लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : ‘शिवसृष्टीच्या तिसऱ्या टप्प्याचे काम वेगाने व्हावे यासाठी राज्य शासनाकडून ५० कोटी रुपयांचा निधी दिला जाईल,’ अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे बुधवारी केली. ‘मी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे मावळे आहोत. त्यामुळे ही शिवसृष्टी पूर्ण व्हावी, ही आमची इच्छा आहे,’ असेही फडणवीस यांनी सांगितले.

महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने आंबेगाव बुद्रुक येथे उभारण्यात येत असलेल्या शिवसृष्टीच्या दुसरा टप्प्याचे लोकार्पण शिवजयंतीच्या निमित्ताने मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी झाले, त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकात पाटील, माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे संघचालक नाना जाधव, पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर, आमदार विजय शिवतारे, महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त जगदीश कदम, अमृत पुरंदरे, प्रतिष्ठानचे विश्वस्त डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यावेळी उपस्थित होते.

‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य, स्वधर्म आणि स्वभाषा या त्रिसुत्रीवर मांडण्यात आलेले दालन प्रेरणादायी असून, राज्यातील आणि देशातील विद्यार्थ्यांसाठी ते प्रेरणा आणि अभ्यासाचे केंद्र ठरेल,’ असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला. शिवाजी महाराजांनी मराठीला राजभाषेचा दर्जा दिला. शिवाजी महाराजांनी भाषेचे महत्त्व जाणले होते. त्याकाळी अरबी, फारसी भाषेत चालणारा राज्यकारभार महाराजांनी मराठीमध्ये सुरू केला. आज्ञापत्रातील आणि राजकारभारातील अनेक शब्द त्यांनी मराठी भाषेत आणले. लढवय्ये महाराज सर्वांनाच माहीत आहेत. मात्र, त्या पलीकडे स्वराज्य, स्वधर्म आणि स्वभाषेचा पुरस्कार करणारे महाराज, पर्यावरणप्रेमी, युद्धकौशल्याचा अभ्यास असलेले महाराज, योग्य प्रशासक असलेले महाराज असे महाराजांचे अनेक पैलू पुढे आणण्याचे काम शिवसृष्टी नक्की करेल,’ असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जगदीश कदम यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे संघचालक नाना जाधव यांचेही यावेळी भाषण झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अजित आपटे यांनी, तर प्रतिष्ठानचे विश्वस्त विनीत कुबेर यांनी आभार मानले.

राष्ट्राभिमानी आणि इतिहास जाणणारी पिढी जोवर तयार होत नाही, तोवर देशाचा विकास होणार नाही, हे लक्षात घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘विकास भी, विरासत भी’ ही संकल्पना देशासमोर मांडली. त्यालाच अनुसरून वारसा, विरासत जपणारी राष्ट्राभिमानी पिढी निर्माण व्हावी यासाठी शिवसृष्टी प्रकल्प महत्त्वाचा ठरेल. शिवाजी महाराजांचे बारा किल्ले युनिस्कोचा जागतिक वारसा म्हणून निश्चित करण्यात आले आहेत. त्याला लवकरच मान्यता मिळेल. – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

Story img Loader