आपल्या निर्णयावर एरवी ठाम राहणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजीची तात्काळ दखल घेत रायगड आणि नाशिक जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यामागे दिल्लीचा हस्तक्षेप कारणीभूत ठरल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फडणवीस यांनी दावोसला रवाना होण्यापूर्वी शनिवारी रात्री पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली. त्यात रायगडच्या पालकमंत्रीपदी आदिती तटकरे तर नाशिकमध्ये गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली होती. रायगडचे पालकमंत्रीपद चांगलेच वादग्रस्त ठरले. आदिती तटकरे नको अशी जाहीर भूमिका शिवसेनेच्या जिल्ह्यातील नेत्यांनी घेतली होती. तटकरे यांची नियुक्ती होताच रायगडमध्ये हिंसक प्रतिक्रिया उमटली. रास्ता रोको करण्यात आला. टायर्स पेटवून देण्यात आले. भरत गोगावले यांनी रायगड पालकमंत्रीपदासाठी जाहीरपणे वक्तव्य केले होते. तटकरे यांची नियुक्ती झाल्याने गोगावले यांची पार नाचक्की झाली. दुसरे म्हणजे त्यांची कोणत्याची जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली नव्हती. नाशिकमध्ये शिवसेनेच्या दादा भुसे यांची पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्याची शिवसेनेची मागणी होती. पण या जिल्ह्यात मुख्यमंत्री फडणवीस यांचे विश्वासू गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली होती.

आणखी वाचा-भंडारा जिल्ह्याच्या वाट्याला पुन्हा ‘पार्सल’ पालकमंत्री; परंपरा कायम

सरकार स्थापन झाल्यापासून मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाला एकापाठोपाठ एक धक्के दिले होते. शिंदे गटाच्या काही मंत्र्यांची नियुक्ती फडणवीस यांच्यामुळे झाल्याची चर्चा होती. शिंदे यांना गृह खाते देण्यासही विरोध झाला होता. एस. टी. बस खरेदीची निविदा रद्द करण्यात आली. सिडकोच्या अध्यक्षपदावरून शिंदे यांचे विश्वासून संजय शिरसाट यांची उचलबांगडी करण्यात आली. याशिवाय छोटे-मोठे अनेक निर्णय बदलण्यात आले. यामुळे शिंदे गटात अस्वस्थता होती. पालकमंत्रीपदाच्या नियुक्तीवरून शिंदे गटाला मोठा धक्काच दिला.

या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी ही बाब फडणवीस यांच्याकडे व्यक्त केली. याशिवाय शिंदे यांनी दिल्लीतील भाजप नेत्यांकडे नाराजी व्यक्त केल्याचे समजते. यानंतरच फडणवीस यांनी दावोस दौऱ्यावर असताना सामान्य प्रशासन विभागाला रायगड व नाशिकच्या पालकमंत्रीपदाच्या नियुक्त्यांना स्थगिती देण्याचा आदेश दिला. त्यानुसार रविवारी सुट्टी असतानाही रात्री दहाच्या सुमारास सामान्य प्रशासन विभागाने स्थगिती आदेश जारी केला.

आणखी वाचा-बुलढाणा पालकमंत्री निवडीतही धक्कातंत्र; राष्ट्रवादीची बाजी

शिंदे यांनी दिल्लीत नाराजी व्यक्त केल्यानेच ही स्थगिती देण्यात आल्याचे शिंदे यांच्या गोटातून सांगण्यात येत आहे. शिंदे यांच्या नाराजीची भाजपला दखल घ्यावी लागली. रायगडच्या पालकमंत्रीपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत वाद होता. शिवसेना आणि राष्ट्रवादीतील वादाला भाजपकडून गेल्या वर्षभरात अधिक फोडणी देण्यात आली होती. परंतु रायगडपेक्षा नाशिकच्या स्थगितीकडे अधिक गांभीर्याने बघितले जात आहे. नाशिकमध्ये फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू किंवा भाजपमधील संकटमोचक म्हणून गणले जाणारे गिरीश महाजन यांच्या नियुक्तीला फडणवीस यांना स्थगिती द्यावी लागली आहे. नाशिकच्या स्थिगितीमागे वेगळा अर्थ काढला जात आहे.

दिल्लीच्या हस्तक्षेपामुळेच फडणवीस यांनी स्थगिती दिल्याची चर्चा आहे. मंत्र्यांची संख्या, खातेवाटप, पालकमंत्र्यांची नियुक्ती, यापाठोपाठ लगेचच स्थगिती यामुळे विक्रमी संख्याबळ मिळूनही महायुतीमध्ये आलबेल नाही हे सरकार स्थापन झाल्यापासून वारंवार समोर येत आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why did chief minister devendra fadnavis immediately take note of eknath shindes displeasure print politics news mrj