पिंपरी : जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने सोमवारी श्री क्षेत्र देहूगाव आणि भंडारा डोंगर परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यात १६ टन कचऱ्याचे संकलन करण्यात आले.
बीज सोहळ्यानिमित्त राज्यभरातून लाखो वारकरी देहूगाव, भंडारा डोंगर परिसरात दाखल झाले होते. सोहळ्यानंतर देहूगाव परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण झाला होता. त्यापार्श्वभूमीवर डॉ. धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत श्री संत तुकाराम महाराज मंदिर परिसर, इंद्रायणी नदी घाटाची स्वच्छता केली. या अभियानात पिंपरी-चिंचवड आणि मावळ परिसरातील एक हजार श्री सदस्य सहभागी झाले होते. सदस्यांनी सकाळी सहा ते आठ या दोन तासात १६ टन कचऱ्याचे संकलन केले. यामध्ये दोन टन ओला कचरा आणि १४ टन सुका कचरा संकलित करण्यात आला.
यावेळी गाथा मंदिर ते मुख्य कमानपर्यंत दुतर्फा रस्त्याची व अंतर्गत रस्त्यांची स्वच्छता या अभियानात करण्यात आली. स्वच्छतादूत महाराष्ट्र भूषण तथा पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे स्वच्छता अभियान घेण्यात आले. या अभियानात एक हजार श्री सदस्यांनी सहभाग नोंदवला.
“स्वच्छ देहू, पवित्र देहू” या संकल्पनेला बळ देत, सर्व श्रीसदस्यांनी देहूतील मुख्य मंदिर परिसर, इंद्रायणी नदी घाट परिसर, गाथा मंदिर तसेच भंडारा डोंगरातील पवित्र स्थळे स्वच्छ केली. त्याचबरोबर मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांचीही स्वच्छता करण्यात आली.
अभियानाची वैशिष्ट्ये
हजारोंच्या संख्येने श्रीसदस्यांचा सहभाग
सकाळपासूनच श्रीसदस्य देहू आणि भंडारा डोंगर परिसरात पोहोचले.
स्वच्छता आणि जनजागृती – प्लास्टिक कचरा, पत्रावळी, तसेच अन्य कचऱ्याची सफाई करून परिसर स्वच्छ ठेवण्याचे महत्व लोकांपर्यंत पोहोचविण्यात आले.
वारकरी संप्रदायाच्या पवित्र भूमीचे जतन –
संत तुकाराम महाराज यांचा पवित्र देहू स्थळ स्वच्छ आणि सुशोभित ठेवण्याचा संदेश.
डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान दरवर्षी विविध ठिकाणी स्वच्छता अभियान राबवते. यंदा संत तुकाराम महाराजांच्या बीज सोहळ्यानंतर देहू आणि भंडारा डोंगर येथे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
स्थानिक ग्रामपंचायत,प्रशासन, वारकरी संप्रदाय, आणि नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत ” प्रत्येकाने कर्तव्य म्हणून स्वच्छतेबाबत जागरूक रहात स्वच्छतेसाठी पुढाकार घ्यावा” असा संदेश दिला.