Haryana Assembly Election 2024: हरियाणा विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने उत्तर भारतातील राजकीय वातावरण तापलं आहे. येत्या ५ ऑक्टोबर रोजी हरियाणामध्ये एकाच टप्प्यात पूर्ण मतदान होणार आहे. मात्र, गेल्या महिन्याभरात हरियाणामध्ये सत्ताधारी व विरोधी पक्षांकडून झालेल्या प्रचारात शेतकरी आंदोलनाइतकाच हरियाणातील जातीय समीकरणांचा प्रभावही दिसून आला. विशेषत: भाजपा व मित्रपक्षांच्या सभा व भाषणांमधून सातत्याने हरियाणात १४ वर्षांपूर्वी घडलेल्या एका घटनेचा संदर्भ दिला जातो. त्यातून हरियाणातील जातीभेदाची जखम अद्याप भळभळतीच असल्याचं स्पष्ट होत आहे.

हरियाणातील हिसार जिल्ह्याच्या मिर्चपूर गावात ८८ वर्षांचे रामपाल यांचं घर आहे. एप्रिल २०१० मध्ये घडलेल्या त्या घटनेच्या खुणाच जणूकाही अंगावर वागवत असल्याप्रमाणे ते घर जवळपास मोडकळीस आलं आहे. रस्त्यावर दुतर्फा लावलेल्या भाजपाच्या झेंड्यांकडे पाहून ते म्हणतात, “आता आमच्या गावात पूर्णपणे सौहार्दाचं वातावरण आहे. कोणताही वाद नाही. भूतकाळात जे घडलं ते आता संपलं आहे”,असं रामपाल सांगतात. वाल्मिकी समुदायाच्या जवळपास डझनभर घरांच्या त्यांच्या वस्तीत २०१० च्या एप्रिल महिन्यात एका जाट समूहानं आग लावली. यात रामपाल यांचं संपूर्ण घर जळालं.

काँग्रेसवर भाजपाकडून ‘दलितविरोधी’ ठपका!

पण १४ वर्षांपूर्वी घडलेल्या त्या घटनेचे पडसाद अद्याप हरियाणाच्या राजकारणावर प्रत्येक निवडणुकीत उमटताना पाहायला मिळतात. याही निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री व हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर व मुख्यमंत्री नायब सिंग सैनी या सगळ्यांनीच त्या घटनेचा आपल्या भाषणांमध्ये उल्लेख करत काँग्रेसवर ‘दलितविरोधी’ असल्याचा ठपका ठेवला आहे.

मिर्चपूरची घटना घडली तेव्हा हरियाणाची सूत्र भूपिंदर सिंग हुड्डा यांच्या हातात होती. या जाळपोळीत दोन दलित व्यक्तींचा मृत्यू झाला होता. त्यामुळे काँग्रेस व भूपिंदर सिंग हुड्डा यांना लक्ष्य करण्यासाठी भाजपाकडे मिर्चपूर हा एक कळीचा मुद्दा ठरला आहे.

रामपाल राहात असलेली वाल्मिकी समाजाची वस्ती गावाच्या इतर वस्तीपासून वेगळी आहे. समोरच्या बाजूच्या वस्तीत ५२ वर्षांचा जोगिंदर सिंग नुकताच १४ वर्षांची शिक्षा भोगून गावात परतला आहे. दलितांवरच्या हल्ला प्रकरणी त्याला शिक्षा सुनावण्यात आली होती. तो म्हणतो, “गावात नक्कीच सौहार्दाचं वातावरण आहे. पण व्हायचं ते नुकसान झालं आहे. मग ते (दलित) कोणत्या शांतीविषयी बोलत आहेत?” असा संतप्त सवाल जोगिंदर सिंग करतो.

मतदानात जातीय तणावाचे पडसाद!

दरम्यान, मिर्चपूर गाव असणाऱ्या नारनौंद विधानसभा मतदारसंघातील मतदानामध्येही तिथल्या जातीय तणावाचे पडसाद उमटल्याचं पाहायला मिळतं. जाट मतदारांचं या मतदारसंघात वर्चस्व पाहायला मिळतं. पण २०१९ साली जननायक पक्षानं राम कुमार गौतम यांच्या रूपात बिगर जाट उमेदवार दिला. त्यांनी भाजपाचे उमेदवार कॅप्टन अभिमन्यू यांचा पराभव केला. आता गौतम यांना भाजपानं सफिदोनमधून उमेदवारी दिली आहे. नारनौंदमध्ये मात्र जाट विरुद्ध जाट असा थेट सामना यंदा पाहायला मिळणार आहे. भाजपानं इथून अभिमन्यू यांना पुन्हा उमेदवारी दिली असून काँग्रेसनं जस्सी पेटवर यांना तिकीट दिलं आहे.

Narendra Modi in Sonipat: “काँग्रेसच्या डीएनएमध्येच आरक्षणविरोध, त्यांची चौथी पिढी…”, नरेंद्र मोदींचा सोनीपतमध्ये हल्लाबोल!

शेतकरी व महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनामुळे हरियाणातील जाट समुदायामध्ये भाजपविरोधी मतप्रवाह तयार झाल्याचं दिसत आहे. मिर्चपूरमध्ये जाट समुदाय काँग्रेस उमेदवार पेटवार यांच्या बाजूने झुकल्याचं सध्या पाहायला मिळत आहे. पण दुसऱ्या बाजूला मिर्चपूरमधील दलित समुदाय मात्र भाजपाच्या दिशेनं झुकल्याचं दिसत आहे. १४ वर्षांपूर्वीच्या त्या घटनेचा तणाव अजूनही या भागात दिसून येत आहे.

“..तर अग्निवीर गँगस्टर बनतील!”

दरम्यान, अग्निवीर योजनेवरूनही जनतेमध्ये मोदी सरकारबाबत संताप दिसून येत आहे. “एकदा का हे अग्निवीर ४ वर्षांनी सेवेतून परत येतील, तेव्हा ते शस्त्रास्त्रांचं प्रशिक्षण घेतलेले बेरोजगार असतील. मग ते काय करणार? वैतागून ते गँगस्टरही बनू शकतात कॅप्टन अभिमन्यू स्वत: एक माजी लष्करी अधिकारी आहेत. सरकार जेव्हा ही योजना तयार करत होतं, तेव्हा ते कुठे होते? ते शेतकरी असल्याचाही दावा करतात. मग दिल्लीच्या सीमेवर भाजपा सरकार शेतकऱ्यांवर निर्दयपणे अत्याचार करत होतं, तेव्हा हे कुठे गेले होते? तेव्हा खट्टर किंवा सैनी कुठे होते?” असा संतप्त सवाल ३० वर्षीय संदीप उपस्थित करतो, तेव्हा शेतकऱ्यांमधली ही नाराजी दिसून येते.