वसई : लोकसभेतील दारूण पराभव आणि घटलेल्या जनाधारामुळे बहुजन विकास आघाडीपुढे मोठे राजकीय संकट उभे ठाकले आहे. समोर महायुती आणि महाविकास आघाडीचे तगडे आव्हान असल्याने बहुजन विकास आघाडीला आपल्या हातात असलेल्या तिन्ही मतदारसंघाची चिंता वाटू लागली आहे. त्यामुळे पक्षाचे नेचे खडबडून जागे झाले असून, जनसंपर्क वाढविला आहे. पक्षाने तिन्ही मतदारसंघांत मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे. विविध विकासकामांचे भूमिपूजन व उदघाटन, जनसंवाद यात्रा असे कार्यक्रम सुरू करण्यात आले आहेत. पक्ष प्रथमच एवढा सक्रिय झाला आहे.

मागील तीस वर्षापासून आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीची वसई विरार शहरावर निर्विवाद सत्ता आहे. पालघर जिल्ह्यातील वसई, नालासोपारा आणि बोईसर या तिन्ही विधानसभा क्षेत्रात बविआचे वर्चस्व आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता. याशिवाय वर्चस्व असलेल्या तिन्ही विधानसभा क्षेत्रातही चांगले मताधिक्य मिळेल अशी आशा होती. मात्र कमी मताधिक्य मिळाल्याने पिछाडीवर जावे लागले होते. या पराभवानंतर बहुजन विकास आघाडी पुन्हा एकदा जोमाने कामाला लागली असून तीन आमदार असलेल्या प्रमुख विधानसभा क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले आहे.

हे ही वाचा… Jammu and Kashmir Election : जम्मू-काश्मीर विधानसभेचा दुसरा टप्पा; ओमर अब्दुल्लाह, अल्ताफ बुखारी, हमीद कारा व रवींद्र रैनांची प्रतिष्ठा पणाला

आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आमदार हितेंद्र ठाकूर, राजेश पाटील यांनी जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न जाणून घेण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे वसई विरार शहरात विविध ठिकाणच्या भागात प्रलंबित व नव्याने नियोजित केलेले विकासकामांचे भूमिपूजन व उदघाटन सोहळे अशा कार्यक्रमांचा एकापाठोपाठ एक असा धडका सुरू केला आहे. नुकताच वीज समस्या लक्षात विरारच्या चिखलडोंगरे येथेही महापारेषणच्या उपकेंद्राचे आमदार हितेंद्र ठाकूर व आमदार क्षितीज ठाकूर यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. याशिवाय रस्ते, पाणी यासह पायाभूत सुविधा अशा विविध प्रकल्पाचे ही भूमिपूजन व उदघाटने पार पडत आहेत. विधानपरिषद निवडणुकीत महायुतीला पाठिंबा देऊन आमदार हितेंद्र ठाकूर यांनी अनेक विकास कामे पदरात पाडून घेतली आहेत तर अनेक प्रकल्प मंजूर करवून घेतली आहेत. त्यात शहरातील ७ उड्डाणपूल, प्रमुख ७ रस्त्यांचे सिमेंट कॉक्रीटीकरण, रोरो सेवा, ४ नवीन रेल्वे उड्डाणपूल, देहर्जी धरण पाणी प्रकल्प, मेट्रो रेल्वेच्या खाडी पूलाला मंजुरी आदी कामांचा समावेश आहे. याशिवाय पक्षातील नेत्यांकडून विविध सामाजिक संस्था, उद्योजक यासह विविध क्षेत्रातील प्रमुख व्यक्ती यांच्याही गाठी भेटी व त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी बहुजन विकास आघाडीची तयारी सुरू झाली आहे.

बोईसरमध्ये राजेश पाटील यांची मोर्चेबांधणी

राजेश पाटील हे बोईसर विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार आहेत. लोकसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने पाटील यांना उमेदवारी देऊन मैदानात उतरविले होते. आमदार राजेश पाटील यांचा पराभव झाला होता. विशेषतः बोईसर विधानसभा क्षेत्रातही मताधिक्यात त्यांची पीछेहाट झाली होती. खासदारकी तर मिळाली नाही पण किमान आमदारकी तरी टिकावी यासाठी राजेश पाटील कामाला लागले आहे. बोईसर विधानसभा क्षेत्राचा बहुतांश भाग हा ग्रामीण बहुल भाग असल्याने तेथील ग्रामीण भागात जाऊन जनसंवाद यात्रा, कार्यकर्त्यांशी संवाद, विविध धार्मिक कार्यक्रमांना उपस्थिती अशा प्रकारे संपर्कात राहण्याचा प्रयत्न करीत आहेत. दुसरीकडे बोईसर विधानसभेवर भाजपा, शिवसेना व महाविकास आघाडी यांनीही लक्ष केंद्रित केल्याने बविआसाठी या मतदारसंघातील निवडणूक आव्हानात्मक असणार असल्याचे बोलले जात आहे.

हे ही वाचा… आरक्षण आंदोलनातील तूट महिला मतपेढीतून भरुन काढण्याची भाजपची तयारी, तीन हजार लाडक्या बहिणींचे मेळावे

वर्चस्व कायम ठेवण्याचे आव्हान

पालघर लोकसभा निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळविला होता. विशेषतः बविआचे वर्चस्व असलेल्या विधानसभा क्षेत्रातून चांगलेच मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे भाजप – शिवसेना ( शिंदे गट) युतीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीला ही वसई, नालासोपारा या मतदार संघात चांगली मतं मिळाली होती. विधानसभा निवडणुकीसाठी वसई नालासोपारा या दोन्ही मतदार संघात या पक्षांचे उमेदवार रिंगणात उतरविले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बविआ समोर तिन्ही मतदार संघावर आपले वर्चस्व कायम ठेवण्याचे मोठे आव्हान आहे.