‘वंचित’च्या राजकारणाचे बदलते सूर? काँग्रेससह मविआ प्रथम लक्ष्य; संविधान व आरक्षणाचा मुद्दा केंद्रस्थानी

वंचित बहुजन आघाडीने गत वर्षभरात घेतलेल्या वेगवेगळ्या भूमिकेवरून पक्षाच्या राजकारणाची दिशा बदलत असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे.

vanchit Bahujan aghadi politics
‘वंचित’च्या राजकारणाचे बदलते सूर? काँग्रेससह मविआ प्रथम लक्ष्य; संविधान व आरक्षणाचा मुद्दा केंद्रस्थानी (छायाचित्र – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

अकोला : भारत जोडो अभियानाचे संयोजक योगेंद्र यादव यांना वंचित बहुजन आघाडीने अकोल्यात भाषणापासून रोखत काँग्रेसविरोधाचा सूर आळवला. संविधान व आरक्षण हे मुद्दे वंचित आघाडीच्या नेहमीच केंद्रस्थानी असतात. याच मुद्द्यांवरून आता वंचितने काँग्रेससह मविआला प्रथम लक्ष्य केल्याचे दिसून येत आहे. वंचित बहुजन आघाडीने गत वर्षभरात घेतलेल्या वेगवेगळ्या भूमिकेवरून पक्षाच्या राजकारणाची दिशा बदलत असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे.

महाराष्ट्रातील राजकाणारणात ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी विविध प्रयोग करून स्वबळावर आपले आदराचे वेगळे स्थान निर्माण केले. सामाजिक अभियांत्रिकीचा त्यांचा ‘अकोला पॅटर्न’ संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. २०१९ मध्ये ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी वेगवेगळ्या छोट्या-मोठ्या समाजाची एकत्रित मोट वंचित बहुजन आघाडीच्या झेंड्याखाली एकत्रित बांधण्याचा प्रयत्न केला. वंचितची वैचारिक प्रणाली संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, समाजवादी, पुरोगामी आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित आघाडीला मोठा जनाधार लाभला. त्यांचे उमेदवार विजयी झाले नसले तरी घेतलेल्या मतांच्या टक्केवारीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. गेल्या पाच वर्षांत राज्यातील राजकारणात बरेच परिवर्तन घडले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी समविचारी म्हणून काँग्रेस आघाडीसोबत जाण्याच्या दृष्टीने वंचित व त्यांच्यात चर्चेच्या फैरी झडल्या. मात्र, जागा वाटप व इतर मुद्द्यांवरून एकमत न झाल्याने वंचित पुन्हा एकदा स्वबळावर लढली. या निवडणुकीत वंचित आघाडीला अपेक्षित मते मिळाली नाही. २०१९ च्या तुलनेत २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत वंचितच्या मतांचा टक्का घसरला. वंचितची परंपरागत दलित व मुस्लिमांची मतपेढी मविआसह विशेषत: काँग्रेसकडे वळल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. लोकसभा निवडणुकीत वंचितने काँग्रेसला काही जागांवर पाठिंबा दिल्यावरही अकोल्यात ॲड. प्रकाश आंबेडकरांविरोधात काँग्रेसने उमेदवार दिला. ॲड.आंबेडकरांच्या पराभवासाठी काँग्रेसच जबाबदार असल्याची भावना वंचितच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे वंचितमध्ये काँग्रेसविरोधात तीव्र रोषाची भावना आहे.

हेही वाचा : Shrikant Pangarkar : गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपीची शिंदेंच्या शिवसेनेतील प्रवेशानंतर दोनच दिवसांत हकालपट्टी; कोण आहे श्रीकांत पांगारकर?

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजप पुन्हा सत्तेत आल्यास संविधान बदलणार, हा मुद्दा सर्वप्रथम ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी उचलला होता. त्यानंतर तोच मुद्दा काँग्रेसने देशव्यापी केला. आरक्षणावरील काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या कथित वक्तव्यावर देखील वंचितने आक्षेप घेतला. आरक्षणावरून न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे काँग्रेसने स्वागत केले. त्यामुळे काँग्रेसची भूमिका देखील आरक्षण विरोधी असल्याचा वंचितचा आरोप आहे. संविधान व आरक्षण विरोधी म्हणून भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर ॲड. प्रकाश आंबेडकर व वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी कायम तोंडसुख घेतले जाते. गेल्या काही महिन्यांपासून मात्र ॲड. प्रकाश आंबेडकर व वंचितच्या नेत्यांनी सर्वप्रथम काँग्रेस व मविआतील घटक पक्षांवर निशाणा साधल्याचे दिसून येत आहे. वंचितच्या राजकीय भूमिकेत हा बदल तर नव्हे ना? असा प्रश्न आता चर्चिला जात आहे.

हेही वाचा : यवतमाळ मतदारसंघ : प्रत्येकी नऊ वेळा अल्पसंख्याक व कुणबी उमेदवारास संधी

विचारवंत, उच्चशिक्षितांसह काँग्रेसवर टीकास्त्र

धम्मचक्र प्रवर्तनदिनानिमित्त अकोल्यातील धम्म मेळाव्यात ॲड. प्रकाश आंबेडकर काय भूमिका मांडतात? याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष असते. यंदा या मेळाव्यात ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी विचारवंत, समाजातील उच्चशिक्षितांसह काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडले होते. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दलित, मुस्लिमांची मतपेढी पुन्हा एकदा पक्षाकडे वळवण्याच्या दृष्टीने वंचितचे प्रयत्न आहेत.

ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे लोकसभा निवडणुकीपूर्वी विचार वेगळे होते. त्यानंतर त्यांचे विचार बदलले आहेत. राजकारणात हे होत असते.

योगेंद्र यादव, संयोजक, भारत जोडो अभियान.

हेही वाचा : मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात भाजपचाच दबदबा ?

अण्णा हजारे यांच्यासोबत काँग्रेसविरोधी आंदोलनात योगेंद्र यादव यांनी भ्रष्टाचारावरून राळ उठवली होती. आता तेच याेगेंद्र यादव काँग्रेसच्या समर्थनार्थ मते मागत फिरत आहेत. हे सुज्ञ मतदारांनी ओळखले. वंचितची भूमिका स्थिर असून भाजपप्रमाणेच काँग्रेस देखील आरक्षण विरोधी आहेत. आरक्षण व संविधानाला विरोध करणारे हे आमचे विरोधक आहेत.

डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, प्रदेश उपाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Vanchit bahujan aghadi criticizes congress yogendra yadav on issue of constitution reservation print politics news css

First published on: 21-10-2024 at 19:19 IST
Show comments