अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने सातत्याने विविध प्रयोग केले. तरीही गेल्या साडेतीन दशकांपासून काँग्रेसला अकोला मतदारसंघ जिंकता आलेला नाही. ॲड. प्रकाश आंबेडकरांना सोबत घेण्याला काँग्रेसची पहिली पसंती आहे. मात्र, वंचितसोबत आघाडी न झाल्यास मतदारसंघातील जातीय समीकरण जुळवण्यासाठी काँग्रेसने चाचपणी सुरू केली. काँग्रेस आगामी लोकसभा निवडणुकीत अकोला मतदारसंघात कुणबी कार्ड खेळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अकोला लोकसभा मतदारसंघ एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जात होता. अगदी सुरुवातीपासून ते १९८४ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत काँग्रेसने आपले वर्चस्व राखले. १९८९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने नेते स्व. भाऊसाहेब फुंडकर यांनी काँग्रेसच्या गडाला सुरुंग लावला. त्यानंतरच्या लोकसभा निवडणुका सातत्याने लढूनदेखील काँग्रेसला अकोल्यात विजय मिळवता आलेला नाही. या मतदारसंघात मधुसूदन वैराळे आतापर्यंतचे काँग्रेसचे शेवटचे खासदार ठरले. १९९८ आणि १९९९ च्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसच्या पाठिंब्यावर विजय मिळवला होता. १९८९, १९९१ व १९९६ मध्ये सलग तीनवेळा भाऊसाहेब फुंडकर यांनी, तर २००४, २००९, २०१४ व २०१९ च्या सलग चार लोकसभा निवडणुका खासदार संजय धोत्रे यांनी जिंकून अकोला मतदारसंघ भाजपचा अभेद्य गड निर्माण केला.

हेही वाचा – भाजपा वापरणार काँग्रेसचा ‘कर्नाटक पॅटर्न’? राजस्थान जिंकण्यासाठी भ्रष्टाचाराचा मुद्दा केंद्रस्थानी!

भाजप, काँग्रेस व वंचित आघाडीमध्ये झालेल्या तिरंगी लढतीत, भाजपला थेट लाभ झाल्याचा अकोला मतदारसंघाचा इतिहास आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर व काँग्रेस एकत्र आल्याशिवाय भाजपचा पराभव होऊ शकत नसल्याचे लोकसभेच्या गेल्या नऊ निवडणुकांच्या निकालांवरून समोर आले. पराभवाची मालिका खंडित करण्याचे मोठे आव्हान काँग्रेसपुढे राहणार आहे.

अकोल्यात काँग्रेसने आतापर्यंत विविध प्रयोग केले आहेत. वेगवेगळ्या जाती, धर्माचे उमेदवार देऊन काँग्रेसने यश मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, काँग्रेसच्या या खेळ्या अपयशी ठरल्या आहेत. १९८९ च्या निवडणुकीत अजहर हुसेन यांच्या रुपाने मुस्लिम उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवला होता. त्यांना २६.०४ टक्के मते मिळाली होती. त्यानंतर १९९१ मध्ये माळी समाजाचे सुधाकर गणगणे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली. त्यांना ३०.६३ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर १९९६ मध्ये मराठा समाजाचे डॉ. संतोष कोरपे काँग्रेसचे उमेदवार होते. त्यांना २३.५० टक्के मतदान पडले. १९९८ आणि १९९९ मध्ये ॲड. प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा असल्याने काँग्रेसचा उमेदवार नव्हता. २००४ मध्ये पुन्हा एकदा माळी समाजाला काँग्रेसने प्रतिनिधित्व दिले. लक्ष्मणराव तायडे यांनी २८.१४ टक्के मतदान मिळवले. २००९ मध्ये घाटोळे पाटील समाजाचे बाबासाहेब धाबेकर यांना काँग्रेसने तिकीट दिल्यावर त्यांनी २४.७३ टक्के मते घेतली होती. २०१४ व २०१९ मध्ये राज्यातील अल्पसंख्यांक म्हणून अकोल्यात मुस्लिम उमेदवार दिला. हिदायत पटेल यांना अनुक्रमे २५.८९ व २२.७१ टक्के मतांवर समाधान मानावे लागले.

हेही वाचा – जमाखर्च : राधाकृष्ण विखे-पाटील, महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकासमंत्री; वादाची परंपरा कायम पण पक्षातील महत्त्व वाढले

गत साडेतीन दशकांचा आढावा घेतला असता काँग्रेसने मुस्लिम समाजाला तीन वेळा, माळी व मराठा समाजाला प्रत्येकी दोन वेळा प्रतिनिधित्व दिले. अकोला मतदारसंघात कुणबी समाजाच्या मतदारांची संख्या मोठी आहे. त्यामुळेच कुणबी समाजाचे नेते स्व. भाऊसाहेब फुंडकर यांनी वर्चस्व राखल्याचे बोलल्या जाते. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ‘मविआ’मध्ये पुन्हा एकदा काँग्रेसने अकोल्यावर दावा केला. ॲड. प्रकाश आंबेडकर सोबत येण्यास इच्छूक नसल्यास स्थानिक नेत्यांनी आपणच लढावे, असा आग्रह काँग्रेसच्या वरिष्ठांकडे आढावा बैठकीत धरला. काँग्रेसकडून डॉ. अभय पाटील, अशोक अमानकर, प्रशांत गावंडे, पुरुषोत्तम दातकर, डॉ. सुधीर ढोणे आदींची नावे चर्चेत आहेत. गठ्ठा मतदार लक्षात घेता काँग्रेस कुणबी समाजाला प्रतिनिधित्व देऊ शकतो, अशी जोरदार चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने मोर्चेबांधणीवर जोर दिला आहे.

काँग्रेस व वंचितमध्ये पाडापाडीचे राजकारण

लोकसभा निवडणुकांमध्ये ॲड. प्रकाश आंबेडकरांना सोबत घेण्याचे प्रयत्न काँग्रेसच्यावतीने झाले. त्यांच्यासाठी अकोला सोडण्याची तयारी असल्याचे काँग्रेस नेत्यांकडून वारंवार बोलल्या गेले. मात्र, दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून केवळ प्रसारमाध्यमांमधूनच चर्चा रंगली. प्रत्यक्षात तडजोड होऊ शकली नसल्याने ते स्वबळावर निवडणूक रिंगणात उतरले. २०१४ व २०१९ मध्ये मुस्लिम मतदार ॲड. प्रकाश आंबेडकरांकडे वळले असते तर त्यांचे पारडे जड होण्याची शक्यता होती. त्यामुळे पाडापाडीच्या राजकारणात सलग दोन निवडणुकांमध्ये काँग्रेसकडून मुस्लिम उमेदवार देण्यात आल्याचा आरोप वंचित आघाडीकडून होतो. आता २०२४ च्या निवणुकीत काँग्रेस व ॲड. आंबेडकर हे एकत्र येतात का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will prakash ambedkar and congress come together in akola print politics news ssb
Show comments