स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पुढील आठवड्यात २५ ते २९ जुलै या कालावधीत खास ग्रामसभेचे आयोजन करण्यात येणार आहे. याबाबत ग्रामविकास विभागाने केलेल्या सूचनेनुसार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासकांनी हे आदेश दिले आहेत. घरोघरी तिरंगा उपक्रम, जलजीवन मिशन आणि करोना लसीकरणाबाबत या कालावधीत खास जनजागृती करण्यात येणार आहे. स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने ११ ते १७ ऑगस्ट या कालावधीत ‘घरोघरी तिरंगा’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. ‘घरोघरी तिरंगा’ उत्सव प्रत्येक व्यक्तीचा, कुटुंबाचा असून या कालावधीमध्ये गावातील सर्व नागरिकांनी ग्रामपंचायत येथून तिरंगा ध्वज विकत घेऊन आपल्या घरावर सन्मानाने तिरंगा लावण्याचा उपक्रम यशस्वी करण्याचे आवाहन या ग्रामसभेत करण्यात येणार आहे. त्याचबरोबर १०० टक्के नळजोडणी झालेल्या गावांमध्ये ‘हर घर जल’ घोषित करण्याबाबत ग्रामसभेचा ठराव घेण्यात येणार आहे. तसेच करोना प्रतिबंधक लसीकरणाची पहिली मात्रा झालेल्या १२ वर्षांवरील बालकांना निकषानुसार दुसरी मात्रा आणि १८ वर्षांवरील नागरिकांना दुसऱ्या मात्रेनंतर सहा महिन्यांनी ३० सप्टेंबरपर्यंत शासकीय करोना प्रतिबंधक लसीकरण केंद्रावर मोफत प्रतिबंधात्मक वर्धक मात्रा (बूस्टर डोस) घेण्याबाबत जनजागृती या ग्रामसभेत करण्यात येणार आहे.