नागपूर : रामटेक हा शिवसेनेचाच बालेकिल्ला आहे, मात्र आम्ही लोकसभेत ही जागा काँग्रेसला सोडताना कुठलाही कद्रूपणा केला नाही, अशी आठवण करून देत विधानसभेत ही जागा शिवसेना ठाकरे गटच लढणार, असे खुद्द उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे सूचित केल्याने नागपूर जिल्ह्यात सर्व जागा लढणार असे जाहीर करणाऱ्या काँग्रेसला तो इशारा मानला जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत जागांच्या वाटपावरून रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.

माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रविवारी नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे उद्घाटन झाले. त्यानंतर झालेल्या सभेत ठाकरे यांनी भाषणातून जागा वाटपाबाबतची पक्षाची भूमिकाच अप्रत्यक्षपणे मांडली. रामटेक लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र पक्षफुटीमुळे काँग्रेसने या जागेवर दावा केला आणि ठाकरे यांनी तो मान्य करीत ही जागा काँग्रेससाठी सोडली. काँग्रेसने ही जागा जिंकली तरी त्यात शिवसेनेचा वाटा होता. याची आठवण ठाकरे यांनी कळमेश्वरच्या सभेत करून दिली. कारण काँग्रेसने काटोल वगळता रामटेकसह सर्व पाच जागा लढण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळेच ठाकरे यांनी रामटेक हा शिवसेनेचाच बालेकिल्ला आहे याची आठवण व्यासपीठावर बसलेल्या काँग्रेस नेत्यांना करून दिली. त्यामुळे रामटेकसाठी शिवसेना आग्रही असणार हे स्पष्ट झाले.

आणखी वाचा-Udhayanidhi Stalin : ‘सनातन’ला डेंग्यू, मलेरिया म्हणणार्‍या उदयनिधींना उपमुख्यमंत्रीपद, द्रमुकची धुरा? स्टॅलिन यांनी उत्तराधिकारी नेमला?

ठाकरे गटाकडून वाढीव जागेची मागणी

ठाकरे यांनी त्यांच्या नागपूर दौऱ्यात पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत रामटेकसह हिंगणा, कामठी, शहरातील दक्षिण, पूर्व आणि मध्य नागपूर या सहा विधानसभा मतदारसंघावर दावा करण्याबाबत चर्चा झाली. भाजपसोबत युती असताना काटोलची जागा एकीकृत शिवसेनेकडे होती. तेथे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अनिल देशमुख विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे ही जागा तेच लढणार आहेत. त्यामुळे ठाकरे गट रामटेकसह हिंगणा, कामठी मतदारसंघावर दावा करण्याची शक्यता आहे. दुसरीकडे शहरात काँग्रेसने सर्व सहा जागांवर दावा आहे. तर शिवसनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दक्षिण, मध्य आणि पूर्व नागपूर मतदारसंघाची मागणी केली आहे. मात्र काँग्रेसचे शहर अध्यक्ष व आमदार विकास ठाकरे यांनी काँग्रेसच सर्व सहा जागा लढणार हे जाहीर केले आहे. शिवसेनेची रामटेक वगळता नागपूर शहरात एकाही मतदारसंघात स्वबळावर विजय संपादन करण्याइतकी राजकीय शक्ती नाही. अशा परिस्थितीत ठाकरे सेनेची मागणी अवाजवी असून लोकसभा निवडणुकीमध्ये सांगलीमध्ये जो प्रकार झाला, त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारात येत नाही, असे काँग्रेसच्या एका नेत्यांचे म्हणणे आहे. एकूणच शिवसेना ठाकरे गटाकडून होणारी जागांची वाढीव मागणी व त्याला काँग्रेसचा असलेला विरोध लक्षात घेता जागा वाटपावरून शिवसेना आणि काँग्रेस हे दोन महाविकास आघाडीतील पक्ष समोरासमोर येण्याची चिन्हे आहेत.

आणखी वाचा-Chirag Paswan : उत्तर प्रदेशमध्ये सपा आणि काँग्रेसला नवं आव्हान; चिराग पासवान यांनी आखली मोठी योजना

आमदार आशीष जयस्वाल यांचे तळ्यात मळ्यात

पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे आणि २०१९ मध्ये अपक्ष लढून विजयी होणारे रामटेकचे विद्यमान आमदार आशीष जयस्वाल यांनी प्रथम उद्धव ठाकरे यांना पाठिंबा जाहीर केला होता. ठाकरे मुख्यमंत्रीपदावरून गेल्यानंतर त्यांनी शिंदेंना पाठिंबा दिला. मात्र अद्याप त्यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला नाही. त्यामुळे जयस्वाल यावेळी शिंदे यांच्या शिवसेनेकडून लढणार की पुन्हा अपक्ष म्हणूनच रिंगणात उतरणार हे अद्याप स्पष्ट झाले नाही. जयस्वाल यांनी पक्ष प्रवेश करावा म्हणून शिंदे गटाकडून प्रयत्न सुरू आहे. मात्र जयस्वाल यांचे अद्यापही तळ्यात- मळ्यातच सुरू आहे.