पुणे : केंद्र सरकारकडून देशभरातील सर्व शिक्षण मंडळे समान समान पातळीवर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (राज्य मंडळ) आणि राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) यांच्यातर्फे १७ ते २१ मार्च या कालावधीत नववी ते बारावीच्या शिक्षकांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून, त्यात समग्र प्रगती पत्रक माध्यमिक स्तर व प्रश्नपत्रिकांचे प्रमाणीकरण या बाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २०२३, राज्य अभ्यासक्रम आराखडा २०२४ मधील बदलांना अनुसरून शिक्षकांचे सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने पुण्यातील यशदा येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. केंद्रीय शिक्षण विभागाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाचे अतिरिक्त सचिव आनंदराव पाटील यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन होणार आहे. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग, राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार, एनसीईआरटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि परखच्या विभागप्रमुख डॉ. इंद्राणी भादुरी, राज्य मंडळ अध्यक्ष, माध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी, योजना संचालक डॉ. महेश पालकर, बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील उपस्थित राहणार आहेत. इयत्ता नववी ते बारावी या वर्गांतील विद्यार्थ्यांचा समग्र विकास आणि प्रगतीशी संबंधित मूल्यांकन प्रक्रियेसाठी परख या राष्ट्रीय मूल्यांकन केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.
परखअंतर्गत समग्र प्रगती पत्रक ही संकल्पना मांडण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वंकष प्रगतीचे मूल्यांकन करण्याचा उद्देश त्यामागे आहे. त्यामुळे समग्र प्रगतीपत्रक, प्रश्नपत्रिका निर्मिती, पृथ:क्करण व प्रमाणीकरण करण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षित केले जाणार आहे. विविध राज्यांच्या प्रश्नपत्रिकांच्या तुलनात्मक अभ्यासावरही या कार्यशाळेत प्रकाश टाकला जाणार आहे. राज्य मंडळाकडून निर्मित केल्या जाणाऱ्या प्रश्नपत्रिका अधिकाधिक अचूक आणि उच्चतम दर्जाच्या निर्माण करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली.