अकोला : अकोला, वाशीम जिल्ह्यात सर्वच पक्ष, आघाड्यांमध्ये उदंड बंड झाले. त्यामुळे पक्षांच्या उमेदवारांपुढे मतविभाजनाची मोठी अडचण निर्माण झाली आहे. बंडाचा निशाणा फडकवणाऱ्या नेत्यांची मनधरणी करण्याची कसरत पक्ष नेतृत्वासह उमेदवारांना करावी लागेल. अन्यथा ऐन दिवाळीत मतदारसंघांमधील राजकीय समीकरणाला ‘फटाके’ लागण्याची चिन्हे आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक ठिकाणी इच्छुकांनी बंडाचा झेंडा हातात घेतला. ४ नोव्हेंबरला अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत असल्याने त्या अगोदर बंडखोरांना माघार घेण्यासाठी तयार करण्याचे आव्हान पक्षांपुढे राहील. अकोला जिल्ह्यात अकोला पश्चिम मतदारसंघात सर्वाधिक बंडखोरी झाली. या मतदारसंघातून लढण्यासाठी सर्वच पक्षात इच्छुकांची प्रचंड गर्दी होती. पक्षांचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर पक्षांतर्गत नाराजी पसरून अनेकांनी इतर पक्ष किंवा अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले. भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अशोक ओळंबे यांनी प्रहार जनशक्ती पक्षाकडून उमेदवारी दाखल केली. भाजप नेते तथा माजी नगराध्यक्ष हरीश अलिमचंदानी यांनी देखील अपक्ष म्हणून दंड थोपाटले. काँग्रेसचे डॉ. झिशान हुसेन वंचितच्या तिकिटावर निवडणूक रिंगणात उतरले. भाजपचे संजय बडोणे, काँग्रेसचे माजी महापौर मदन भरगड, शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख राजेश मिश्रा, प्रकाश डवले यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले. अकोला पूर्व मतदारसंघात केवळ काँग्रेसचे डॉ.सुभाष कोरपे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. मूर्तिजापूर मतदारसंघात दोन पक्षांतर केल्यानंतर रवी राठी यांनी अपक्ष अर्ज भरला. वंचितच्या पुष्पा इंगळे यांनी देखील अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली. बाळापूरमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे यांनी बंड करून अपक्ष म्हणून रिंगणात उतरले.

वाशीम जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात बंड आहे. सर्वाधिक लक्ष रिसाेड मतदारसंघाकडे लागले आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या अमित झनक यांना काट्याची लढत देणारे माजी मंत्री अनंतराव देशमुख यांनी भाजप व अपक्ष म्हणून दोन अर्ज भरले आहेत. भाजपकडून रिसोडमध्ये उमेदवारी मिळेल या आशेवर अनंतराव देशमुखांनी पुत्रांसह पक्ष प्रवेश केला होता. मात्र, हा मतदारसंघ शिवसेनेसाठी सुटल्याने येथून भावना गवळी यांना उमेदवारी मिळाली. त्यानंतर अनंतराव देशमुखांनी उमेदवारी दाखल केली. आता रिसोडमध्ये मैत्रीपूर्ण लढत, बंड की माघार, याकडे सर्वांचे लक्ष राहील. कारंजा मतदारसंघात सर्वाधिक ५० उमेदवारांनी ६१ अर्ज भरले आहेत. तिकीट वाटपाच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये नाट्यमय घडामोडी होऊन भाजपचे ॲड. ज्ञायक पाटणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सई डहाके भाजपच्या उमेदवार ठरल्या. गेल्या वेळेस तिसऱ्या क्रमांकाची मते घेणारे युसुफ पुंजानी एमआयएमकडून मैदानात आहेत. उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी राष्ट्रवादी व वंचितला सोडचिठ्ठी दिली. कारंजामध्ये ऐनवेळी वंचितने उमेदवार बदलून काँग्रेसचे सुनील धाबेकर यांना संधी दिली. कारंजामध्ये लक्षणीय अपक्ष उमेदवार आहेत. वाशीम मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार लखन मलिक यांचा पत्ता कट करून श्याम खोडे यांच्यावर विश्वास दाखवला. त्यामुळे भाजपतील अनेक इच्छुकांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली. प्रचारापूर्वी बंड करणाऱ्यांची समजूत काढण्याचे प्रमुख लक्ष्य उमेदवारांचे राहणार आहे. त्यावरच राजकीय समीकरण अवलंबून राहतील.

हे ही वाचा… नाशिकमध्ये पुन्हा नामसाधर्म्याचे डावपेच

…म्हणून सर्वाधिक बंडखाेरी

अकोला व वाशीम जिल्ह्यातील बहुतांश मतदारसंघांमध्ये बंडखोरीची लागण झाली. प्रत्येकी तीन प्रमुख पक्षांची महायुती व महाविकास आघाडी असल्याने सर्वच पक्षातील इच्छुकांना संधी मिळाली नाही. त्यामुळे यावेळेस विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक बंडखोरी झाल्याचे चित्र आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vidhan sabha election 2024 in akola washim district rebel challenge to political leaders print politics news asj