कृषी पदवीधरांनी एमपीएससी-यूपीएससी करून सरकारी नोकरीच्या मागे न लागता शेतीच्या विकासामध्ये योगदान देत देशसेवा करावी, अशी अपेक्षा सहकार आणि पणनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी व्यक्त केली.
मिटकॉन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट संस्थेतर्फे ‘कृषी विकास’ या विषयावर आयोजित राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. मिटकॉनचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. प्रदीप बावडेकर, इन्स्टिटय़ूटचे संचालक गणेश राव आणि अॅग्रिबिझनेस मॅनेजमेंट विभागाचे उपसंचालक डॉ. आर. बी. डौले या वेळी उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले, की गावे नीट झाल्याशिवाय देश मोठा होणार नाही आणि शेतीच्या विकासाशिवाय गावांची सुधारणा होणार नाही. शेतमालाला योग्य दर शेतकऱ्याला मिळेल एवढा शेतीचा विकास झालेला नाही. त्यामुळे परंपरागत शेती पद्धती बदलण्यामध्ये तरुण विद्यार्थी मदत करू शकतील. कृषी पदवी संपादन केल्यावर ध्येय म्हणून ही गोष्ट हाती घेतली तर हा पदवीधर गावामध्ये राहील आणि शहरात होणारी गर्दी कमी करण्यासही मदत करेल. एमपीएससी-यूपीएससी करून नोकरी करण्यापेक्षाही देशाचे अर्थशास्त्र बदलण्याची ताकद शेतीमध्ये आहे. सरकारच्या योजनांचा अभ्यास करून सुशिक्षितांनी त्यांचा लाभ घेतला नाही, तर योजना मातीमोल होतील आणि त्यामध्ये भ्रष्टाचार होऊ शकतो. चांगल्या गोष्टींसाठी सरकारकडे पैसे आहेत. त्यामुळे सरकारच्या योजनांचा युवकांनी अधिकाधिक लाभ घ्यावा.
प्रदीप बावडेकर यांनी प्रास्ताविकामध्ये मिटकॉनच्या विविध अभ्यासक्रमांची माहिती दिली. गणेश राव यांनी आभार मानले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा