पुणे : ‘देशात सध्या मेंदूमृत रुग्णांचे अवयव इतरांना प्रत्यारोपित केले जातात. आता काही ठिकाणी हृदयक्रिया बंद पडलेल्या रुग्णांचे अवयवही इतरांना प्रत्यारोपित करण्याची प्रक्रिया केली जात आहे. यामुळे अवयव प्रत्यारोपणाचे प्रमाण वाढणार असल्याने या प्रक्रियेला प्रोत्साहन द्यावे,’ असा सूर तज्ज्ञांनी राष्ट्रीय अवयव दान परिषदेत व्यक्त केला.

मणिपाल हॉस्पिटल, विभागीय अवयव प्रत्यारोपण समिती, इंडियन सोसायटी ऑफ क्रिटिकल केअर मेडिसीन (आयएससीसीएम) पुणे आणि मोहन फाउंडेशन यांनी या परिषदेचे आयोजन केले. या परिषदेत हृदयक्रिया बंद पडलेल्या व्यक्तींचे अवयव इतर गरजू रुग्णांना प्रत्यारोपित करण्याबाबत चर्चा करण्यात आली. देशात काही ठिकाणी ही प्रक्रिया केली जाते. यासाठीच्या नवीन तंत्रज्ञानाची मांडणीही परिषदेत करण्यात आली. अवयव काढल्यानंतर त्यांची गुणवत्ता कायम कशी राखता येईल, यावरही परिषदेत उहापोह करण्यात आला.

हेही वाचा – जिंकण्यासाठीच्या लढाईला तयार रहा, राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आव्हान

या वेळी मणिपाल ऑरगन शेअरिंग ट्रान्सप्लांटचे प्रमुख कर्नल (निवृत्त) डॉ. अविनाश सेठ म्हणाले, ‘हृदयक्रिया बंद पडलेल्या व्यक्तींचे अवयव काढून इतरांना प्रत्यारोपित करण्यासाठी योग्य प्रक्रिया अवलंबिणे गरजेचे आहे. हृदय बंद पडल्याने शरीरातील रक्तपुरवठा बंद होऊन त्या व्यक्तीचे अवयव फार काळ टिकत नाहीत. यामुळे नॉर्मोथर्मिक रिजनल पर्फ्यूजन (एनआरपी) प्रक्रियेद्वारे हृदयक्रिया बंद पडल्यानंतर शरीरातील रक्तप्रवाह २ ते ४ तास सुरू ठेवता येते. यासाठीची स्वस्त आणि किफायतशीर प्रक्रिया विकसित करण्याच्या दिशेने आम्ही पाऊल टाकत आहोत.’

अवयवदान हे एखाद्याला नवजीवन देणारे दान आहे. एखाद्या दात्याचे अवयव काढून ते प्रत्यारोपित करेपर्यंत त्यांची गुणवत्ता टिकविणे आवश्यक असतात. यासाठीच्या उत्कृष्ट प्रक्रियांचा अंगीकार करायला हवा. हजारो जणांना अवयव प्रत्यारोपणाची गरज असून, त्या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. – डॉ. अनिल कुमार, संचालक, राष्ट्रीय अवयव आणि ऊती प्रत्यारोपण समिती

हेही वाचा – समाज माध्यमातील ओळख महागात, भेटवस्तूच्या आमिषाने महिलेची १२ लाखांची फसवणूक

नेमकी आव्हाने कोणती?

देशात सध्या प्रामुख्याने मेंदूमृत व्यक्तीचे अवयवदान करण्यात येते. एखादा व्यक्ती मेंदूमृत झाल्यानंतर त्याच्या शरीरातील रक्तप्रवाह काही काळ सुरू असतो. त्यामुळे त्याचे अवयवही काही कालावधीपर्यंत चांगल्या स्थितीत राहतात. मात्र हृदयक्रिया बंद पडलेल्या व्यक्तींमध्ये शरारीतील रक्तप्रवाह तातडीने थांबतो. त्यामुळे अशा व्यक्तीचे अवयव लगेच खराब होण्याची शक्यता असते. यासाठी अवयव तातडीने काढून ते प्रत्यारोपित करणे आवश्यक असते. त्यामुळे नॉर्मोथर्मिक रिजनल पर्फ्यूजन (एनआरपी) प्रक्रिया करून दात्याच्या शरीरात रक्तप्रवाह काही काळ सुरू ठेवला जातो. त्यामुळे अवयव सुस्थितीत राहण्यास मदत होते आणि त्या कालावधीत काढले जातात. सध्या ही प्रक्रिया देशात मोजक्याच ठिकाणी होते.