Maha Vikas Aghadi Wani Assembly Constituency :वणी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे  मनसुभे उधळून लावत महाविकास आघाडीत  ही जागा शिवसेना उबाठा गटाने मिळविली. उबाठाकडून येथे संजय देरकर यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली. त्यामुळे काँग्रेसचा एक गट नाराज झाला असून येथे बंडखोरी होवून चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

भाजपने वणी मतदारसंघातून विद्यमान आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. मनसेने पक्षाचे उपाध्यक्ष राजू उंबरकर यांना मैदानात उतरविले तर महाविकास आघाडीने शिवसेना उबाठाचे संजय देरकर यांना उमेदवारी दिली. सध्या या मतदारसंघात तिहेरी लढत होणार असे दिसत असले तरी, संजय देरकर यांच्या उमेदवारीने काँग्रेससह शिवसेना उबाठातही नाराजी आहे.

हेही वाचा >>>Chimur Assembly Constituency: चिमूर क्रांतिभूमीत भांगडिया विरुद्ध डॉ. वारजुकर यांच्यात लढत; माना समाजाच्या मतदारांची निर्णायक भूमिका

वणीची जागा काँग्रेसला सुटणार की शिवसेना उबाठाला जाणार याबाबतच बरीच स्पर्धा होती. अखेर शिवसेना उबाठाने बाजी मारली, पण आता उमदेवार संजय देरकर यांना स्वपक्षासोबत मित्रपक्षातील काँग्रेसमधील नाराजांचेही आव्हान आहे. पूर्वीपासून काँग्रेसची सत्ता राहिलेला वणी विधानसभा काँग्रेसला सुटेल, अशीच चर्चा होती. काँग्रेसचे माजी आमदार वामनराव कासावार हे येथून उमेदवारीसाठी इच्छुक होते. याशिवाय संजय खाडे, प्रा. टिकाराम कोंगरे, आशिष खुलसंगे हेसुद्धा काँग्रेसकडून लढण्यासाठी इच्छुक होते. चंद्रपूर-वणीच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनीही हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला यावा म्हणून प्रयत्न चालविले होते. संजय खाडे यांना येथून उमेदवारी मिळावी म्हणून धानोरकर यांनी वरिष्ठांकडे शब्द टाकला होता, अशी माहिती आहे. काँग्रेसची उमेदवारी मिळावी म्हणून संजय खाडे हे गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई, दिल्ली वारी करीत होते. अनेक नेत्यांच्या भेटी गाठी घेवून त्यांनी उमेदवारीचा शब्द घेतला होता. मात्र ही जागा अनपेक्षितपणे शिवसेना उबाठाच्या वाट्याला गेल्याने काँग्रेस इच्छुकांचा हिरमोड झाला. त्यामुळे संजय खाडे आता बंडखोरी करतील, अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. खाडे सध्या दिल्लीत ठाण मांडून आहेत. येथील उमेदवार बदलून ही जागा काँग्रेसच्या वाट्याला यावी व उमेदवारी मिळावी, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.  वणीत मतांचे विभाजन व्हावे, असा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. बंडखोरीनंतर चौरंगी लढत झाल्यास ती भाजपच्या पथ्यावर पडणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत वादाचा फायदा भाजपला होईल, अशी चर्चा आहे.

जनभावनेचा आदर करून निर्णय

वणी विधानसभा काँग्रेसला सुटेल, असा विश्वास होता. आपण ही निवडणूक लढवावी, अशी जनतेची इच्छा आहे. मात्र जागा शिवसेना उबाठाला सुटल्याने जनभावनेचा आदर करून निर्णय घ्यावा लागेल, असा सूचक इशारा काँग्रेसचे संजय खाडे यांनी दिला.