एनडीए सरकारमध्ये दोन महत्त्वाचे घटक पक्ष असलेले तेलुगू देसम पक्ष (टीडीपी) आणि जनता दल (यू) (जेडीयू) यांनीही आता भाजपाचा हिंदुत्वाचा राग आळवायला सुरुवात केल्याचे दिसते. हिंदूंना जवळ करणारे विषय उचलून दोन्ही पक्ष आपापला हिंदू जनाधार वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत. आंध्र प्रदेशमध्ये सध्या तिरुपती देवस्थानमधील प्रसादाच्या लाडूमधील भेसळीचा विषय देशभर गाजत आहे. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनीच हा मुद्दा समोर आणला. नायडू यांच्या टीडीपी पक्षातील सूत्रांनी सांगितले की, लाडूमध्ये जनावरांच्या चरबीचे मिश्रण असल्याचे प्रकरण बाहेर काढून नायडू यांनी माजी मुख्यमंत्री व व्हायएसआर पक्षाचे प्रमुख जगन मोहन रेड्डी यांना लक्ष्य केले आहे. तसेच हिंदूंचा पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न केला आहे.

दी इंडियन एक्स्प्रेसने एनडीएमधील घटक पक्षांनी हिंदूंचा जनाधार वाढविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबाबत एक लेख प्रकाशित केला आहे. या लेखात भाजपाच्या एका नेत्याची प्रतिक्रिया दिली आहे. त्यात त्याने म्हटले की, जगन मोहन रेड्डी यांची राजकारणावरील पकड ढिली करण्यासाठी चंद्राबाबू नायडू यांनी विचारपूर्वक ही खेळी केली आहे. प्रसादाच्या लाडूमध्ये जनावरांची चरबी वापरणे आणि जगनमोहन रेड्डी यांनी तिरुपती देवस्थानात प्रवेश करण्यापूर्वी हमीपत्र (जगनमोहन रेड्डी हे ख्रिश्चन आहेत. तिरुपती मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी अहिंदूंना हमीपत्र द्यावे लागते) न देणे, असे दोन्ही मुद्दे यानिमित्ताने नायडू यांनी उपस्थित केले आहेत. त्यामुळे नायडू यांनी जगनमोहन रेड्डी यांचे राजकीय पुनरागमन रोखल्याची खेळी केल्याचे बोलले जाते. तसेच भाविकांचेही समर्थन मिळविले आहे.

हे वाचा >> दिल्ली विधानसभा निवडणुकीआधी ‘आप’कडून रामायणाचा प्रचारात वापर; आतिशी यांनी खुर्ची मोकळी सोडून काय साधले?

भाजपाच्या एका नेत्याने सांगितले की, जगनमोहन यांना जेव्हा लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला जातो, तेव्हा आपोआपच त्याचा भाजपालाही फटका बसतो. कारण- जगनमोहन यांचे भाजपाशी जवळचे संबंध आहेत. एकंदरीत भाजपा आणि जगनमोहन यांच्यातील दरी वाढविण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. त्यामुळे नायडू यांनी या खेळीद्वारे अनेक पक्षी एकाच दगडात मारले आहेत.

तेलुगू देशम पार्टीच्या नेत्याने मात्र यापेक्षा वेगळे मत मांडले. नायडूंच्या या कृतीमागे त्यांना राजकीय उद्देश दिसत नाही. नायडू हे फक्त मंदिर प्रशासनातील भ्रष्टाचार संपवू पाहत आहेत. जगनमोहन यांच्या सरकारच्या काळात तिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी) मंडळावरील समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने घेतलेले अनेक निर्णय वादात अडकले आहेत.

टीडीपीचे आमदार व व्हायएसआर काँग्रेसचे माजी खासदार असलेले रघू राम कृष्ण राजू दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना म्हणाले की, मुख्यमंत्री स्वतः बालाजीचे भक्त आहेत. त्यामुळे ते योग्य तो निर्णय घेतील. त्यांनी फक्त आंध्र प्रदेशमधील हिंदूंना नाही, तर जगभरातील हिंदूंना आश्वस्त केले आहे.

