देशातील सर्व घटकांतील नागरिकांचे जगणे मुश्कील झाले आहे. त्या नागरिकांच्या प्रश्नावर संसदेत आवाज उठविल्यावर खासदारांचे निलंबन केले जाते, यासह अनेक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि केंद्र, राज्य सरकारला जाग आणण्यासाठी २७ डिसेंबरला शिवनेरीपासून भव्य शेतकरी आक्रोश मोर्चाला सुरुवात होणार आहे, तर ३० डिसेंबर रोजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे. ग्रामीण आणि शहरी भागातून हा मोर्चा मार्गस्थ होणार असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली मोर्चाची सांगता सभा होणार आहे. तसेच या सभेला महाविकास आघाडीमधील अनेक नेते मंडळीदेखील उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयामध्ये भव्य शेतकरी आक्रोश मोर्चाबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत अमोल कोल्हे यांनी अनेक विषयांवर भाष्यदेखील केले.
हेही वाचा >>> पुण्यातील भाजपचे आमदार धास्तावले
यावेळी खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, मी आणि सुप्रिया सुळे यांनी कांदा निर्यात बंदीच्या प्रश्नावर चर्चा करण्याची मागणी केली. त्या मागणीनंतर आम्हा दोघांना अध्यक्षांनी निलंबित केले. ही कारवाई आमच्यावरच थांबली नाही, तर तब्बल १४१ खासदारांना अध्यक्षांनी निलंबित केले आहे. त्या कारवाईमधून अध्यक्ष हे निलंबित करण्याच्या मूडमध्ये होते की काय? पण, या निलंबनाच्या कारवाईमधून केंद्र सरकारचा बुरखा फाटला असल्याचे सांगत केंद्र सरकारवर त्यांनी टीका केली.
तसेच ते पुढे म्हणाले की, माझ्यासह देशातील जनतेने २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संसदेतील पायर्यांवर नतमस्तक होताना पाहिले आहे. पण, आज संसदेतील सहकार्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींना संसदेत येऊन निवेदन करावे, हे सांगावे लागत आहे. त्यामुळे नेमका खरा चेहरा कोणता, असा सवाल उपस्थित करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांनी निशाणा साधला.
हेही वाचा >>> डाॅ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी दोन साक्षीदारांची नावे न्यायालयात सादर; दोघांना हजर राहण्याबाबतचे समन्स
तसेच ते पुढे म्हणाले की, त्यामुळे एकूणच देशातील आणि राज्यातील परिस्थिती लक्षात घेऊन, केंद्र आणि राज्य सरकारला जाग आणण्यासाठी २७ ते ३० डिसेंबरदरम्यान शिवनेरी ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आपल्या देशात रामराज्य आणले पाहिजे : अमोल कोल्हे
अयोध्येत राम मंदिराचे उदघाटन होत आहे. त्या कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले का, या प्रश्नावर अमोल कोल्हे म्हणाले की, राम मंदिराचे उदघाटन होत आहे, ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे, पण मला तरी निमंत्रण नाही. मात्र, माझी एक अपेक्षा आहे की, राम मंदिराचे उदघाटन थाटामाटात करा, पण या देशात रामराज्य आणण्याचीदेखील तेवढीच मोठी जबाबदारी आहे, याचीदेखील जाणीव ठेवा आणि रामराज्य आले पाहिजे, अशी भूमिका कोल्हे यांनी मांडत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.