पुणे: शेजाऱ्यांशी झालेल्या वादामुळे एका महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना धनकवडी परिसरात घडली. या प्रकरणी सहकारननगर पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
कविता संजय श्रीवास्तव (वय ४०, रा. स्वामी विवेकानंद प्रेरणा बिल्डिंग, बालाजीनगर, धनकवडी) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. त्यांचे पती संजय शामलाल श्रीवास्तव (वय४५, रा. बालाजीनगर, धनकवडी) यांनी या संदर्भात सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी अरिफ हरुन मुल्ला (वय ४२, रा. स्वामी विवेकानंद प्रेरणा बिल्डिंग, बालाजीनगर, धनकवडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा… पिंपरी: आठ वर्षे झाली, पूल होणार कधी? बोपखेलवासीयांचा सवाल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,संजय श्रीवास्तव आणि आरोपी अरीफ मुल्ला शेजारी आहेत. किरकोळ कारणावरुन मुल्ला आणि श्रीवास्तव कुटुंबीयांमध्ये सतत वाद व्हायचे. त्यामुळे दोघांनी यापूर्वी सहकारनगर पोलीस ठाण्यात एकमेकांविरुद्ध तक्रारी दिल्या होत्या. पोलिसांनी श्रीवास्तव आणि मुल्ला यांना प्रतिबंधात्मक कारवाईची नोटीस देऊन समज दिली होती. दोन दिवसांपूर्वी कविता यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
शेजाऱ्यांशी होणाऱ्या वादामुळे पत्नीने आत्महत्या केल्याचे संजय श्रीवास्तव यांनी फिर्यादीत म्हटले आहे.आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मुल्ला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक राजगुरु तपास करत आहेत.