Uttar Pradesh Politics : गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशच्या राजकारणात जेपी सेंटर हा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. जयप्रकाश नारायण इंटरनॅशनल सेंटर (जेपी सेंटर) यावरून सत्ताधारी भारतीय जनता पार्टी आणि समाजवादी पार्टी आमने-सामने आले आहेत. या जेपी सेंटरवरून सपा नेते अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेश सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. झालं असं की, अखिलेश यादव यांनी गुरुवारी जेपी सेंटरमध्ये जाऊन राज्यातील विद्यमान सरकारवर गंभीर आरोप केले. अखिलेश यादव यांना जेपी सेंटर येथील जयप्रकाश नारायण यांच्या पुतळ्याला जयंतीनिमित्त पुष्पहार घालायचा होता. मात्र, प्रशासनाने त्यांना परवानगी दिली नाही. त्यामुळे अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेश सरकारवर हल्लाबोल केला.

जयप्रकाश नारायण इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरचे गेल्या सात वर्षांपासून बांधकाम सुरू आहे. याच सेंटरवरून समाजवादी पक्ष (एसपी) आणि योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. दरम्यान, मागील वर्षीही अखिलेश यादव आणि त्यांच्या समर्थकांना या जेपी सेंटरमध्ये जाण्यापासून रोखण्यात आलं होतं. तेव्हाही मोठा गोंधळ झाला होता.

हेही वाचा : ‘लाडकी बहीण’ला ‘महालक्ष्मी’ने उत्तर? काँग्रेसच्या जाहीरनाम्यात समावेशाची शक्यता

जेपी सेंटर काय आहे?

लखनौमधील राम मनोहर लोहिया पार्कला लागून १८ एकरामध्ये पसरलेल्या या कन्व्हेन्शन सेंटरची कल्पना दिल्लीतील इंडिया हॅबिटॅट सेंटरच्या धर्तीवर करण्यात आली आहे. त्यात जिम, आलिशान हॉटेल आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स याशिवाय जयप्रकाश नारायण यांच्या जीवनावर आणि विचारसरणीचे संग्रहालय आहे. २०१३ मध्ये समाजवादी राजवटीत या प्रकल्पाचे काम सुरू झाले. मात्र, २०१७ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी कामाचा काही भाग पूर्ण होऊ शकला. पण त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये भाजपाची सत्ता आली. ११ ऑक्टोबर २०१६ रोजी सपा संस्थापक मुलायम सिंह यादव यांनी प्रकल्पाच्या एका भागाचे उद्घाटन केले होते.

सूत्रांच्या माहितीनुसार, मार्च २०१३ मध्ये या प्रकल्पाची अंदाजे किंमत २६५ कोटी रुपये होती. मात्र, २०१७ मध्ये ती किंमत वाढून सुमारे ८०० कोटी रुपये झाली. अखिलेश यादव यांनी पद सोडले तोपर्यंत प्रकल्पाचे ८० टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा समाजवादी पक्षाने केला होता. मात्र, वाढलेल्या खर्चांच्या आरोपांमुळे प्रकल्पाचे काम थांबले. दरम्यान, भाजपाच्या राजवटीमध्ये २०२२ मध्ये या प्रकल्पाचे काम लखनौ विकास प्राधिकरण (LDA) ज्याने प्रकल्पासाठी नोडल एजन्सी म्हणून काम केले. तसेच ते पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न केला. तथापि, सरकारी अधिकाऱ्यांनी मागील सरकारच्या कार्यकाळातील कथित विसंगतींकडे लक्ष वेधले. ज्यामुळे भाजपाच्या राजकीय सूडबुद्धीने प्रकल्प पूर्ण होत नसल्याचा आरोप अखिलेश यादव यांनी केला.

हेही वाचा : मावळतीचे मोजमाप: व्यवसाय आणि कौशल्य शिक्षण; सभागृहात सर्वसमावेशक चर्चा आवश्यक

‘सपा’ची राजकीय रणनीती काय?

जेपी सेंटर या ठिकाणी जाण्यापासून अखिलेश यादव यांना रोखल्यामुळे त्यांनी भारतीय जनता पार्टीला फटकारले. अखिलेश यादव यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर टीका केली. तसेच इंदिरा गांधींच्या काँग्रेस सरकारविरोधात जेपीच्या आणीबाणीविरोधी आंदोलनावरही सपा प्रमुखांनी भर दिला. पक्षाने दावा केला की, मुलायम यांनी २०१६ मध्ये प्रकल्पाचा एक भाग असलेल्या जेपी नारायण सेंटरचे उद्घाटन केले होते आणि त्याला समाजवादाचे संग्रहालय म्हटले होते. यासंदर्भात बोलताना एका समाजवादी पक्षाच्या नेत्याने म्हटलं की, “अखिलेश यादव हे समाजवादी चळवळीचा चेहरा आहेत. काँग्रेस असो वा भाजपा. त्यांनी समाजवादी नेत्यांना योग्य स्थान दिलेले नाही. ते समाजवादी विचारसरणी विसरले असतील. मात्र, समाजवादी विचारसरणी जिवंत ठेवण्याचं काम सपा करत आहे”, असं ते म्हणाले.

काँग्रेसने काही प्रतिक्रिया दिली का?

काँग्रेस अखिलेश यादव यांच्यावर नाराज असल्याचे बोलले जात. मात्र, असे असले तरी काँग्रेसने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितलं की, “समाजवादी पक्षाचे नेते बोलतात वेगळे आणि वागतात वेगळे. आता समाजवादी पक्षाने आम्हाला विश्वासात न घेता आगामी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी १० पैकी सहा उमेदवारांची घोषणा केली. मात्र, समाजवादी पक्षाचे हे दबावाचे राजकारण आहे”, असं एका काँग्रेस नेत्याने म्हटलं आहे.