पुणे : वेगवेगळ्या प्रकारची आमिषे, तसेच केंद्रीय तपास यंत्रणाकडून कारवाई करण्यात येणार असल्याची भीती दाखवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या सायबर चोरट्यांविरुद्ध केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) देशभरातील ३२ शहरात कारवाई करण्यात आली. याप्रकरणी सीबीआयच्या पथकाने पुण्यातून दहाजणांना अटक केली.

देशभरात सायबर गुन्हे वाढीस लागले आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांचे जाळे देशभरात उभे केले आहे. नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीत १७० जणांपेक्षा जास्त चाेरटे सामील असल्याची माहिती सीबीआयला मिळाल्यानंतर पुण्यासह, हैदराबाद, अहमदाबाद, विशाखापट्टणमसह देशभरात ३२ ठिकाणी छापे टाकण्यात आले. सीबीआयकडून गुरुवारी (२६ सप्टेंबर) ही कारवाई करण्यात आली.

हेही वाचा >>>खून प्रकरणात चार वर्ष पोलिसांना गुंगारा- गुन्हे शाखेकडून दोघे गजाआड

नागरिकांची फसवणूक करण्यासाठी सायबर चोरट्यांनी काॅल सेंटर सुरू केली हाेती. काॅल सेंटरमधील आधुनिक यंत्रणा वापरुन चोरटे नागरिकांना फसवणुकीच्या जाळ्यात ओढत असल्याचे उघडकीस आले. सायबर चोरट्यांनी नागरिकांची फसवणूक केल्यानंतर संबंधित रक्कम वेगळ्या खात्यात हस्तांतरित केली जायचे. ऑनलाइन फसवणूक प्रकरणात १७० जण सामील असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. सीबीआयच्या पथकाने हैदराबादमधून पाच जणांना, तसेच विशाखापट्टणम येथून ११ जणांना अटक करण्यात आली आहे.