पुणे : चाकण औद्योगिक वसाहत हे वाहननिर्मिती उद्योगाचे महत्त्वाचे केंद्र आहे. चाकणमधील पायाभूत सुविधांचा बोजवारा उडाला आहे. सरकारी यंत्रणांकडून बैठका घेण्याशिवाय कोणतीच पावले उचलली जात नाहीत. यामुळे आतापर्यंत चाकण एमआयडीसीतील सुमारे ५० कंपन्या गुजरात, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये स्थलांतरित झाल्या आहेत, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी केला आहे. याला चाकणमधील उद्योग संघटनेने दुजोरा दिला आहे.

चाकण औद्योगिक वसाहतीत मर्सिडीज बेंझ, फोक्सवॅगन, ब्रीजस्टोन, ॲटलास कॉप्कोसह अनेक जागतिक पातळीवरील कंपन्या आहेत. येथील वाहतूक कोंडीसह अपुऱ्या पायाभूत सुविधांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जुलै महिन्यात उच्चस्तरीय बैठक मुंबईत घेतली होती. त्यानंतर स्थानिक यंत्रणांनी चाकणमधील उद्योगांच्या समस्या सोडविण्यासाठी पावले उचलणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात केवळ चर्चेच्या फेऱ्या सुरू असून, उपाययोजना करण्यासाठी पावले उचण्यात आलेली नाहीत. यामुळे कंपन्या परराज्यांत स्थलांतरित होत असल्याचा मुद्दा चाकणमधील उद्योगांची संघटना फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजकडून वारंवार उपस्थित केला जात आहे.

आणखी वाचा-आचारसंहितेपूर्वी उद्घाटनांचा धडाका;‘डबल इंजिन’मुळे राज्याच्या विकासाला गती- मोदी

या पार्श्वभूमीवर जयराम रमेश यांनी समाज माध्यमावर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, चाकण हे महत्त्वाचे वाहननिर्मिती केंद्र असून, तेथील पायाभूत सुविधांची अवस्था अतिशय खराब आहे. त्यामुळे अनेक मोठ्या कंपन्या तेथून काढता पाय घेत आहेत. तिथे रस्त्यांचे काम सुरू असले तरी खड्ड्यांची समस्या कायम आहे. खराब रस्त्यांमुळे वाहतूक कोंडीसह अपघात वाढले आहेत. यामुळे कंपन्यांच्या उत्पादकतेवर परिणाम होत आहे. कंपन्यांना कच्चा माल वेळेवर मिळण्यास आणि तयार उत्पादन बाजारपेठेत पोहोचविण्यास उशीर होत आहे. उद्योग संघटनांकडून वारंवार तक्रारी आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंळाच्या अधिकाऱ्यांसोबत अनेक बैठका होऊनही कोणतीही प्रगती झालेली नाही. आतापर्यंत ५० कंपन्या येथून गुजरात, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशसारख्या राज्यात स्थलांतरित झाल्या आहेत.

आणखी वाचा-पामतेलाच्या दराचा भडका, आयातीचे सौदे रद्द; जाणून घ्या, ऐन दिवाळीत खाद्यतेलाचे दर कसे राहतील

महाराष्ट्रात गुंतवणूक टिकवून ठेवणे अतिशय महत्त्वाचे असताना चाकणमधील कंपन्या येथून परराज्यांत स्थलांतरित होत आहेत. याआधीही अनेक उद्योग महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेले आहेत. सरकारच्या नाकर्तेपणामुळे मोठ्या प्रमाणात नोकऱ्या जात आहेत. -जयराम रमेश, ज्येष्ठ नेते, काँग्रेस</strong>

चाकणमधील स्थितीबाबत जयराम रमेश यांनी केलेल्या दाव्यात तथ्य आहे. अनेक कंपन्या परराज्यांत स्थलांतरित झाल्या आहेत. याचबरोबर आताही अनेक कंपन्या परराज्यांत जागा शोधत आहेत. अपुऱ्या पायाभूत सुविधा आणि वाहतूक कोंडीमुळे येथील उद्योगांचा श्वास कोंडला आहे. कोंडीमुळे कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन प्रवासात दररोज दोन ते तीन तासांचा वेळ वाया जात असून, उत्पादकतेला फटका बसत आहे. -दिलीप बटवाल, सचिव, फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीज