अमरावती : एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्‍ला म्‍हणून ओळख असलेल्‍या पश्चिम विदर्भातही शिवसेनेत खिंडार पडल्‍यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता किल्‍ल्‍याची डागडुजी करण्‍यासाठी पुढाकार घेतला आहे. दोन खासदार, तीन आमदार शिंदे गटासोबत गेल्‍यानंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढण्‍यासाठी पक्षाच्‍या पुनर्बांधणीचे त्‍यांचे प्रयत्न आहेत.

आपल्‍या विदर्भाच्‍या दोन दिवसांच्‍या दौऱ्यात उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्‍या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. अमरावतीच्‍या ज्ञानेश्‍वर सांस्‍कृतिक भवनात आयोजित मेळाव्‍यात अकोला आणि अमरावती जिल्‍ह्यातील कार्यकर्त्‍यांसोबत संवादही साधला. मेळाव्‍याला उत्‍स्फूर्त प्रतिसादही मिळाला. पण, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि उर्वरित आमदारांना पक्षाशी एकनिष्ठ ठेवण्याचे आव्हान उद्धव ठाकरे यांच्यासमोर आहे. ठाकरे गटाने राज्यव्यापी मोहिमा सुरू केल्या. आदित्य ठाकरे यांनी राज्यभरात दौरे केले. निष्ठा यात्रा, शिवसंवाद यात्रा, प्रबोधन यात्रा अशा माध्यमातून पुन्हा एकदा शिवसैनिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडून करण्यात आला. भाषणांमध्‍ये उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय मुद्दे मांडले. प्रामुख्याने त्यांनी मोदी सरकार आणि राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार आणि त्यांचे राजकारण यावर आपली मते व्यक्त केली. आता विदर्भाच्‍या दौऱ्यात उद्धव ठाकरे यांनी अधिक आक्रमक होत, भाजपला आव्‍हान दिले आहे. सरकारच्‍या योजनांचे अपयश लोकांसमोर आणण्‍याचे आवाहन त्‍यांनी कार्यकर्त्‍यांना केले.

हेही वाचा – बिहारमध्ये महायुतीत तणाव? नितीश कुमार-राजद पक्षाच्या आमदारात बैठकीमध्ये वाद; तेजस्वी यांच्यावर खुर्चीवरून उठण्याची वेळ

उद्धव ठाकरे यांनी मेळाव्‍याच्‍या माध्‍यमातून विरोधकांच्‍या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर देण्‍याचा प्रयत्‍न केला. खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरे यांना सातत्‍याने टीकेचे लक्ष्‍य केले आहे. ठाकरेंच्‍या दौऱ्याआधीदेखील राणांनी त्‍यांना डिवचले होते. आजवर ठाकरे यांनी कधीही थेट राणा दाम्‍पत्यावर हल्‍ला चढवला नव्‍हता, पण यावेळी मात्र त्‍यांनी नवनीत राणांच्‍या जात प्रमाणपत्राचा उल्‍लेख करून निवडणुकीतील कडवट संघर्षाचे संकेत दिले. बडनेरा येथे त्‍यांचे आगमन झाले, तेव्‍हा मुस्‍लीम संघटनांच्‍या वतीने त्‍यांचे जोरदार स्‍वागत करण्‍यात आले. मेळाव्‍यातदेखील अनेक मुस्‍लीम नेत्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. हृदयात राम आणि हाताला काम, अशी आमची हिंदुत्वाची शिकवण आहे. तर, मुखी राम आणि बगलेत सुरी, असे भाजपचे बेगडी हिंदुत्व आहे, अशा परखड शब्‍दात टीका करून उद्धव ठाकरे यांनी भाजपलाच आव्‍हान दिले.

पश्चिम विदर्भात शिवसेनेचे चार आमदार आहेत. यात यवतमाळ जिल्ह्यातील संजय राठोड (दिग्रस), बुलढाणा जिल्ह्यातील संजय रायमूलकर (बुलढाणा), संजय गायकवाड (मेहकर) व अकोला जिल्ह्यातील नितीन देशमुख (बाळापूर) यांचा समावेश आहे. यापैकी नितीन देशमुख वगळता तिघेही एकनाथ शिंदे यांच्‍या गटात आहेत. खासदारद्वय भावना गवळी, प्रताप जाधव हेदेखील शिंदे गटात सामील झालेत. उद्धव ठाकरे यांच्‍या गटासाठी हा मोठा धक्‍का होता. पण, ठाकरे गटाचे विदर्भ संपर्कप्रमुख खासदार अरविंद सावंत यांनी आता पाचही जिल्‍ह्यातील निष्‍ठावान कार्यकर्त्‍यांची एकजूट करण्‍याचा प्रयत्‍न सुरू केला आहे.

हेही वाचा – साकेत गोखले तृणमूल काँग्रेसकडून राज्यसभेचे उमेदवार; पत्रकार, आरटीआय कार्यकर्ते ते प्रवक्ता कसा होता राजकीय प्रवास?

आमदार नितीन देशमुख यांच्‍यावरदेखील मोठी जबाबदारी आहे. अमरावती जिल्‍ह्यात माजी खासदार अनंत गुढे, जिल्‍ह्याचे सपंर्कप्रमुख सुधीर सूर्यवंशी, सुनील खराटे, दिनेश बूब यांच्‍यासह प्रमुख पदाधिकारी ठाकरे गटासोबत टिकून असले, तरी अंतर्गत गटबाजीमुळे अजूनही सूर गवसलेला नाही, अशी प्रतिक्रिया आहे. १९९० च्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम विदर्भात शिवसेनेला उल्लेखनीय यश मिळाले. त्यावेळी या विभागातून सात आमदार निवडून आले. २००४ च्या निवडणुकीत ही संख्या आठवर पोहोचली. १९९६ पासून शिवसेनेच्या दोन ते तीन खासदारांनी कायम या विभागाचे प्रतिनिधित्व केले आहे. पण आता पश्चिम विदर्भात ठाकरे गटाला नव्‍याने बांधणी करावी लागणार आहे.

Story img Loader