भंडारा : विधानसभा निवडणुकीचा मुहूर्त जवळ येत असला तरी महायुती आणि महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा कायमच आहे. त्यातच भंडारा-पवनी विधानसभा मतदारसंघाच्या जागेचा पेच सोडवणे युतीसह आघाडीसाठीही डोकेदुखी ठरत असल्याचे दिसते आहे. आघाडी आणि युतीत सहभागी सर्वच पक्ष या जागेवर आपापला दावा सांगत आहेत. यामुळे ही जागा नेमकी कुणाच्या वाट्याला जाणार, याबाबतची उत्सुकता ताणली गेली आहे.

हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असल्यामुळे येथे दलित आणि ओबीसींची मते नेहमीच निर्णायक ठरतात. २००९ मध्ये शिवसेनेने तिकीट नाकारल्याने नरेंद्र भोंडेकर यांनी अपक्ष निवडणूक लढली आणि निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी शिवसेनेला समर्थन दिले. शिवसेनेतील फुटीनंतर ते एकनाथ शिंदेंसोबत गेले. विद्यमान आमदार असल्याने शिंदे आपल्याला तिकीट देतीलच, या आशेने भोंडेकर यांनी शिवसेनेत अधिकृत प्रवेशही केला. महायुतीतर्फे आपल्यालाच तिकीट मिळेल, असा दावा करणारे आमदार भोंडेकर आता पर्याय खुला असल्याचे सांगत आहेत. यावरून शिंदेंच्या शिवसेनेकडूनही त्यांचा अपेक्षाभंग झाला, असे स्पष्ट होते. विशेष म्हणजे, शिंदेंच्या या ‘नरेंद्र’विरोधात आता उद्धव ठाकरेंच्या ‘नरेंद्र’ने दंड थोपटले आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून नरेंद्र पहाडे यांना उमेदवारी मिळेल, अशी मतदारसंघात चर्चा आहे. तसे झाल्यास येथे ‘नरेंद्र’ विरुद्ध ‘नरेंद्र’ असा सामना पहायला मिळू शकतो.

आणखी वाचा-Mumbai Assembly Elections 2024 : विधानसभेचे पूर्वरंग: मुंबई कोणाची? महायुती की महाविकास आघाडीची

दुसरीकडे, युती आणि आघाडीतील मित्रपक्ष भाजप आणि काँग्रेस या जागेवरील दावा सोडायला तयार नाहीत. अनुप डोके हे भाजपचे उमेदवार असतील, अशीही चर्चा आहे. डोके यांच्याबरोबर भाजपच्या गोटातील आणखी काही नेत्यांचीही नावे चर्चेत आहेत.

लोकसभा निवडणुकीतील विजयामुळे महाविकास आघाडीत काँग्रेसचे पारडे जड झाले आहे. शिवाय, जिल्हापरिषद, पंचायत समिती, नगर परिषद, नगरपंचायत आणि ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसने चांगली कामगिरी केल्यामुळे काँग्रेसचा नेत्यांचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. यामुळे काँग्रेसमधून ११ नेत्यांनी उमेदवारीसाठी अर्ज केले आहे.

आणखी वाचा-Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय भवितव्य काय? दिल्ली की महाराष्ट्र? भाजपासमोर यक्ष प्रश्न

आमदारांच्या विरोधात नाराजी

भंडारा-पवनी विधानसभेसाठी कधी नव्हे एवढा निधी आणल्याचा दावा आमदार भोंडेकर करतात. मात्र, गेल्या पाच वर्षांत या विधानसभा क्षेत्रातील एकही काम मार्गी लागले नाही. ते एकही नवीन उद्योग आणू शकले नाहीत. बंद पडलेले उद्योग सुरू करण्यात आणि डबघाईस गेलेल्या पितळ उद्योगांस उभारी देण्यात ते सपशेल अपयशी ठरले. भंडारा-पवनी महामार्ग अद्यापही पूर्ण झालेला नाही, असे सर्वसामान्यांसह राजकीय वर्तुळात बोलले जाते. शहरातील रस्त्यांचे भूमिपूजन झाले, मात्र नवीन वस्त्यांमधील रस्त्यांचा प्रश्न कायमच आहे. काही ठिकाणी चांगले रस्ते फोडून त्यावर पुन्हा रस्ते बांधण्यात आले. यामुळे सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागला. हे सर्व मुद्दे आमदार भोंडेकर यांना भोवणार असल्याची चर्चा आहे.