पवन कल्याण यांच्यावर कुरघोडीचा प्रयत्न

आता या प्रकरणात उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचीही भूमिका महत्त्वाची ठरते. आंध्र प्रदेशमध्ये टीडीपी आणि जनसेना पार्टी (JSP) यांची युती आहे. पवन कल्याण यांचेही जगनमोहन यांच्याप्रमाणेच भाजपाशी जवळचे संबंध आहेत. तसेच ते स्वतःला हिंदुत्ववादी नेते म्हणून पुढे आणत आहेत. अशा वेळी नायडू यांनी प्रसादाचा विषय काढून पवन कल्याण यांच्यावरही कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा प्रसादात भेसळ होत असल्याचा विषय समोर आला, तेव्हा पवन कल्याण यांनी राष्ट्रीय स्तरावर सनातन धर्म रक्षण मंडळ स्थापन करण्याची मागणी केली. या मंडळाच्या माध्यमातून मंदिराशी निगडित विषय, जमीन आणि इतर धार्मिक परंपरांवर निर्णय घेता येऊ शकतात.

पवन कल्याण पुढे म्हणाले, लाडूमध्ये जनावरांची चरबी आढळल्यामुळे ते आता ११ दिवसांचा प्रायश्चित्त म्हणून उपवास करणार आहेत. गुंटूर येथील वेंकटेश्वर स्वामी मंदिरात त्यांनी हा उपवास सुरू केला आहे. मंगळवारी (२४ सप्टेंबर) पवन कल्याण यांनी विजयवाडा येथील कनक दुर्गा मंदिराच्या पायऱ्या धुतल्या. २०२० सालीही पवन कल्याण आणि भाजपाने एकत्र येऊन हिंदू मंदिरांवर हल्ले वाढल्याबाबत निषेध व्यक्त केला होता.

पवन कल्याण यांच्या कृतीवर आमचे लक्ष असल्याचे टीडीपीच्या नेत्याने सांगितले. पवन कल्याण हे एनटीआर (एनटी रामा राव हे माजी मुख्यमंत्री व टीडीपी पक्षाचे संस्थापक आहेत) यांच्या मार्गावर असून चित्रपटसृष्टीतून राजकारणात यशस्वी होण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. पवन कल्याण हे हल्ली भगवी शाल गुंडाळून एनटीआर यांच्याप्रमाणेच सामाजिक जीवनात वावरताना दिसत आहेत.

नितीश कुमार यांचे काय चालू आहे?

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही राम मंदिराचे निर्माण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. तसेच बिहारच्या सीतामढीपासून अयोध्येपर्यंत थेट रेल्वे सेवा सुरू करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

लोकसभा निवडणुकीत नितीश कुमार यांना अनपेक्षित लाभ मिळाल्यामुळे भाजपाच्या मूळ मतपेटीला धक्का पोहोचत आहे, असे बिहारमधील भाजपा नेत्यांना वाटते. “नितीश कुमार यांनी याआधी कधी धार्मिक विधाने केली नव्हती. मागच्या आठ महिन्यांत मंदिर निर्माणानंतरही ते शांत होते; मात्र आता अचानक ते राम मंदिराचे कौतुक करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या मनात काय सुरू आहे, याबद्दल आम्ही नक्कीच जाणून घेऊ”, अशी प्रतिक्रिया बिहारमधील भाजपा नेत्याने दिली.

भाजपाच्या रामकेंद्रित राजकारणात माता सीतेवर अन्याय होत असल्याचे जेडीयूकडून नेहमीच सांगितले गेले आहे. जेडीयू भाजपाच्या राजकारणाच्या मार्गावर चालत असल्याचे दिसते; मात्र नितीश कुमार यांना रामायण परिक्रमा विकसित करायची असल्याचे दिसते. सीतामढी ते अयोध्या ट्रेन सुरू करून, त्यांना राज्यातील पर्यटन क्षेत्राचा विकास करायचा आहे.