमाड ते संभाजीनगरदरम्यान रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणास जवळपास एक हजार कोटी रुपये लागणार असून या प्रस्तावास आवश्यक असलेली मंजुरी देण्यात आली आहे. पुढील भागाच्या दुहेरीकरणासाठी सर्वेक्षण सुरू आहे. – रावसाहेब दानवे, रेल्वे राज्यमंत्री

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The political career of minister of state for railways raosaheb danve is now running fast print politics news ssb