मुंबई : राज्याच्या इतिहासात सर्वांत कमी आमदारांचे संख्याबळ असताना उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी १४व्या विधानसभेत पाच वर्षांच्या कार्यकाळात मुख्यमंत्रीपद भूषविले आहे. विधानसभेच्या २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक १०३ आमदार निवडून आले होते. परंतु शिवसेनेने महाविकास आघाडीचा प्रयोग केल्याने सर्वाधिक आमदार असलेल्या भाजपला विरोधी पक्षात बसावे लागले.

शिवसेनेचे ५६ आमदार असताना राष्ट्रवादी, काँग्रेस व छोट्या पक्षांच्या सहाय्याने उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीच्या वतीने मुख्यमंत्री झाले. त्यांनी अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद भूषविले. जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेना विधिमंडळ पक्षात फूट पडली. परिणामी बहुमत गमाविल्याने उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. यानंतर केवळ ४० आमदारांच्या जोरावर भाजपच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाली. शिवसेनेच्या केवळ ४० आमदारांचे पाठबळ असताना भाजपच्या पाठिंब्यावर शिंदे हे अजून मुख्यमंत्रीपद भूषवित आहेत. केवळ ४० आमदारांचे पाठबळ असताना मुख्यमंत्रीपद भूषविण्याचा विक्रम शिंदे यांच्या नावे नोंद झाला आहे.

मुंबईतील धार्मिक संस्थांचे पाठबळ मिळविण्यासाठी भाजपची रणनीति, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा साधणार संवाद

राज्यात काँग्रेसची एकहाती सत्ता असताना २०० पेक्षा अधिक आमदारांचे पाठबळ असायचे. आणीबाणीनंतर १९७८ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जनता पक्षाचे सर्वाधिक ९९ आमदार निवडून आले होते. परंतु रेड्डी काँग्रेस ६९, तर इंदिरा काँग्रेस ६२ यांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केले. पुढे शरद पवार यांनी ‘पुलोद’चा प्रयोग केला. १९८० व १९८५ मध्ये काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळाले होते. १९९० मध्ये इंदिरा काँग्रेसचे १४१ आमदार निवडून आले होते. १९९५ पासून १४४ चा जादुई आकडा तर दूरच पण आमदारांचे केवळ दुहेरी संख्याबळ असताना मुख्यमंत्रीपद भूषविण्यात आले आहे. त्याला अपवाद फक्त २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस यांचा होता.

१९९५ मध्ये मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले तेव्हा शिवसेनेचे ७३ आमदार होते. १९९९ मध्ये विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले तेव्हा काँग्रेसचे संख्याबळ ७५, तर २००४ मध्ये पुन्हा देशमुख मुख्यमंत्री झाले तेव्हा काँग्रेसच्या आमदारांची संख्या ६८ होती. २००९ मध्ये अशोक चव्हाण यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाली तेव्हा काँग्रेसचे ८२ आमदार होते.

हेही वाचा >>>काँग्रेसकडून विदर्भात सांगली प्रारुपाची पुनरावृत्ती? राष्ट्रवादीकडे असलेल्या काटोल मतदारसंघाकडे लक्ष

१९९५ पासून मुख्यमंत्रीपद भूषविणाऱ्या पक्षाचे संख्याबळ

● १९९५ ते १९९९ : मनोहर जोशी आणि नारायण राणे (शिवसेना आमदारांची संख्या- ७३)

● १९९९ ते २००४ : विलासराव देशमुख व सुशीलकुमार शिंदे (काँग्रेस आमदारांची संख्या-७५)

● २००४ ते २००९ : विलासराव देशमुख आणि अशोक चव्हाण (काँग्रेस आमदारांची संख्या-६८)

● २००९ ते २०१४ : अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस आमदारांची संख्या-८२)

● २०१४ ते २०१९ : देवेंद्र फडणवीस (भाजप आमदारांची संख्या-१२२)

● २०१९ ते २०२२ : उद्धव ठाकरे (शिवसेना आमदारांची संख्या-५६)

● २०२२ पासून : एकनाथ शिंदे (शिवसेना शिंदे गट आमदारांची संख्या-४०)