महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या पुण्याच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत. पुण्यातल्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणं, शाखा अध्यक्षपदासाठीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणं असा त्यांचा कार्यक्रम आहे. यावेळी त्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्या १०० व्या वाढदिवसानिमित्त त्यांची भेटही घेतली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्याविषयीच्या आठवणी सांगत त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.

बाबासाहेब पुरंदरे यांनी कधीच इतिहासाला धक्का लावलेला नाही. त्यांनी फक्त खरं तेच सांगितलं. त्यांनी दंतकथा मांडल्या नाहीत, अशा शब्दात बाबासाहेब पुरंदरे यांचं कौतुक केलं आहे. त्यांच्या लिखाणाबद्दल बोलताना ते म्हणाले, मी लहानपणापासून बाबासाहेबांची व्याख्याने ऐकत आलो आहे. त्यांनी त्यांच्या लिखाणातून फक्त सत्य मांडलं आहे. त्यांनी कधीही इतिहासाला धक्का लावलेला नाही. त्यांनी दंतकथा सांगितल्या नाहीत. जेव्हा दंतकथा असतील, त्यावेळी ते तसा उल्लेख करत होते की या दंतकथा आहेत.

ते पुढे म्हणतात, त्यांनी त्यांच्या लिखाणामध्ये कधीच दंतकथांचा शिरकाव होऊ दिला नाही. त्यांच्या कोणत्याही शिवचरित्रामध्ये तुम्हाला कधीच घोरपडीचा किस्सा दिसणार नाही. दंतकथा या ऐकायला छान असतात, पण त्यांचा इतिहासाशी काही संबंध नसतो.

बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर झालेल्या टीकेबद्दल राज ठाकरे म्हणाले, ज्यांना जातीवरुन मतदान हवं आहे, त्यांनी केलेल्या या गोष्टी आहेत. ज्यांना जातीभेद पेरायचा आहे, त्यांनी स्वतः काही वाचायचं नाही आणि अशा गोष्टी पसरवायच्या आणि जातीभेद पसरवून आपली पोटं भरायची. त्यांच्याकडे बाबासाहेबांनी दुर्लक्ष करणंच योग्य होतं.