पावसाळी परिस्थितीसाठी ‘महावितरण’ची स्वतंत्र यंत्रणा कार्यरत करण्यात आली असून, परिमंडल ते विभागस्तरापर्यंत २४ तास कार्यरत असणारे नियंत्रण कक्ष उघडण्यात आले आहेत.
पावसाळ्यामध्ये वादळ किंवा वीजवाहिन्यांवर झाडे पडून वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार होत असतात. पूरस्थितीमुळेही वीजपुरवठा खंडित होतो. पावसाळ्यात अशा प्रकारे खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रत्येक विभागांतर्गत साधनसामग्रीसह फिरते पथक कार्यरत करण्यात आले आहे.
पुणे परिमंडलातील रास्ता पेठ, गणेशिखड व पुणे ग्रामीण मंडलासह सर्व विभागस्तरावर २४ तास कार्यरत असणारे दैनंदिन कक्ष सुरू करण्यात आले आहेत. शहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांसाठी २४ तास सुरू असणाऱ्या कॉलसेंटरचे १८००२००३४३५ किंवा १८००२३३३४३५ हे टोल-फ्री क्रमांक उपलब्ध आहेत. कोणत्याही कंपनीची लॅन्डलाइन किंवा मोबाइलद्वारे या क्रमांकावर तक्रार दाखल करता येणार आहे. विजेबाबत तक्रारी देण्याबरोबरच अतिवृष्टी किंवा वादळामुळे एखाद्या ठिकाणी तांत्रिक बिघाडामुळे दुर्घटनेची शक्यता असल्यास त्याबाबतही ग्राहकांनी माहिती द्यावी, असे आवाहन ‘महावितरण’कडून करण्यात आले आहे.