लोकसत्ता प्रतिनिधी पुणे : मुद्रांक शुल्क न भरलेल्या किंवा कमी मुद्रांक शुल्क भरलेल्या प्रकरणात नागरिकांना दिलासा देण्यासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने सुरू केलेल्या अभय योजनेचा पहिला टप्पा २९ जानेवारीला संपला. योजनेच्या पहिल्या टप्प्यात तब्बल १६६ कोटी आठ लाख ४० हजार ६०७ रुपयांचे मुद्रांक शुल्क आणि दंड राज्य शासनाने माफ केला आहे. या योजनेचा सर्वाधिक लाभ मुंबईत घेण्यात आला असून १०७ कोटी ७३ लाख रुपयांचे मुद्रांक शुल्क आणि दंड हा माफ करण्यात आला आहे. राज्यात नागरिकांनी कमी भरलेले मुद्रांक शुल्क भरण्यासाठी दंडाची तरतूद आहे. कमी भरलेल्या मुद्रांक शुल्कापेक्षा दंडाची रक्कम जास्त झाल्याने संबंधित नागरिक दंड आणि कमी भरलेले मुद्रांक शुल्क भरण्यास टाळाटाळ करीत होते. मुद्रांक शुल्क वसुलीबाबत अनेक अडचणी येत होत्या. त्यामध्ये नोटीस आल्यानंतर अनेकांनी आपल्या मालमत्ता विकून व्यवहार पूर्ण केले. पत्ते बदलले होते. काही जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे चुकीचे मुद्रांक शुल्क आणि दंड वसूल करणे प्रत्यक्षात शक्य होत नव्हते. त्यामुळे अभय योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आणखी वाचा-समूह शाळांसाठी राज्यभरातून ७०० प्रस्ताव; किती शाळांचे समायोजन शक्य? योजनेचा आढावा - मुद्रांक शुल्क आणि दंड १०० टक्के माफ असलेले प्राप्त अर्ज - १८ हजार ६५२माफी दिलेल्या मुद्रांक शुल्काची रक्कम - ५१ कोटी ३० लाख चार हजार २०७माफी दिलेली दंडाची रक्कम - ११४ कोटी ७८ लाख ३६ हजार ४००एकूण माफी दिलेली रक्कम - १६६ कोटी आठ लाख ४० हजार ६०७