मुंबई: लोकसभा निवडणुकीत ‘मला नकली म्हणणारे बेअकली’ अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट टीका करणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव व ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाला फारसे महत्व न देता भाजपच्या प्रमुख नेत्यांवर जहरी टीका करण्याची रणनिती आखली आहे. त्याची चुणूक मुंबई व पुण्यातील दोन सभेत दिसून आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाने ‘चला जिंकूया’ विधानसभा अभियानाअंर्तगत शिवसंकल्प यात्रा सुरु केली आहे. निवडणुकीपूर्वी दोन तीन महिने अगोदर सुरु करण्यात आलेल्या संर्पकयात्रांचा फायदा ठाकरे यांना लोकसभा निवडणुकीत झाला. हेच तंत्र कायम ठेवून ठाकरे यांनी २७ जुलैच्या वाढदिवसानंतर शिवसंकल्प यात्रा सुरु केली आहे. त्याअगोदर सर्व संर्पकप्रमुखांना प्रत्यके जिल्हा, तालुका, आणि पंचायत पिंजून काढण्याचा सल्ला दिला आहे. ही विधानसभा निवडणूक ठाकरे यांच्या अस्तित्वासाठी फार महत्वाची आहे. लोकसभा निवडणुकीत काही पराजय ठाकरे यांच्या जिव्हारी लागले आहेत. यात ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, या पराभवांचा समावेश आहे. या लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याचे ठाकरे यांचे लक्ष आहे. मुंबईतील पदाधिकाऱ्यांच्या सभेत त्यांनी फडणवीस यांना निर्वाणीचा इशारा दिला. शिवसेना भाजप युती काळात ‘सख्ये मित्र’ असलेले ठाकरे फडणवीस आता ‘पक्के वैरी’ झाले आहेत. मित्र शत्रू झाल्यानंतर तो इरेला पेटत असल्याची अनेक उदाहरणे भारतीय राजकारणात आहेत. निवडणुकीनंतर ‘एकतर तू राहशील नाहीतर मी राहीन’ असा निर्वाणीचा इशारा ठाकरे यांनी फडणवीस यांना दिला. या टीकेला ‘ठाकरे यांचे डोके फिरलय’ असे उत्तर देऊन फडणवीस यांनी ही टीका फारशी मनावर घेतली नाही.

हेही वाचा – कारण राजकारण: धार्मिक ध्रुवीकरण साटम यांना बाधणार?

हेही वाचा – भाजपकडून वाझेंच्या ‘कुबड्या’ घेत आरोपांचे सत्र; अनिल देशमुख यांची टीका

पुण्यातील सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काही दिवसांपूर्वी ठाकरे पवार यांच्यावर सडकून टीका केली होती. अमित शहा हे तर देशावर आक्रमण करणाऱ्या अहमद अब्दालीचे वंशज असल्याचे म्हटले आहे. राज्यातील भाजप नेते या टीकेला उत्तर देत आहेत. दोन्ही शिवसंकल्प सभांमध्ये ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जहरी टीका टाळली आहे. पक्ष फोडण्याचे शिंदे यांनी केलेले धाडस हे भाजपच्या पाठिंब्याशिवाय शक्य नाही हे जगजाहीर आहे. त्यामुळे शिंदे, अजित पवार यांना लक्ष्य न करता मोदी, शहा, फडणवीस या भाजप नेत्यांवर टीका करीत आहेत. या नेत्यांवर बोचरी टीका केल्यास त्याची सर्व पातळीवर दखल घेतली जात असल्याचे गणित ठाकरे यांच्या लक्षात आले आहे. त्यासाठी ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत या नेत्यांवर जहरी टीका करण्याची व्यूहरचना आखली आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray ignoring the shinde group uddhav thackeray is targeting the bjp print politics news ssb