महेश सरलष्कर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘भारत जोडो’ यात्रेच्या अंतिम टप्प्यासाठी, जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेसने पूर्वतयारी केली असून सुरक्षेच्या दृष्टीने तिथल्या प्रशासनाशीही संवाद साधण्यात आला आहे. काश्मीर खोऱ्यात ही यात्रा यशस्वी होणे काँग्रेससाठी महत्त्वाचे असले तरी, येथील यात्रेचा प्रवास निर्विघ्न होणे केंद्र सरकार व भाजपसाठी देखील राजकीय लाभाचे असल्याचे मानले जात आहे.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील ‘भारत जोडो’ यात्रा पंजाबमधून जम्मू-काश्मीरमध्ये जाईल. ही यात्रा २० जानेवारी रोजी जम्मूमध्ये पोहोचणार असून ३० जानेवारी रोजी श्रीनगरमध्ये यात्रेची सांगता होईल. राहुल गांधी श्रीनगरमधील लाल चौकात तिरंगा फडकावतील. मात्र, राजौरीतील सलग दोन दहशतवादी हल्ल्यांनंतर जम्मू-काश्मीरमध्ये कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे ‘भारत जोडो’ यात्रेच्या सुरक्षेसंदर्भात केंद्र सरकारला अधिक दक्ष राहावे लागत आहे.

हेही वाचा >>> महाविकास आघाडीतील जागावाटपासाठी अजित पवारांचा तोडगा

काश्मीर खोऱ्यातील यात्रेच्या सुरक्षेसंदर्भात पक्षाचे संघटना महासचिव के. सी. वेणुगोपाल व प्रभारी रजनी पाटील यांनी काही दिवसांपूर्वी श्रीनगरचा दौरा केला होता. या दौऱ्यामध्ये दोन्ही काँग्रेस नेत्यांनी नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांची भेट घेतली होती. ‘भारत जोडो’ यात्रा जम्मू-काश्मीरमध्ये कोणत्याही अडचणीविना पार पडेल. यात्रा यशस्वी होण्यासाठी जम्मू-काश्मीर प्रशासनाकडून सर्व साह्य़ केले जाईल, असे आश्वासन नायब राज्यपालांनी काँग्रेसला दिले असल्याचे समजते.

हेही वाचा >>> जनआक्रोश मोर्चातून मतांच्या धृवीकरणावर भाजपचा भर

गेल्या महिन्याच्या अखेरीस जम्मू-काश्मीरमधील सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीमध्ये बैठक घेतली होती. गेल्या वर्षभरात दहशतवादी हल्ल्यांमध्ये काश्मिरी पंडितांनाही लक्ष्य बनवले गेल्यामुळे शहा यांनी ही बैठक बोलावली होती. जम्मू-काश्मीरमध्ये मतदारसंघांची फेररचना झाली असून विधानसभेची निवडणूकही होणार आहे. प्रामुख्याने काश्मीर खोऱ्यात राजकीय प्रक्रिया सुरू करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याचे केंद्र सरकारला अधोरेखित करायचे आहे. ‘भारत जोडो’ यात्रा काश्मीर खोऱ्यात यशस्वी होणे जितके काँग्रेससाठी लाभदायी असेल तितकेच किंबहुना काकणभर जास्त केंद्र सरकारसाठी असेल. त्यामुळे काश्मीर खोऱ्यात ही यात्रा यशस्वी करण्याची जबाबदारी काँग्रेसपेक्षा केंद्र सरकार व केंद्रशासित प्रदेशातील प्रशासनावर अधिक असेल’, असे काँग्रेसमधील नेत्यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा >>> केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाला स्थान मिळणार का?

काश्मीरमध्ये ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान सुरक्षेसंदर्भातील समस्या निर्माण होऊ न देण्याची दक्षता प्रशासन घेईल, अशी ग्वाही काँग्रेसच्या नेत्यांना देण्यात आली आहे. मात्र, उर्वरित भारतामध्ये यात्रेमध्ये प्रचंड गर्दी होत होती व पदयात्रेमध्ये मोठ्या संख्येने लोकांना सहभागी झाले होते. यात्रेत सामील होण्यासाठी कोणालाही आडकाठी केली जात नव्हती. जम्मू-काश्मीरमध्ये मात्र राहुल गांधी व यात्रेला असलेला सुरक्षेचा धोका लक्षात घेऊन काही निर्बंध घातले जाऊ शकतात. २० ते ३० जानेवारी या दहा दिवसांच्या काळातील पदयात्रेमध्ये किती संख्येने लोकांना सहभागी होता येईल, दररोज किती किमी पदयात्रा करता येईल आदी महत्त्वाच्या मुद्द्यांचा प्रशासन विचार करत असल्याचे समजते. ‘ही यात्रा यशस्वी झाली तर, काश्मीर खोऱ्यातील वातावरण बदलत असून तिथे शांतता निर्माण होऊ लागली असल्याचा प्रचार केंद्र सरकार व भाजपला करता येईल’, अशी टिप्पणी काँग्रेसच्या नेत्यांनी केली.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The success of bharat jodo yatra in kashmir valley is also beneficial for the central government print politics news ysh
Show comments