हरिद्वारमधून काँग्रेसने माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांचे पुत्र वीरेंद्र रावत यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, मुलाच्या उमेदवारीसाठी हरीश रावत यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांवर दबाव आणल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. महत्त्वाचे म्हणजे मागील दोन निवडणुकांत हरिद्वारमध्ये काँग्रेसचा पराभव झाला आहे. तरीही काँग्रेसने रावत कुटुंबीयांवर विश्वास दाखवल्याने विविध राजकीय चर्चांनाही उधाण आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वीरेंद्र रावत हे राजकारणात येणारे रावत कुटुंबातील चौथे सदस्य आहेत. यापूर्वी हरीश रावत यांच्या पत्नी रेणुका रावत यांनी २००४ आणि २०१४ मध्ये अनुक्रमे अल्मोडा आणि हरिद्वारमधून लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र, या दोन्ही निवडणुकांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

हेही वाचा – काँग्रेसमधून भाजपात येताच मिळालं लोकसभेचं तिकीट; कोण आहेत नवीन जिंदाल?

याशिवाय हरीश रावत यांची मुलगी अनुपमा रावत यांनी २०२२ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभेची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांनी भाजपाचे आमदार स्वामी यतीश्वरानंद यांचा पराभव केला होता. मात्र, याच निवडणुकीत हरीश रावत यांचा लालकुआन मतदारसंघात पराभव झाला होता. २०१७ मध्ये झालेल्या पराभवानंतर हरीश रावत यांच्यासाठी ही निवडणूक अतिशय महत्त्वाची होती.

दरम्यान, हरीश रावत हे काही वर्षांपासून मुलाच्या उमेदवारीसाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवर दबाव आणत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र, हरीश रावत यांनी या आरोपांचे खंडन केलं आहे. या संदर्भात त्यांनी फेसबुक पोस्ट केली आहे. वीरेंद्र यांचे पक्षाप्रति असलेले समर्पण आणि कठोर मेहनत यांच्या भरवशावर त्यांना तिकीट मिळाल्याचे त्यांनी म्हटलं आहे. तसेच सेवा, समर्पण, समन्वय, संघटनात्मक कौशल्ये आणि विकासात्मक दृष्टी या बाबतीत वीरेंद्र माझ्या तुलनेत कमी पडणार नाहीत हे मी पूर्ण विश्वासाने सांगतो, असेही ते म्हणाले.

वीरेंद्र रावत यांनी दिल्लीत आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयात असतानाच ते एनएसयूआयशी जोडले गेले. तिथूनच त्यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. ते एनएसयूआयच्या दिल्ली विभागाचे सरचिटणीसही होते. त्यानंतर त्यांनी उत्तराखंडमध्ये परत येऊन युवक काँग्रेसबरोबर काम केले. सध्या ते उत्तराखंड प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आहेत.

हेही वाचा – पश्चिम बंगालमधील जागावाटपावरून डाव्या पक्षांत मतभेद; सीपीआय (एम) आपल्याच चक्रव्यूहात अडकत असल्याची चिन्हे?

काँग्रेसने १२ मार्च रोजी उत्तराखंडमधील पाचपैकी तीन लोकसभा मतदारसंघांसाठी उमेदवारांची घोषणा केली होती. मात्र, हरिद्वार आणि नैनिताल या जागांबाबतच्या उमेदवारांबाबत संभ्रम होता. त्यामुळे दोन्ही जागांबाबत उमेदवारांची घोषणा करण्यात आली नव्हती.

अखेर काँग्रेसने या जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यानुसार हरिद्वारमधून वीरेंद्र रावत आणि नैनितालमधून माजी राष्ट्रीय सचिव प्रकाश जोशी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. जोशी यांनी २०१२ आणि २०१७ मध्ये कालाधुंगी मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र, दोन्ही निवडणुकांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virendra rawat will be congress candidate for loksabha poll in haridwar know in details spb
Show comments