तृणमूल काँग्रेस अर्थात टीएमसीच्या आमदाराच्या पत्नीनं एक कोटी रुपयांची लॉटरी जिंकल्यामुळे पश्चिम बंगालमध्ये नवीन राजकीय वादाला तोंड फुटलं आहे. ही लॉटरी जिंकल्यानंतर विरोधकांनी सत्ताधारी पक्षावर मनी लाँडरिंगचे आरोप केले आहेत. कारण मागील काही महिन्यांमध्ये दुसऱ्यांदा ‘टीएमसी’शी संबंधित व्यक्तीला एक कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे. पण टीएमसीने सर्व आरोप फेटाळून लावत भाजपावर पलटवार केला आहे.

जोरसांकोचे आमदार विवेक गुप्ता यांच्या पत्नी रुचिका गुप्ता यांनी ३१ ऑगस्ट रोजी नागालँड सरकारकडून काढलेल्या लॉटरीत पहिलं पारितोषिक जिंकलं आहे. नागालँड सरकारकडून सिक्कीम, नागालँड आणि पश्चिम बंगाल या तीन राज्यांत “डीअर गव्हर्नमेंट लॉटरी” चालवली जाते. यामध्ये टीएमसी आमदार विवेक गुप्ता यांच्या पत्नी रुचिका गुप्ता यांना ही लॉटरी लागली आहे. रुचिका यांनी लॉटरी जिंकल्यानंतर पश्चिम बंगालचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी गुरुवारी याबाबत ट्वीट केलं. संबंधित ट्वीटमधून त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे व टीएमसी खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर हल्लाबोल केला.

हेही वाचा- नड्डा, शाह यांचा आदेश डावलला, हिमाचल प्रदेशमध्ये ५ माजी आमदारांसह एका बड्या नेत्याची हकालपट्टी

“मी आधीपासून म्हणत होतो की, ‘डीअर लॉटरी’ आणि टीएमसीचं अंतर्गत लागेबंध आहेत. सामान्यांकडून पैसे उकळण्याचा हा सोपा मार्ग आहे. सामान्य लोक लॉटरीचं तिकीट खरेदी करतात, पण टीएमसी नेते बंपर बक्षिसे जिंकतात. आधी अनुब्रता मंडल यांनी एक कोटींची लॉटरी जिंकली आता टीएमसी आमदार विवेक गुप्ता यांच्या पत्नीनं बाजी मारली” असं ट्वीट अधिकारी यांनी केलं.

नेमकं प्रकरण काय आहे?
“डीअर गव्हर्नमेंट लॉटरी” नावाने लॉटरी चालवणाऱ्या कंपनीने अलीकडेच वृत्तपत्रातील जाहिरातीत विजेत्यांची नावे जाहीर केली. त्यानुसार, रुचिका गुप्ता यांनी एक कोटींचं बक्षीस जिंकलं. त्यांनी “८१ के १३९८८” या क्रमांकाचं तिकीट खरेदी केलं होतं. या तिकीटाला प्रथम पारितोषिक मिळालं. या जाहिरातीत रुचिका गुप्ता यांनी म्हटलं, “लॉटरी जिंकल्याचं जाणून मला आश्चर्य वाटलं. माझ्या बँक खात्यात एक कोटी रुपये असतील, याची मी कल्पनाही केली नव्हती. या लॉटरीसाठी नागालँड सरकार आणि “डीअर गव्हर्नमेंट लॉटरी”चं मनपूर्वक आभार मानते.”

हेही वाचा- Himachal Pradesh Election : हिमाचलमध्ये भाजपाप्रमाणे काँग्रेससमोरही अंतर्गत बंडाळीचं संकट; फटका बसणार की प्रियंका गांधींची जादू चालणार?

तथापि, डिसेंबर २०२१ मध्ये, टीएमसीचे वीरभूमचे जिल्हाध्यक्ष अनुब्रता मंडल यांनीही त्याच लॉटरीत एक कोटी रुपये जिंकले होते. याबाबतचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मंडल यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. ते सध्या जनावरं तस्करी प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकारानंतर संबंधित लॉटरी कंपनी आणि टीएमसी नेते ईडीच्या रडावर असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नाही.

Story img Loader