Ajit Pawar on Mahayuti: महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांना आता काही महिने उरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. लोकसभेला फारसे यश मिळाले नसल्यामुळे शरद पवार यांच्यापासून वेगळे होऊन काय साध्य झाले? असा प्रश्न अजित पवारांच्या बाबतीत त्यांचे विरोधक उपस्थित करत आहेत. द इंडियन एक्सप्रेसला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये अजित पवार यांनी महायुतीमध्ये ६० जागा लढविण्याचा मानस व्यक्त केला. तसेच मुख्यमंत्रीपदासाठी चढाओढ आणि महायुतीशी आघाडी करून धर्मनिरपेक्ष विचारांशी तडजोड… अशा काही मुद्दयांवर त्यांनी रोखठोक भाष्य केले. त्यांची ही मुलाखत प्रश्नोत्तराच्या स्वरुपात खालीलप्रमाणे…

प्र. राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत केवळ एक जागा जिंकता आली, नेमके चुकले कुठे?

अजित पवार – विरोधकांकडून निवडणुकीआधी अपप्रचार करण्यात आला. ‘अबकी बार ४०० पार’च्या घोषणेचा चुकीचा अर्थ काढला गेला. संविधान बदलण्यासाठी ४०० हून अधिक जागा हव्या आहेत, असा त्यातून अर्थ काढला गेला. तसेच समान नागरी संहिता, नागरिकत्व दुरुस्ती कायद्याची (सीएए) अंमलबजवाणी आणि आरक्षण रद्द करण्यासाठी भाजपाला ४०० हून अधिक जागा हव्या असल्याचा अपप्रचार करण्यात आला. तसेच या घोषणेमुळे यश हमखास मिळणार असे समजून आमचे कार्यकर्तेही गाफील राहिले. आम्ही पराभूत झालो असलो तरी आमच्या मतदानाच्या टक्केवारीत केवळ ०.५ टक्क्यांचा फरक आहे.

हे वाचा >> अजित पवार गटामुळे भाजपला गळती?

प्र. तुम्ही नुकतीच घोषणा केली होती की, यंदा बारामतीमधून निवडणूक लढवणार नाही?

अजित पवार – मी असे म्हणालो नाही. कार्यकर्त्यांची इच्छा आहे की, जय पवारने बारामतीमधून विधानसभा निवडणूक लढवावी, यावर तुमचे मत काय? असा प्रश्न मला विचारण्यात आला होता. मी फक्त एवढेच म्हणालो की, मी बारामतीमधून सात ते आठ वेळा निवडणूक लढलेलो आहे आणि लोकशाहीमध्ये निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. त्यानंतर याबद्दल तर्क-वितर्क लढविले गेले. पण कुणी कुठून निवडणूक लढवावी, याचा निर्णय पक्ष घेत असतो आणि पक्षाने अद्याप निर्णय घेतलेला नाही.

प्र. तुम्ही जन सन्मान यात्रा काढली, त्याचा उद्देश काय?

अजित पवार – राज्यातील जनतेचे आभार व्यक्त करणे हा आमचा उद्देश आहे. माझी लाडकी बहीण योजना, मोफत वीज, गॅस सिलिंडरवर अनुदान, व्यावसायिक प्रशिक्षण योजना आणि ओबीसी व आर्थिक दुर्बल घटकातील महिलांसाठी शैक्षणिक शुल्क आणि परीक्षा शुल्कात १०० टक्के सवलत अशा पाच योजना आम्ही लागू केलेल्या आहेत. या यात्रेच्या माध्यमातून या योजनांचीही माहिती दिली जात आहे. या यात्रेत महिलांचा उस्फुर्त असा प्रतिसाद लाभत आहे.

प्र. तुम्ही लाडकी बहीण योजना म्हणता, पण महायुतीमधील घटक पक्ष मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असे म्हणत आहेत. श्रेयवादाची लढाई दिसत आहे का?

अजित पवार – अजिबात नाही. एखाद्या योजनेचे लांबलचक नाव असेल तर त्याचा उल्लेख थोडक्यात केला जातो. यामुळे सदर योजना लोकांच्याही लक्षात राहते.

हे ही वाचा >> Anjali Damania : “राज्याचे अर्थमंत्री दहावी पास अन् क्लर्कसाठी…”, अंजली दमानिया यांची अजित पवारांवर टीका

प्र. सुनेत्रा पवार यांना सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभे करून चूक केली, असे तुम्ही म्हणाला होता आणि त्यानंतर राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात आले?

