Devendra Fadnavis On Love Jihad: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला आता अवघे काही दिवस उरले असताना सत्ताधारी भाजपाने मतदारांचे ध्रुवीकरण होईल, अशा मुद्द्यांना हात घालायला सुरुवात केली आहे. या आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत गायीला राज्य मातेचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (दि. ३० सप्टेंबर) एका जाहीर सभेत लव्ह जिहाद बद्दल चिंता व्यक्त करून राज्यात लाखो प्रकरणे घडली आहेत, असा उल्लेख केला. तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ४८ पैकी १४ लोकसभा मतदारसंघात व्होट जिहाद झाला असल्याचा दावा फडणवीस यांनी केला. भाजपाकडून मतांचे ध्रुवीकरण होईल, असे मुद्दे उपस्थित केले जात असल्याबाबतचा लेख द इंडियन एक्सप्रेसने प्रकाशित केलेला आहे.

महाराष्ट्रात पहिल्यांदा लव्ह जिहादचा विषय सकल हिंदू समाज या संघटनेने मागच्या वर्षी उस्थित केला. ज्यामुळे त्यांच्या विरोधात द्वेषपूर्ण भाषणाच्या तक्रारी झाल्या. भाजपा नेत्यांनी आतापर्यंत या विधानापासून अंतर राखले होते. मात्र गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनीही या विषयाला हात घालून आता त्याचे महत्त्व वाढवले आहे.

हे वाचा >> राहुल गांधींची भेट, पवारांचे डावपेच; साखरपट्टा जिंकण्यासाठी महाविकास आघाडीची रणनीती काय?

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाची २३ जागांवरून ९ जागांवर घसरण झाली. आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा यश मिळविण्यासाठी भाजपाची धडपड सुरू आहे. महायुतीमधील शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्याशी जागा वाटपाची चर्चा संथगतीने सुरू असल्यामुळे भाजपाला आता २८८ पैकी १०० जागांवर विजय मिळविण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. जेणेकरून महायुतीमध्ये मोठा भाऊ म्हणून त्यांना राहता येईल.

भाजपासाठी मात्र यंदाची निवडणूक सोपी नाही. २०१४ साली भाजपाचा १२२ मतदारसंघात विजय झाला होता. २०१९ साली त्यांची संख्या घटली आणि १०५ जागांवर त्यांचा आकडा घसरला. २०१४ साली भाजपाने स्वबळावर २६० मतदारसंघात निवडणूक लढविली होती. तर २०१९ साली शिवसेनेबरोबर युतीमध्ये १६४ जागांवर निवडणूक लढविली होती. तसेच यावेळीही तीन पक्षांची युती असल्यामुळे त्यांना १६० पेक्षा अधिक जागा मिळण्याची शक्यता कमीच आहे.

जानेवारी महिन्यात श्रीराम मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर महाराष्ट्रात हिंदू मतांबद्दल गाफिल राहिल्याचा फटका भाजपाला बसला. त्यामुळे या पराभवाची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी पक्षाच्या प्रमुख नेत्यांकडून आता लव्ह आणि व्होट जिहाद, तसेच गाय अशा मुद्द्यांना आता हात घातला जात आहे.

हे ही वाचा >> अग्रलेख : राज्यमाता आणि गोठ्यातले आपण!

भाजपामधील सूत्रांनी सांगितले की, हिंदू मते मिळविण्यासाठी शिवसेना हा भाजपाचा थेट प्रतिस्पर्धी आहे. त्यामुळे भाजपा आपली आक्रमकता आणखी वाढवत आहे. तसेच हे मुद्दे उचलल्यामुळे शिवसेना (उद्धव ठाकरे) गट यांनाही घेरता येणे शक्य आहे. काँग्रेसशी आघाडी केल्यामुळे शिवसेना (उद्धव ठाकरे) गटावर हिंदुत्व सोडल्याची टीका होत आहे.

गायीचा मुद्दा का उपस्थित केला?

गायीला राज्य मातेचा दर्जा देण्याबाबत भाजपाचे नेते सांगतात की, देशी वाणाच्या गायींचे रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी त्यांना विशेष दर्जा देणे आवश्यक होते. कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, गोरक्षणाकडे आपण वैज्ञानिकदृष्टीने पाहिले पाहीजे. गाय हा आजही शेती आणि शेतकऱ्यांचा मुख्य आधार आहे. गायीपासून मिळणारे उत्पादने याचा बहुउद्देशीय उपयोग होतो. २०१४ साली भाजपा आणि शिवसेना (संयुक्त) यांचे एकत्र सरकार असताना गोवंश हत्याबंदीचा कायदा केला गेला होता.

हे ही वाचा >> SC on Cast Discrimination: ‘स्वातंत्र्यानंतरही आपण तुरुंगातील जातीभेद हटवू शकलो नाही’, सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी व्यक्त केली खंत

नितेश राणेंना अभय

मागच्या वर्षी जेव्हा सकल हिंदू समाजाने लव्ह जिहाद आणि लँड जिहाद विरोधात मोर्चे काढले, तेव्हा त्याविरोधात कारवाई करण्याची अनेक स्तरातून मागणी झाली. मात्र महायुती सरकारने त्याकडे कानाडोळा केला. तसेच महंत रामगिरी महाराजांच्या विधानानंतर राज्यभरात मुस्लीम संघटनांनी निषेध व्यक्त केला. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र संताच्या केसालाही धक्का लागणार नाही, अशी भूमिका घेतली. तसेच भाजपाचे आमदार नितेश राणे यांनीही रामगिरी महाराज यांचा बचाव करताना काही वादग्रस्त विधाने केली. रोष निर्माण झाल्यानंतर नितेश राणे यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला, मात्र अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.

भाजपाच्या एका नेत्याने नाव न उघड करण्याच्या अटीवर सांगितले की, कठोर हिंदुत्व हवे असलेल्या लाखो लोकांचा आवाज म्हणून नितेश राणे पुढे आले आहेत. त्यामुळेच भाजपाकडून त्यांना राजाश्रय मिळत आहे.

काही दिवसांपूर्वी कोल्हापूरच्या विशाळगड किल्ल्यावरील अतिक्रमणाविरोधात कारवाई करताना मुस्लीम वास्तूंना हानी पोहोचवली गेली. त्यानंतर भाजपाच्या हेतूबद्दल शंका उपस्थित केली गेली. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते की, सर्व काही हिंदू-मुस्लीम चष्म्यातून पाहणे योग्य होणार नाही. प्रार्थनास्थळे, ऐतिहासिक वास्तू आणि सार्वजनिक ठिकाणांवरील अवैध बांधकामावर नियमानुसारच कारवाई करण्यात येत आहे.

गायीला राज्यमातेचा दर्जा दिल्यानंतर या निर्णयावर टीका करताना शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी म्हटले की, गायीला राज्य माता असा दर्जा देऊन भाजपाने वीर सावरकर यांचा अपमान केला आहे. सावरकर यांनी गायीबद्दल जे विचार माडंले होते, त्याची पार्श्वभूमी संजय राऊत यांच्या विधानाला होती.