कोलकाता येथील आर. जी. कर. महाविद्यालय आणि रुग्णालयात एका महिला डॉक्टरवर ९ ऑगस्टला बलात्कार झाला आणि त्यानंतर तिची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणामुळे अवघा देश हादरला. या घटनेचा निषेध नोंदवत डॉक्टरांनी आंदोलन केलं. तसंच विविध निषेध आंदोलनं अद्यापही सुरु आहेत. या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षात ( TMC ) दोन भिन्न मतप्रवाह पाहण्यास मिळत आहेत. खासदार अभिषेक बॅनर्जी आणि ममता बॅनर्जी यांच्यात मतभेद झाले आहेत अशी चर्चा सध्या बंगालच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

९ ऑगस्टला घडलं बलात्कार आणि हत्येचं प्रकरण

९ ऑगस्टला जे बलात्कार आणि हत्येचं प्रकरण झालं त्या प्रकरणाला आता महिना पूर्ण होईल. मात्र या प्रकरणावरुन सुरु झालेली निषेध आंदोलनं काही थांबायचं नाव घेत नाहीत. त्यामुळे तृणमूल काँग्रेसमध्ये ( TMC ) दोन गट पडले आहेत. एक गट ममता बॅनर्जींबरोबर आहे तर दुसरा अभिषेक बॅनर्जींबरोबर. आता पक्षातले ( TMC ) हे मतभेद कसे मिटवायचे याचं आव्हान ममता बॅनर्जींसमोर असणार आहे. २८ ऑगस्टला टीएमसीच्या विद्यार्थी परिषदेचा एक मेळावा पार पडला. त्यावेळी ममता बॅनर्जींनी जे भाषण केलं त्यात आंदोलकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला जाईल असं म्हटलं. तसंच कुणीही स्वतःचं भवितव्य आंदोलनाच्या माध्यमातून पणाला लावू नका असा इशाराच ममता बॅनर्जींनी दिली. ममता बॅनर्जी म्हणाल्या, काय करायचं आहे ते तुम्हाला समजतं आहे. एक कुरुप गट आहे जो रोज तुम्हाला चावतो आहे, तुम्ही त्याला काही करु शकत नाही पण तुम्ही किमान फुत्कारुन तुमची प्रतिक्रिया देऊ शकता या आशयाचं एक विधान त्यांनी केलं. यावरुन टीका झाल्यानंतर त्यांनी फुत्कार टाकण्याबाबतचं वक्तव्य हे आपण त्या अर्थाने बोललो नव्हतो असं स्पष्टीकरण दिलं.

कोलकाता येथील डॉक्टरवर बलात्कार करण्यात आला आणि त्यानंतर तिची हत्या करण्यात आली. (फोटो-इंडियन एक्स्प्रेस)

अभिषेक बॅनर्जींची २ सप्टेंबरची पोस्ट काय?

दुसरीकडे तृणमूल काँग्रेसचे ( TMC ) खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी २ सप्टेंबरला एक पोस्ट लिहिली. ज्यात ते म्हणतात जे लोक पक्षाच्याही वर आहेत अशा लोकप्रतिनिधींनी नम्र आणि सहनशील असलं पाहिजे. माझी विनंती आहे की कुणीही निषेध आंदोलन नोंदवणाऱ्यांबाबत वाईट बोलू नये. निषेध करण्याचा अधिकार हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे बंगाल हा भाजपाशासित राज्यांपेक्षा वेगळा आहे. २ सप्टेंबरला लिहिलेली ही पोस्टच दोन नेत्यांमधला संघर्ष अधोरेखित करणारी ठरली.

हे पण वाचा- Kolkata Rape Murder Case : “बलात्काऱ्यांना फाशी झालीच पाहिजे” विराट कोहलीची मागणी? ऐका खऱ्या Video तील वाक्य

अभिषेक बॅनर्जी म्हणाले आम्ही बुलडोझर मॉडेल आणि राजकीय दडपशाहीच्या विरोधात मनापासून लढलो आहोत. कोलकात्यात जे घडलं ते भीषण होतं. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी ठोस पावलं उचलण्याची ही वेळ आहे. या लढ्यात बंगालची एकजूट दिसली पाहिजे. जोपर्यंत गुन्हेगारांना शिक्षा होत नाही तोपर्यंत ही निषेध आंदोलनं थांबली नाहीत तरी चालेल असंही बॅनर्जी म्हणाले.

अरुप चक्रवर्तींचं ते विधान

अभिषेक बॅनर्जी यांच्या या मतांशी सगळेच सहमत नाहीत. ममता बॅनर्जी यांच्या गटातले ( TMC ) खासदार अरुप चक्रवर्ती एका जाहीर सभेत म्हणाले लोकांनी त्यांची विवेकबुद्धी जागृत करण्याची गरज आहे. ममता बॅनर्जींच्या पाठिशी उभं राहण्याची ही वेळ आहे, आम्हीही संसदेत आहोत. तृणमूल काँग्रेसच्या ( TMC ) काही कार्यकर्त्यांनी एक हिसका दाखवावा. तुम्ही जर तुमचा हिसका दाखवलात तर ते (आंदोलक) कुत्र्यासारखं पळून जातील. असं अरुप चक्रवर्ती म्हणाले. अरुप सरकार यांच्या या वक्तव्यानंतर टीमसी कौन्सिलरचे पती अतिश सरकार आंदोलकांबाबत म्हणाले, “तुमच्या माता-भगिनींची चित्र काढेन आणि तुमच्या दारांवर लटकवेन, म्हणजे तुम्हाला घराबाहेरही पडता येणार नाही.” या वक्तव्यानंतर सरकार यांना त्यांच्या पदावरुन निलंबित करण्यात आलं. तसं करण्यासाठी अभिषेक बॅनर्जींचे निर्देश होते. कोलकाता येथे घडलेली ही घटना तृणमूल काँग्रेसमधला अंतर्गत कलह चव्हाट्यावर आणणारी ठरली आहे.