नांदेड: महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसोबत नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक होऊ नये, अशी भाजपाच्या स्थानिक तसेच राज्य स्तरावरील काही नेत्यांची इच्छा असली, तरी ती बारगळण्याची शक्यता आहे. कारण लोकसभा सचिवालयाने नांदेडची जागा रिक्त झाल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाला ३० ऑगस्ट रोजीच कळविली असल्याचे समोर आले आहे.

एप्रिल-मे महिन्यात पार पडलेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नांदेडमधून काँग्रेसतर्फे निवडून आलेले खासदार वसंत चव्हाण यांचे २६ ऑगस्ट रोजी अल्पशा आजारामुळे निधन झाले होते. त्यानंतर नांदेड जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसोबतच लोकसभेच्या पोटनिवडणुकीची चर्चा सुरू झाली. काँग्रेस पक्षाने वसंतरावांचे पुत्र प्रा.रवींद्र चव्हाण यांची उमेदवारी जवळपास निश्चित केली, तर भाजपामध्ये काही इच्छुकांची नावे राजकीय आघाडीवर चर्चेत आहेत.लोकसभा सचिवालयाने नांदेड लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाल्याबाबत निवडणूक आयोगाला अधिकृतपणे ३० ऑगस्टला कळविले आहे.

हेही वाचा >>>नाशिकमध्ये महायुतीचे विविध कार्यक्रमांद्वारे सामाजिक अभिसरण

.या अधिसूचनेत खा.वसंत चव्हाण यांचे २६ ऑगस्ट रोजी हैदराबाद येथील रुग्णालयात निधन झाल्याचा उल्लेख करून त्याच दिवसांपासून त्यांची लोकसभेतील जागा रिक्त झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. ही बाब लक्षात घेता नांदेड लोकसभा मतदारसंघात निर्धारित मुदतीत पोटनिवडणूक घ्यावी लागणार असून, ही बाब निवडणूक आयोगाच्या कार्यक्रम पत्रिकेवर अधिकृतपणे आली आहे.

हेही वाचा >>>मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात भाजपची मोर्चेबांधणी सुरू; पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांचा ठाणे जिल्हा दौरा

काँग्रेसने पोटनिवडणुकीसाठी रवींद्र चव्हाण यांचे नाव निश्चित केल्यानंतर वसंतरावांच्या अकाली निधनामुळे निर्माण झालेल्या सहानुभूतीचा लाभ त्यांना होऊ शकेल म्हणून तूर्त पोटनिवडणूक होऊ नये, अशी मांडणी भाजपाच्या काही आमदारांनी पक्षाच्या नेत्यांकडे केली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत छ. संभाजीनगरात झालेल्या विभागीय बैठकीत नांदेडच्या पोटनिवडणुकीचा उल्लेख झाला नव्हता. या पार्श्वभूमीवर लोकसभा सचिवालयाची अधिसूचना लक्षात घेता लोकसभेची पोटनिवडणूक विधानसभेसोबतच होईल, असे काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचे म्हणणे आहे. आमचे हे म्हणणेच पक्षाची भूमिका असून विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमासोबतच लोकसभा पोटनिवडणुकीचीही घोषणा आयोगाने करावी, अशी अपेक्षा प्रा.रवींद्र चव्हाण यांनी येथे व्यक्त केली.