पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) दहावीची परीक्षा आजपासून (२१ फेब्रुवारी) सुरू होत आहे. यंदा १६ लाख ११ हजार ६१० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत विद्यार्थीसंख्या दोन हजारांनी वाढली आहे.

राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी ही माहिती दिली. परीक्षेसाठी २३ हजार ४९२ माध्यमिक शाळांतून नोंदणी केलेल्या १६ लाख ११ हजार ६१० विद्यार्थ्यांमध्ये ८ लाख ६४ हजार १२० मुले, ७ लाख ४७ हजार ४७१ मुली आणि १९ तृतीयपंथी आहेत. राज्यभरातील ५ हजार १३० मुख्य परीक्षा केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. काही अपरिहार्य कारणांस्तव विद्यार्थी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी, प्रकल्प परीक्षा देऊ न शकल्यास संबंधित विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेनंतर १८ ते २० मार्च या कालावधीत परीक्षेची संधी दिली जाणार आहे.

गोसावी म्हणाले, ‘विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या वेळेपूर्वी किमान अर्धा तास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावे. सकाळच्या सत्रात १०.३० वाजता, तर दुपारच्या सत्रात २.३० वाजता परीक्षा कक्षात उपस्थित असले पाहिजे. मंडळाने प्रसिद्ध तसेच छपाई केलेले वेळापत्रकच ग्राह्य धरण्यात यावे. अन्य संकेतस्थळ किंवा यंत्रणेने छपाई केलेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये.’

कॉपीमुक्त अभियानाची अंमलबजावणी

‘परीक्षेच्या काळात कॉपीमुक्त अभियानाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य मंडळातर्फे २७१ भरारी पथके नेमण्यात आली आहेत. गैरप्रकारांना उद्याुक्त करणारे, मदत करणारे, गैरप्रकार करणारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल.’ असे शरद गोसावी यांनी स्पष्ट केले.

कर्मचाऱ्यांची अदलाबदल

गेल्या पाच वर्षांत गैरप्रकार आढळलेल्या सातशेहून अधिक केंद्रांवरील केंद्र संचालक, पर्यवेक्षकांची अदलाबदल करण्यात आली आहे. पुणे विभाग १३९, नागपूर ८६, छत्रपती संभाजीनगर १५५, मुंबई १८, कोल्हापूर ५३, अमरावती ९८, नाशिक ९३, लातूर विभागातील ५९केंद्र आहेत.

Story img Loader