मुंबई : भाजपचे सावंतवाडीतील नेते राजन तेली यांनी शिवसेना (ठाकरे) पक्षात प्रवेश केला. राजन तेली यांच्या ठाकरे गटातील प्रवेशामुळे सावंतवाडीतील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. सावंतवाडीत मंत्री दीपक केसरकर यांना यामुळे आव्हान मिळाले असून विधानसभा निवडणुकीत नारायण राणे यांना आता केसरकरांसाठी मोर्चेबांधणी करावी लागणार आहे.

राजन तेली यांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करताना उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचं सरकार आणणारच हे महाराष्ट्राच्या जनतेने ठरवलं आहे. राजन तेली यांच्या संघर्षाला अंतिम रूप द्यायचे आहे म्हणून ते परत शिवसेनेत आले असल्याचे सांगितले. पक्षप्रवेशानंतर बोलताना राजन तेली यांनी नारायण राणे यांच्यासोबत शिवसेना पक्ष सोडून जाणे, ही मोठी चूक झाल्याचे सांगितले. त्यावेळी शिवसेना सोडली नसती तर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात दीपक केसरकर यांचा राजकीय जन्मच झाला नसता, असे ते म्हणाले.

हेही वाचा >>>विधान परिषदेच्या पाच माजी आमदारांना विधानसभेचे वेध, वेगवेगळ्या पक्षांकडून तयारी सुरू

केसरकरांना शह?

लोकसभा निवडणुकीत सावंतवाडीत विनायक राऊत यांना ५० हजार मते मिळाली होती. ही मते शाबूत ठेवून भाजपची काही मते फोडण्यात तेली यशस्वी ठरल्यास हा केसरकरांना ठाकरे गटाकडून मोठा शह असेल. भाजपचे विशाल परब हेसुद्धा या मतदारसंघातून इच्छुक असून ते अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत.

दीपक साळुंखे हेही ठाकरे गटात

सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीचे (अजित पवार) माजी आमदार व जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांनीही उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. सांगोला मतदारसंघातून लढण्याची साळुंखे यांची योजना असली तरी महाविकास आघाडीतून हा मतदारसंघ शिवसेनेला सुटतो का, हे महत्त्वाचे आहे.