अजित पवार – मी जे काही बोलतो, ते अगदी मनापासून बोलतो. जसे की, मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, तेव्हा मी लगेच माफी मागितली. आम्ही या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार आरोपींवर कडक कारवाई करू, असेही सांगितले. त्याचप्रमाणे एकेदिवशी मला असे वाटले की, मी पत्नी सुनेत्राला बारामतीमधून निवडणुकीस उभे करायला नको होते. मला कुणी सांगितले आणि मी केले, असे नाही. म्हणून मी तसे बोललो.

प्र. तुम्ही असेही म्हणालात की, आता शरद पवार यांच्या विरोधात बोलणार नाही?

अजित पवार – फक्त शरद पवार साहेबच नाही तर मी कुणाच्याही विरोधात बोलणार नाही, असे ठरविले आहे. मी माझे काम करत राहणार आणि त्यातूनच लोकांना उत्तर देणार.

प्र. शरद पवार आणि सुप्रिया सुळेंशी आता कसे संबंध आहेत?

अजित पवार – ते त्यांच्या कामात व्यस्त आहेत आणि मी माझ्या कामात गुंतलो आहे.

प्र. महायुतीमध्ये जागावाटप कुठपर्यंत आले आहे?

अजित पवार – निवडून येण्याच्या क्षमतेवर भर देऊन जागावाटप केले जाईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी एकत्र बसून प्रत्येक मतदारसंघाचा बारकाईने अभ्यास करून त्याठिकाणी कोणता पक्ष मजबूत आहे, याचे निरीक्षण करून जागावाटपाचा निर्णय घेऊ. २०१९ च्या निवडणुकीत आम्ही ५६ जागा जिंकलो होतो. तसेच सहा ते सात अपक्ष आमदार आमच्याबरोबर होते. त्यामुळे आम्ही ६० जागा लढण्यास इच्छुक आहोत. पण यापेक्षा नक्कीच अधिक जागा आणि त्याही मेरीटवर मिळाव्यात यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.

प्र. राष्ट्रवादीला मागच्या काळात दलित, अल्पसंख्याकांची मते मिळत होती. पण उजवी विचारसरणी आणि हिंदुत्ववादी पक्षांसोबत युती केल्यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते का?

अजित पवार – विधानसभेचे मतदान होईपर्यंत याबाबत निश्चित काही सांगता येणार नाही. पण आमच्या बाजूने आम्ही सर्व घटकांसाठी काम करण्याचा प्रयत्न करत आहोत. सर्वांसाठी कल्याणकारी योजना राबविण्यात आल्या आहेत. मौलाना आझाद महामंडळासाठी आम्ही ५०० कोटी दिले आहेत. आता बघू पुढे काय होते.

प्र. विचारधारेत अंतर असूनही भाजपा आणि शिवसेनेशी कसे जुळून घेतले?

अजित पवार – आम्ही जेव्हा युतीची चर्चा केली होती, तेव्हाच धर्मनिरपेक्ष विचारांशी तडजोड केली जाणार नाही, हे स्पष्ट केले होते. पण जेव्हा मला असे प्रश्न विचारले जातात. तेव्हा मी माध्यमांनाच उलट प्रश्न विचारतो. हिंदुत्ववादी विचारसरणी असलेल्या शिवसेनेशी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आघाडी करून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले होते. मीही त्या सरकारचा भाग होतो. त्यामुळे हा प्रश्न त्यांना का नाही विचारला जात. तेव्हा पुरोगामी विचार आणि धर्मनिरपेक्ष विचारधारा कुठे गेली होती?

आम्ही महायुतीत सामील झाल्यानंतरच हे प्रश्न का विचारले जात आहेत. आम्ही फक्त विकासाच्या मुद्द्यावर महायुतीत आलो आहोत. यासाठी धर्मनिरपेक्ष विचारांशी तडजोड केली जाणार नाही, ही आमची स्पष्ट भूमिका आहे. शरद पवार यांनीही २०१४ साली भाजपाला बाहेरून पाठिंबा दिला होता.

प्र. महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण?

अजित पवार – नाही. सध्यातरी आम्ही तीनही घटक पक्ष महायुतीला बहुमत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. त्यानंतर मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत चर्चा होईल. पण महायुतीचाच मुख्यमंत्री होईल, हे निश्चित.