UP Bypoll 2024 : उत्तर प्रदेशात १० जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. त्या दृष्टीने राज्यातील सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. लोकसभेतील पराभवानंतर ही पोटनिवडणूक भाजपासाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे, तर इंडिया आघाडी त्यांची विजयी घोडदौड कायम ठेवण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र, त्यापूर्वीच काँग्रेस आणि समाजवादी पक्षात जागावाटपावरून मतभेद आहेत की काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

ही चर्चा सुरू होण्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे, समाजवादी पक्षाने काँग्रेसला दोन जागांचा प्रस्ताव दिला आहे, तर काँग्रेस पाच जागा लढण्यावर ठाम आहे. खरं तर ज्या १० जागांवर ही पोटनिवडणूक होणार आहे, त्यापैकी पाच जागांवर एनडीएचे तर उर्वरित पाच जागांवर समाजवादी पक्षाचे आमदार होते. त्यामुळे एनडीएचे आमदार असलेल्या पाच जागा आपल्याला मिळाव्यात, अशी काँग्रेसची मागणी आहे.

राजकीय विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार, १० पैकी पाच जागांची मागणी करणं म्हणजे राज्यात समाजवादी पक्षाच्या बरोबरीने उभं राहण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने १७ जागांवर निवडणूक लढवली होती, तर समाजवादी पक्षाने ६३ जागांवर निवडणूक लढवली होती. मात्र, लोकसभा निवडणुकीतील यशानंतर आता काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला आहे, त्यामुळेच की काय आता विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस ५०-५० फॉर्म्युल्याची मागणी करत आहे.

हेही वाचा –Smriti Irani for Delhi CM: अमेठीत पराभव आता दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी संभाव्य दावेदार, भाजपा दिल्लीची सूत्रे स्मृती इराणींच्या हाती देणार?

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात पक्षाची स्थिती मजबूत झाल्याचं काँग्रेस नेत्यांचं म्हणणं आहे. यासंदर्भात बोलताना काँग्रेसचे वरिष्ठ नेते म्हणाले, ”२०२७ च्या विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून या पोटनिवडणुकीकडे बघितलं जातं आहे, त्यामुळे आम्ही पाच जागांची मागणी केली आहे. मात्र, आम्ही संपूर्ण १० जागांवर तयारी करतो आहे. जेणेकरून आम्हाला २०२७ साठी उमेदवारांची चाचपणी करता येईल किंवा या जागा मित्रपक्ष लढवणार असतील तर त्यांनाही मदत होईल.” याशिवाय अन्य एका नेत्याने सांगितले की, ”आमची पाच जागांची मागणी कायम आहे. याबाबतीत आम्ही तडजोड करणार नाही, अन्यथा आम्ही संपूर्ण १० जागांवर निवडणूक लढवू.”

महत्त्वाचे म्हणजे काँग्रेसने पोटनिवडणूक होणाऱ्या १० मतदारसंघात पर्यवेक्षकांची नियुक्तीही केली आहे. तसेच एआयसीसीच्या पदाधिकाऱ्यांसह नवनिर्वाचित खासदारांनाही मैदानात उतरवलं आहे. प्रत्येकाला विशिष्ट मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. या नेत्यांमध्ये उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रमुख अजय राय, काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेत्या आराधना मिश्रा, एआयसीसी सचिव धीरज गुजर, तौकीर आलम, निलांशु चतुर्वेदी आणि सत्य नारायण पटेल आणि खासदार उज्ज्वल रमण सिंग, इम्रान मसूद, केएल शर्मा, राकेश राठोड आणि तनुज पुनिया या नेत्यांचा समावेश आहे.

हेही वाचा – ‘एक देश, एक निवडणूक’, राज्यावर परिणाम नाही; पालिका निवडणुकांबाबत संदिग्धता

समाजवादी पक्षाच्या नेत्याने दिली प्रतिक्रिया

दरम्यान, काँग्रेसच्या या तयारीबाबत समाजवादी पक्षाच्या नेत्यानेही प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसकडून दबावतंत्राचा वापर केला जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच पुढे बोलताना, ”काहीही झालं तरी या निवडणुकीत काँग्रेस आणि समाजवादी पक्षाची युती होईल हे निश्चित आहे”, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

या १० जागांवर होणार पोटनिवडणूक :

उत्तर प्रदेशातील मीरापूर, गाझियाबाद, खैर (राखीव), कुंडरकी, कर्हा, फूलपूर, शिशामाऊ, मिल्कीपूर (राखीव), कथेरी आणि माझवान या १० जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. यात नऊ जागा लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर रिक्त झाल्या आहेत, तर एका जागेवरील आमदाराला न्यायालयाने दोषी ठरवल्याने ती जागा रिक्त झाली आहे.