सांगली : जिल्ह्यातील आठ जागापैकी तीन जागा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) लढत असून यापैकी दोन जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्याशी थेट लढत होत आहे. भाजपने इस्लामपूर आणि तासगाव-कवठेमहांकाळ या दोन जागा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला देत असताना माजी खासदारासह जिल्हाध्यक्षांनाही उधारीवर देउन राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची कोंडी करण्याचा प्रयत्न केला असल्याने या लढतीकडे आता राज्याचे लक्ष लागून राहणार आहे.

गेले आठ दिवसापासून इस्लामपूर आणि तासगावमध्ये महायुतीचे उमेदवार कोण लढणार याची चर्चा जोरदारपणे सुरू होती. माजी खासदार संजयकाका पाटील यांनी तर एका पराभवाने मी खचणारा कार्यकर्ता नसल्याचे सांगत तासगावमधील आरआर आबा गटाला आव्हान दिले होते, तर लहान अथवा मोठा पैलवान मैदानात आला तर मी कुस्तीसाठी सज्ज असल्याचे आबांचे पुत्र रोहित पाटील यांनी जाहीरपणे सांगितले होते. याच महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कवठेमहांकाळ नगराध्यक्ष निवडीवरून दोन्ही गट रस्त्यावर उतरले होते. हाणामारीही झाली. यानंतर तासगाव नगरपालिका इमारत उद्घाटनावेळी आजी-माजी खासदारामध्ये खडाजंगीही पाहण्यास मिळाली. यावरून तासगावची निवडणुक अटीतटीच्या दिशेने जात असल्याचे संकेत मिळत होते.

हे ही वाचा… भाजप उमेदवारीचा तिढा दिल्ली दरबारी! मलकापूरमधून संचेती व लखानी यांच्यात चुरस

इस्लामपूर, तासगावमध्ये भाजप स्वबळावर लढू शकत असली तरी मागील निवडणुकीत झालेला राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हाचा लाभ उठविण्यासाठी यावेळी महायुतीतील भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षांनी राजकीय डावपेच आखत दोन्ही राष्ट्रवादीमध्ये लढत निश्‍चित केल्याचे दिसून आले. माजी खासदार पाटील यांना लोकसभा निवडणुकीत या मतदार संघातून मते कमी मिळाली असली तरी पुन्हा ताकदीने मैदानात उतरण्याची आणि झालेल्या चुका टाळून पुढे जाण्याची तयारी काकांनी केल्याचे दिसते. यापुर्वी स्व. आरआर आबांशीही त्यांनी लढत दिली असून दोन निवडणुकीमध्ये मतांचा तीन ते पाच हजार फरक आहे. यावेळी त्याला कवठेमहांकाळच्या अजितराव घोरपडे यांच्या विकास आघाडीची मिळणार आहे. घोरपडे आणि पाटील यांच्यात राजकीय समेट घडवून आणल्याने ही लढत यावेळी अधिक चुरशीची आणि लक्ष्यवेधी ठरणार आहे.

हे ही वाचा… चावडी : बिनधास्त नाना

इस्लामपूरमध्ये आमदार जयंत पाटील यांना मतदार संघातच अडकवून ठेवण्यासाठी प्रसंगी त्यांचा गड काबीज करण्याची व्यूहरचना केल्याचे दिसून येते. मतदार संघात घड्याळावर श्रध्दा असलेला मतदार आपणाकडे वळविण्याबरोबरच गेल्या विरोधकामध्ये ऐक्य घडविण्याची रणनीती यावेळी आखली जाणार आहे. विरेाधकांचा चेहरा म्हणून माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष भोसले-पाटील यांना पुढे करण्यात आले आहे. आता एकास एक लढत झाली तरच ही व्यूहरचना यशस्वी ठरण्याची चिन्हे दिसतील, अन्यथा विरोधकांतील बेबनाव हीच आमदार पाटील यांच्या यशाची खात्री असेच आजपर्यंतचे चित्र पाहण्यास मिळत आले आहे. गेल्या सात निवडणुका सलग जिंकून आमदार पाटील यांनी मतदार संघावर एकहाती वर्चस्व सिध्द केले आहे. यावेळी केवळ भाजपसोबतचा उघड संघर्ष तर आहेच, पण आता भाजपच्या जोडीला उपमुख्यमंत्री अजित पवारही आहेत.