बुलढाणा: निवडणूक व्यवस्थापनात अग्रेसर असलेल्या भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी सर्वप्रथम उमेदवार जाहीर केले. मात्र बुलढाणा जिल्ह्यातील भाजपचा बालेकिल्ला असलेल्या मलकापूर मधील उमेदवार जाहीर झाला नाही. पहिली यादी जाहीर व्हायला सात दिवस लोटल्यावर आज प्रसिद्ध झालेल्या दुसऱ्या यादीत माजी आमदार चैनसुख संचेती यांचे नाव झळकले.

तब्बल सातव्यांदा संचेती हे मलकापूर च्या रणसंग्रामात उतरले असून त्यांचे राजकीय उपद्रव मूल्य आणि संभाव्य बंडखोरी लक्षात घेऊन पक्षश्रेष्ठीनी मलकापूर मध्ये भाकर फिरविण्याचा निर्णय मागे घेतला आहे. यामुळे आता मतदारसंघात आघाडी विरुद्ध युती अशी चुरशीची दुरंगी लढत अटळ आहे.मागील लढतीतील प्रतिस्पर्धी एकमेकांना आव्हान देणार आहे.

शिस्तबद्ध समजल्या जाणाऱ्या मलकापूर भाजपा मध्ये उघड गटबाजी आणि दुफळी निर्माण झाली आहे. माजी आमदार चैनसुख संचेती विरुद्ध शिवचंद्र तायडे या दोन गटात असलेला वाद मुध्या वरून गुध्या पर्यंत पोहोचला. बाजार समिती सभापती अविश्वास प्रसंगीं दोन्ही गट रस्त्यावर उतरून एकमेकांना भिडले होते.

याचेच प्रतिबिंब भाजपच्या उमेदवारीच्या स्पर्धेत दिसून आले. संचेती आणि तायडे यांनी उमेदवारी साठी जोर लावला. स्वतः तायडे आणि त्यांच्या पत्नी व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उमा तायडे यांनी उमेदवारी मागितली. यामुळे संभाव्य धोका लक्षात घेता पक्षाने संघाचे (खामगाव) जिल्हा संपर्क प्रमुख मनिष लखानी यांना संधी देण्याचा विचार सुरू केला.यासाठी संचेती आणि तायडे यांची समजूत घालण्याचे प्रयत्न केले.यामुळे तायडे यांनी माघार घेतली. मात्र संचेती आणि समर्थकांनी आक्रमक भूमिका घेतली. प्रसंगी बंडखोरीची तयारी दर्शविली. या परिस्थितीत उमेदवारीचा तिढा दिल्ली पर्यंत गेला. मात्र प्रदेश उपाध्यक्ष संचेती यांची ताकद आणि उपद्रव मूल्य लक्षात घेऊन पक्षाने या जुन्या जाणत्या नेत्याला न दुखावण्याचा निर्णय घेतला. अखेर सहाव्यादा भाजपने चैनसुख संचेती यांच्या उमेदवारी वर शिक्कामोर्तब केले आहे.

हे ही वाचा… मेळघाटमधून केवलराम काळे यांना भाजपची उमेदवारी; राजकुमार पटेलांना धक्‍का

थेट लढत

यामुळे आता मलकापूर मतदारसंघात काट्याची दुरंगी लढत रंगणार हे उघड आहे.मागील लढतीत असलेले काँग्रेसचे राजेश एकडे आणि भाजपचे संचेती हेच यंदाही समोरासमोर भिडणार आहे. मागील लढतीत एकडे हे संचेती यांना पराभूत करून ‘जायंट किलर’ ठरले होते. यावेळी आमदार एकडे पुन्हा बाजी मारतात की संचेती मागील लढतीचा बदला घेतात हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

बंडखोरी ते भाजप सर्वेसर्वा

भाजप बंडखोर ते भाजपचे मतदारसंघातील सर्वेसर्वा असा संचेती यांचा मलकापूर मधील राजकीय प्रवास राहिला आहे.१९९५ मध्ये भाजपने उमेदवारी नाकारल्याने संचेती यांनी बंड पुकारत अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. ते आमदार झाले आणि नंतर भाजपचे सर्वेसर्वा झाले. १९९५ ते २०१४ दरम्यान ते सलग पाच वेळा आमदार राहिले. २०१९ मध्येही त्यांना भाजपाने उमेदवारी दिली. काँग्रेसने राजेश एकडे यांना उमेदवारी देण्याचा काँग्रेसचा डाव यशस्वी झाला. तीन दशकातील संचेतींचा तो पहिला पराभव ठरला. त्यांच्या विरुद्ध निर्माण झालेली ‘अँटी इन्कबन्सी’, पंचवीस वर्षे आमदार आणि मतदारसंघाचा अपेक्षित विकास न करणे हे दोन मुद्दे त्यांच्या विरोधात गेले.

हे ही वाचा… ‘अहेरी’वरून महाविकास आघाडीत बिघाडी? शरद पवार गटाविरोधात उमेदवार देण्यावर काँग्रेस ठाम

काँग्रेसमधे बंड!

दरम्यान काँग्रेसने आमदार एकडे यांना पुन्हा संधी दिली आहे.मात्र यामुळे काँग्रेसचे काही नेते प्रामुख्याने माजी नगराध्यक्ष हरीश रावळ नाराज झाले आहे.ते बंड करण्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे.