लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : लोकसभा निवडणुकीवेळी काही लोकांना शब्द दिले होते. परंतू, ते शब्द आता बाजूला गेले. आणि तिथे दुसऱ्या लोकांना घेण्यात आल्याचे सांगत राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षातील हर्षवर्धन पाटील यांच्या प्रवेशावरून टोला लगाविला.

पिंपरी-चिंचवड शहरातील विविध विकासकामांचे उद्घाटन, लोकार्पण आणि भूमिपूजन पवार यांच्या हस्ते झाले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना पवार म्हणाले, निवडून येणारे उमेदवार जेव्हा नसतात. तेव्हा उमेदवार आयात करावे लागतात. ज्या आघाडी, युती किंवा तिसरी आघाडी असते. त्यावेळेस निवडून येण्याची क्षमता बघितली जाते. लोकसभा निवडणुकीवेळी काही लोकांना शब्द दिले होते. परंतू, ते शब्द आता बाजूला गेले. आणि तिथे दुसऱ्या लोकांना घेण्यात आले. अशा प्रकारच्या घटना राज्याच्या अनेक भागात आपण पाहत आहोत. हे काही नवीन नाही. ज्यांच्याकडे निवडून येण्याची क्षमता असणारे उमेदवार नाहीत, त्यांना दुसऱ्यांकडून काही उमेदवार घ्यावे लागतात.

आणखी वाचा-दीर्घकालीन करोना संसर्गाचे रहस्य अखेर उलगडले! केंब्रिज विद्यापीठातील संशोधकांचे संशोधन

दरम्यान, इंदापूरमधील भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात प्रवेश केल्याने पक्षातील आप्पासाहेब जगदाळे, प्रवीण माने, भरत शहा हे नाराज असल्याचे सांगितले जाते. त्यावरूनच अजित पवार यांनी टोला लगाविल्याचे दिसते.