लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक करण्याचे प्रकार सुरू आहे. सायबर चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनेत गुंतवणुकीच्या आमिषाने दोघांची ५२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
विश्रांतवाडी भागातील एकाची शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने चोरट्यांनी ३८ लाख ६४ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत एकाने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ५२ वर्षीय तक्रारदार विश्रांतवाडीतील टिंगरेनगर भागात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात संदेश पाठिवला होता. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखविले होते.
सुरुवातीला त्यांनी काही रक्कम गुंतविली. गुंतवणूक केल्यानंतर चोरट्यांनी त्यांना परतावा दिला. परतावा मिळाल्याने तक्रारदाराचा विश्वास बसला. त्यानंतर चोरट्यांनी त्यांना आणखी रक्कम गुंतविण्यास सांगितले. तक्रारदाराने महिभानरात आणखी रक्कम गुंतविली. रक्कम गुंतविल्यानंतर चोरट्यांनी त्याांना परतावा दिला नाही, तसेच त्यांचे मोबाइल क्रमांक बंद केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मंगेश हांडे तपास करत आहेत.
कात्रज परिसरातील एका महिलेची शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने चोरट्यांनी १३ लाख २८ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एका महिलेने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला कात्रज भागात राहायला आहे. चोरट्यांनी महिलेला संदेश पाठविला होता. शेअर बाजारात रक्कम गुंतविल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखविले होते. महिलेने चोरट्यांच्या खात्यात रक्कम गुंतविल्यानंतर चोरट्यांनी तिला परतावा दिला नाही. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने तपास करत आहेत.